“इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे….” हे अजरामर सत्य सांगून गेलेले, ‘निबंधमाला’कार विष्णूशास्त्री चिपळूणकर यांची आज पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने हा विशेष लेख.
विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना विनम्र अभिवादन
– संपादक
विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म २८ मे १८५० रोजी झाला. त्यांनी मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी काम केलं. इंग्रजी हे वाघिणीचे दूध असे जरी ते म्हणत असले तरी त्यांचा मराठीविषयीचे कार्य बोध घेण्यासारखंच आहे.
चिपळूणकर कुटुंब मूळचं रत्नागिरीतील. नंतर ते पुण्यातच स्थिरावले. मात्र त्यांचे वडील कृष्णशास्त्री गोदाकाठी नाशिक नगरीत स्थायिक झाले. त्यांच्या वडिलांना मोरशास्त्री साठे यांनीच ओळखलं होतं. त्यांच्या विद्वत्तेची साठे यांनी खूप चिकित्सक बुद्धीने तारीफ केली आहे.
लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वाई, जि. सातारा येथे प्राज्ञपाठशाळा सुरू करून संस्कृतचा पाया अनेकांचा मजबूत केला. विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या वडिलांविषयी आणि त्यांच्या कुशल आणि चाणाक्ष बुद्धीचं वर्णन करताना संस्कृत विद्वान मोरशास्त्री साठे म्हणतात, ‘कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणजे पुणे पाठशाळेतील संस्कृतीचे बृहस्पती आहेत’ मराठी भाषेचं कृष्णशास्त्री हे महात्मा फुल्यांनी पुण्यात स्थापन केलेल्या भारतातल्या मुलींच्या पहिल्या शाळेचे व्यवस्थापकीय सभासद होते. असा वैचारिक वारसा विष्णुशास्त्रींना लाभला होता.
कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलेले सॅम्युएल जॉन्सनच्या रासेलस ह्या ग्रंथाचे भाषांतर विष्णुशास्त्र्यांनीच शालापत्रकातून क्रमशः पूर्ण केले. ह्याच मासिकातून कालिदास, भवभूती, बाण, सुबंधू आणि दंडी ह्या संस्कृत कवींवर त्यांनी जे समीक्षात्मक निबंध लिहिले, ते पुढे संस्कृत कविपंचक ह्या नावाने प्रसिद्ध झाले.
पराक्रम हा केवळ रणांगणातच गाजवता येतो असं नाही, तो अनेक प्रकारे सिद्ध करता येतो. शत्रूशी दोन हात करण्याचं सामर्थ्य हे लेखणीतही असतं हे विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी सिद्ध केलं. ‘निबंधमाले’चे मनोरंजन हे ध्येय नव्हते. ‘निबंधमाला’ची उद्दिष्टये लोकांमध्ये जागृती, विचारक्रांती व्हावी, मराठी भाषेच्या अभिव्यक्तीचे दर्शन घडावे, स्वदेश-स्वधर्म-स्वभाषा यांचा अभिमान जागृत करावा व स्वभाषेची अवहेलना थांबवावी ही होती. ती राष्ट्रवादी जहाल पक्षाचा जाहीरनामा म्हणून प्रसिद्ध व्हावी आणि ‘निबंधमाले’चे उदात्त ध्येय वाङ्मयप्रेमी लोकांना ‘निबंधमाला’ हा वाङ्मयाचा ज्ञानकोश वाटावा असे ठेवले होते.
‘निबंधमाले’मधील लेखांचे विषय व स्वरूप पुढीलप्रमाणे :-
राजकीय विषय – इतिहास आणि आमच्या देशाची स्थिती
सामाजिक विषय – संपत्तीचा उपयोग, उपभोग, लोकभ्रम
वाङ्मयीन विषयांवर निबंध- वक्तृत्व, वाचन
व्यक्ती परीक्षणात्मक- लोकहितवादी
चरित्रात्मक – डॉ. जॉन्सन
समीक्षात्मक – मोरोपंतांची कविता
साहित्य व त्यावरील चर्चा – विद्वत्ता व कवित्व
भाषाशास्त्रीय – भाषा, दूषण, लेखन, शुद्धी इत्यादी.
याशिवाय अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भाषा या विविध विषयांचा समावेश ‘निबंधमाले’तील लेखनात होता. ते सर्व लेख वैचारिक होते. ते निबंध स्वरूपात लिहिले असल्याने ती ‘निबंधमाला’ होय !
विष्णुशास्त्री यांनी स्वतःला, ‘मराठी भाषेचा शिवाजी’ ही पदवी घेतली. इतिहास हा चिपळूणकर यांचा आवडता विषय. ते म्हणत, इतिहास म्हणजे प्रत्यक्ष उदाहरणे दाखवून केलेला बोध होय. त्यांनी देशाला प्रथम स्वातंत्र्य मिळावे, त्या कार्यास गती आणावी हा विचार दिला.
कोणताही लढा देण्यास तयार नसलेल्या त्यावेळच्या महाराष्ट्रातील थकलेल्या गलितगात्र आणि शिथिल झालेल्या, उत्साह नसलेल्या हताश व निराश झालेल्या महाराष्ट्रातील लोकांच्या मनात ब्रिटिशविरोधी संताप निर्माण केला. लोकशक्ती, लोककृती आणि लोकशिक्षण यांचे धडे ‘निबंधमाले’तून दिले. तत्कालीन युवकांना ब्रिटिशांचे नेतृत्व झुगारून देण्याची प्रेरणा दिली. ब्रिटिश करत असलेल्या शोषणाकडे अधिक लक्ष द्यावे, रावसाहेब, रावबहादूर या पदव्या, लठ्ठ पगार नाकारावा, तरुणांनी स्वार्थत्याग, ज्ञानोपासना, सदाचार, चारित्र्य, तत्त्वनिष्ठा यांवर लक्ष केंद्रित करावे असा तरुणांना सल्ला दिला. ब्रिटीश साम्राज्यविरोधी चळवळ सुरू केली.
चिपळूणकर यांनी इंग्रजी भाषेला ‘वाघिणीचे दूध’ म्हटले. त्यांच्याच ‘निबंधमाले’ने लढाऊ राष्ट्रवादाची गर्जना केली. चिपळूणकर यांनी गुलामगिरीतून देशाच्या मुक्तीला प्राधान्य दिले, स्वातंत्र्याची उपयोगिता व चळवळीला वेग यांसाठी आक्रमकता आणून सनदशीर राजकारणाकडून जहाल राजकारणाकडे असा बदल केला. त्यांनी असे ठामपणे म्हटले, की ब्रिटिशांच्या शासनाला दैवी मानणे चूक आहे.
पारतंत्र्यामुळे आपण ब्रिटिशांचे शारीरिक, मानसिक व बौद्धिक गुलाम झालो आहोत. ते राज्यघटनेनुसार कारभार करत नाहीत तर नोकरशाहीच्या लहरीप्रमाणे करतात, पण निराश न होता कार्य करावे लागेल. कारण पारतंत्र्याची स्थिती शाश्वत नाही, नैमित्तिक आहे. परकीय अंमल गेला, की पुन्हा पूर्वीचे वैभवसंपन्न दिवस येतील, अशी आशा त्यांनी युवकांमध्ये जागवली.. त्यांना ‘आधुनिक मराठी गद्याचे जनक’ असेही म्हटले जाते. आगरकर त्यांना, ‘महाराष्ट्रवाणीचा पती’ व ‘व्हॉल्टेअर’ अशा उपमा देतात. अशा विष्णूशास्त्रींचे १७ मार्च १८३२ रोजी निधन झाले. निमित्त ठरले विषमज्वर.अशा या थोर देशभक्तास विनम्र अभिवादन.

– लेखन : प्रकाश क्षीरसागर. गोवा
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800