३१ डिसेंबर, नवं वर्ष जवळ येत चाललंय. किती तरी तरुण आणि आज काल तर तरुणीही सिगारेट चा पहिला झुरका, दारूचा पहिला घोट, अन्य व्यसन या तथाकथित नवं वर्ष साजरं करण्याच्या निमित्ताने अनुभवतात आणि पुढे आपल्या आरोग्याचा, आयुष्याचा बळी देतात.
या अनुषंगाने सर्वाँना सावध करणारा हा लेख. शेकडो कथा, कविता लिहिणाऱ्या, अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या लेखिका सौ भारती सावंत यांचे आपल्या
न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे.
– संपादक
बालपणापासून घरात, शाळेत मुलांवर चांगले संस्कार केले जातात. व्यसन करू नये, गैरवर्तन नसावे किंवा त्याचे दुरुपयोग काय असे शाळेतील पाठांमधून देखील आपण शिकत आलो आहोत. आजी आजोबांच्या कथां मधून देखील आपण व्यसनी लोकांचे कसे नुकसान झाले आहे हे ऐकत, पहात आलो आहोत. तरी देखील यौवनात पाऊल टाकताच लोकांना व्यसन करण्याची कशी हुक्की येते आणि ते कसे व्यसनग्रस्त होतात हे त्यांनाही कळत नाही.
प्रत्येक व्यसनी माणूस व्यसन का लागले याचा निर्वाळा देण्यासाठी अनेक कारणे सांगत असतो. मनावर आलेला ताण घालवण्यासाठी व्यसन करतो, कोणाला नोकरी नसते, कोणाचे लग्न होत नसते, बेरोजगारी तसेच दारिद्र्य, प्रेमभंग अशा नाना कारणांनी ते व्यसनग्रस्त झालेले असतात असे सांगितले जाते. परंतु या व्यसनांमुळे त्यांचा प्रॉब्लेम संपतो का ? हे त्यांना कळत नसावे का? दारिद्र्यातून व्यसनाला लागणारे पैसे कुठून येतात किंवा ते का घालवावेत ? व्यसनामुळे दुर्धर अशा रोगांचा सामना करावा लागतो.
रोग जर झाला तर हॉस्पिटलच्या चकरा मारण्यासाठी कितीतरी लाख रुपये लागतात. कर्करोग, दमा, क्षय अशा कितीतरी रोगांना बळी पडावे लागते. शरीराला त्रास तर होतोच, तसेच पैशापरी पैसा जातो आणि घरातल्यांना, कुटुंबियांनादेखील त्याचा त्रास भोगावा लागतो हे व्यसनी माणसाला कळू नये का ? डॉक्टर नेहमीच सांगत असतात फळे, सुकामेवा, पालेभाज्या, फळभाज्या खा. चांगला आहार घ्या, आरोग्याची काळजी घ्या हे सर्व अभ्यासात वाचण्यापुरतेच का ?
अगोदरच वहाने, कारखाने यांचे अमर्याद प्रमाण वाढले आहे. त्यातून निघणारे धूर, धूळ, रसायने हवेला प्रदूषित करत आहेत. रासायनिक खते आणि कृत्रिम जोपासना करून वाढविलेले, पिकवलेले अन्नधान्य, फळे, भाज्या खाऊन मानव निरनिराळ्या रोगांची शिकार होत आहे. त्यातच घराजवळ, परिसरात अशा व्यसनी लोकांनी ओढलेल्या विड्या सिगारेटसचा धूर वातावरणात पसरला जावून लहान बालके आणि आजारी लोकांच्या श्वासातून शरिरात प्रवेश करत आहे. रोगांना निमंत्रित करत आहे. वातावरणात दूषित घटकांचे प्रमाण वाढल्याने सर्वसामान्य माणसाला सहजासहजी श्वासोच्छ्वास करायला त्रास होत आहे.
सुशिक्षित असो वा अशिक्षित पण एकूण लोकसंख्येच्या ७०% लोकं काही ना काही व्यसनांना बळी पडलेली दिसतात.
हल्ली तर ब्राऊन शुगरच्या सिगार, ई सिगारेटस् हातात घेऊन तरूण मुलेमुली प्रेस्टिजच्या नावाखाली रस्तोरस्ती व्यसन करत वावरताना दिसतात. उच्चभ्रू संस्कृतीत यालाच फॅशन म्हटले जाते. या भलत्याच आधुनिकतेपायी तरूण पिढी व्यसनांच्या जाळ्यात फसू लागली आहे. रात्रीला पहाटेपर्यंत सुरू असणाऱ्या पार्ट्या, हॉटेलमध्ये चालणारा गलिच्छ गोंधळ, नंगा नाच हे कशाचे द्योतक आहे ? याला आवर कुणी आणि कसा घालायचा ? आय टी कंपन्यांनी आपल्या देशात बस्तान बसविले आणि लाखोंचे पॅकेजेस देऊन तरूणांकडून बारा बारा तास काम करून घेतले जावू लागले. कंपनीकडून वरचेवर गेट टुगेदर, मिटींग्जच्या नावाखाली वरचेवर दिल्या जाणाऱ्या पार्ट्यांमुळे पालकांनी केलेले सुसंस्कार दारूच्या पेगमध्ये मिसळले जावू लागले. खिशात पैसा खुळखुळू लागताच तरूणाई कामाचा ताण हलका करण्यासाठी पेगवर पेग रिचवू लागली आणि व्यसनाधीन झाली.
हल्ली मुली मुलांच्या बरोबरीने अर्थार्जन करू लागल्यात. स्वावलंबन, समानता यामुळे बरोबरीने पार्टीत मिसळणे. दारू पिणे, सिगारेटचे झुरके ओढणे सहजच करू लागल्यात.
पुर्वीच्या काळी पुरूषांच्या व्यसनाधीनतेला स्त्रियां अटकाव करत. आता बरोबरीने त्याही व्यसन करू लागल्याने समाजाच्या संस्कृतीचे कठिण होऊन बसले आहे. समाजाची घडी विस्कटून गेली आहे. शनिवार रविवारी स्वैराचार होताना दिसत आहे. हल्लीच वृत्तपत्रात वाचले की दोन मुली दारूच्या नशेत धुंद होऊन रस्त्यावरच अश्लिल शिवीगाळ करताना दिसल्या. त्या नशेत काहीही बरळत होत्या. ना कपड्यांचे भान ना परिस्थितीची जाण! पोलिसांनाही त्या जुमानत नव्हत्या. अशा वेळी वाटते ती खेड्यात राहून ‘चूल आणि मूल’ सांभाळणारी नारी कुठे आणि व्यसनाधीन ही तरूणाई कुठे ! ‘विद्या विनयेन् शोभते’ हे सुभाषित या तरूणींना कोणीतरी शिकवावे.
बोकाळलेल्या या तरूणाईला समूपदेशनाची आवश्यकता आहे. नाहीतर पुढची पिढी असंस्कृत निपजणार आणि भीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती निर्माण होणार.
तरूणांच्या या बेबंदशाहीला वेळीच आवर घालण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आधीच्या पिढीने स्वमेहनतीने पै पै गाठीशी टाकत आपल्या मुलांसाठी घरबंगला बांधून ठेवलेला असतो. गावाकडे शेती, बंगला आणि शहरात फ्लॅट घेऊन ठेवला असल्याने तरूण युवकांना मिळणारा पगार चैनीत उधळण्यातच जातो. ना जबाबदारी ना काही उणीव त्यात स्वच्छंद वागण्याचे आधीपासूनच धडे मिळालेले असतात. मग स्वैराचाराला आळा कसा बसणार ? दारात गाडी, हाताशी पैसा त्यामुळे बहरलेली तरूणाई व्यसनाधीन होताना दिसत आहे.
आपल्या संस्कृतीची जोपासना करण्यासाठी पुन्हा नव्याने सुरूवात व्हायला हवी तरच वातावरण मंगलमय होईल.पाश्चात्यांच्या संस्कृतीचा लोप होईल.

– लेखन : सौ.भारती सावंत
खारघर, नवी मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800