माझेच शब्द होते, माझेच सूर होते
येता निरोपाची वेळ, ओठ माझे मूक होते
अशी गत होते निरोपाची वेळ आली म्हणजे. कधी कधी हा क्षण अगदी क्लेशकारक, दुःखकारक, मनाला भिडणारा असतो. तो अतिशय हळुवार, हलका, हळवा, ओला असाही क्षण असतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण आलेले असतातच.
जसं एक पर्व संपल्याशिवाय दुसरे पर्व सुरू होत नाही. एक अध्याय पूर्ण झाल्याशिवाय पुढचा अध्याय सुरू होत नाही. सूर्यास्तानंतर ची काळोखी रात्र संपल्याशिवाय सोनेरी सूर्योदय होत नाही. एक गोष्ट संपल्याशिवाय दुसरी सुरू होत नाही. एक नवा धडा सुरू करण्यासाठी आधीचा संपवावा लागतो. तसंच असतं ह्या निरोपाचं. निरोप घेतल्यानंतर येणारी खिन्नता, उदासीनता यावर मात करूनच पुढे जावे लागते. बरं, अशी वेळ फक्त हाडामासाच्या जिवंत माणसांचा निरोप घेतल्यावरच येते असेही नाही. तुम्हाला आवडणार्या, प्रिय असणाऱ्या, वस्तू चा, घराचा आणखीन कशाचाही निरोप घेताना येते. जितके प्रेम त्या वस्तूवर, त्या व्यक्तीवर अधिक तितकी ती वेळ निरोपाची वेळ कठीण जाते. तरीही पुढे जाण्यासाठी निरोप घ्यावा लागतो. नव्हे, निरोप घेण्याचा निर्णय घेणे योग्यच असते.
निरोप घेणे महत्त्वाचे असते, कारण आपल्याला आयुष्यात पुन्हा-पुन्हा भेटायचे असते. निरोपाच्या वेळी आलिंगन देतानाहि आपण म्हणतो, “भेटू या पुन्हा“.
निरोप घेते वेळी आपली म्हणजे भारतीय पद्धत किती छान आहे नाही ? पाश्चिमात्य देशात हातात हात मिळवून म्हणजे शेक हॅण्ड करून निरोप घेतात. पण आपण मात्र आलिंगन देतो. म्हणजे जणू एकमेकांच्या शरीराबरोबर मनालाही आलिंगन देतो आणि पुन्हा भेटण्याच्या आणाभाका घेतो.
निरोपाच्या काही वेळा, प्रसंग माझ्या हृदयात अगदी तळाशी मी जपून ठेवले आहेत. निरोपाचा प्रसंग हा अगदी कातरच असायला हवा असेही माझ्या मनानं ठरवून टाकलं आहे. त्याला कारणही तसंच आहे. लहानपणी माझे वडील आमच्या पासून खूप लांब असायचे. नोकरीनिमित्त ते नेहमी परप्रांतात असायचे. त्यामुळे आमची भेट फक्त दिवाळी आणि उन्हाळी अशा मोठ्या सुट्ट्या असतानाच होत असे. सुट्टी संपताच पुन्हा परतताना ची, निरोपाची वेळ नको वाटते.
वडील आता सहा महिने भेटणार नसण्याची एक ओली, हळवी जखम मनाला होत असे. आगगाडी सुरु झाली कि, डोळ्यातून घळघळा वाहणारे पाणी आणि ते वडिलांना दिसू नये म्हणून प्रयत्न करणारी मी, अशी ती लढाई, माझे वडील माझ्या लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने पाहात असायचे. असा हा प्रसंग अजूनही माझ्या डोळ्यासमोर उभा राहायला की माझ्या डोळ्यात पाणी तरळतं.
दुसरा असाच प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. मी एस. एस. सी. ला असताना शाळेत झालेला आमचा निरोप समारंभ. खरंतर मला स्टेज ची भीती नाही. मला सगळ्यांसमोर बोलायलाही आवडतं. जमतंही. पण त्यादिवशी आता शाळा सोडायची, शाळेत शिकवणाऱ्या आमच्या लाडक्या बाई, ह्या सर्वांना सोडून नव्या विश्वात जायचं, ह्या कल्पनेनं कंठ दाटून येत होता आणि माझं तत पप होऊ लागलं. शब्द काही ओठातून बाहेर येईनात. शेवटी कसेबसे दोन शब्द बोलून मी जागेवर येऊन बसले. मला माझ्या मनातल्या सुवासिक आठवणी सांगायच्या होत्या. प्रत्येक बाईंनी मला काहीतरी अमूल्य शिकवण दिली होती त्याबद्दल धन्यवाद म्हणायचे होते. किंचितसं ऋण उतरवावं असं वारंवार वाटत होतं. पण भावनांच्या कल्लोळाने मला काहीच बोलू दिलं नाही. शाळेतली शिदोरी बरोबर घेऊन यशस्वी शिखरे चढू पाहात असलेल्या मला ती निरोपाची वेळ अजूनही हृदयाचे पाणी करते.
असाच एक निरोपाचा प्रसंग, जो प्रत्येक उपवर मुलीच्या आयुष्यात येतोच. तो म्हणजे मुलगी लग्नानंतर सासरी जातानाचा क्षण. तो क्षण इतका टचिंग असतो ना की अनोळखी मुलीचा निरोपाचा प्रसंग पाहिला, तरी न कळत डोळ्यातले मोती जमिनीवर टपटपू लागतात. ‘कन्या सासुरासी जाये, मागे परतुनी पाहे’ अशी तिची अवस्था होते. एका परक्या घराला आपलं म्हणायचं आणि आपल्या घराला निरोप द्यायचा. ह्या जगरहाटीला काय म्हणायचं? पण हे असं घडतं आणि असंच घडावं लागतं. ही निरोपाची वेळ इतकी नाजूक की जणू पानावरचे दवबिंदूच. जराशा धक्क्याने ही तुटणारी दवबिंदूं ची मालिका !!!
माझी ताटातूट करणारी, माझ्याशी फारकत घेणारी ती वेळ जी माझ्या मुलाला माझ्यापासून दूर लोटते, ती वेळ, तो क्षण मला नकोसा वाटतो.
बाळ जातो दूर देशा,
मन गेले वेडावून
आज सकाळ पासून
हात लागेना कामाला
वृत्ती होय वेड्यावाणी
डोळ्याचे ना खळे पाणी
अशी माझी अवस्था होते. मला माहीत असतं, तो त्याच्या ब्राईट फ्युचर साठी दूरदेशी जातो आहे. त्याच्या चांगल्यासाठीच तो जातो आहे. पण आईचं मन वेड असतं. ते काही मानायला तयार नसतं. त्या मनाला फक्त मुलाचा वियोग जाणवत असतो. होणारी घालमेल जाणवत असते. दूरी मुळे होणारं अंतर जाणवत असतं. त्यामुळे ती कटू अनुभव देणारी निरोपाची वेळ येऊच नये असं वाटत असतं. पण ती वेळ येते आणि मन घायाळ करून जातेच.
पण प्रत्येक निरोपाची वेळ अगदी दुःखदायकच असते, असे मात्र नाही. जेव्हा एखादी प्रियतमा आपल्या प्रियकराला भेटायला जात असते, तेव्हा ती घरच्यांचा निरोप घेताना अतिशय आनंदात, खुशीत असते. तिला प्रियकराची ओढ लागलेली असते. त्यामुळे निरोपाची वेळ ही ‘निरोपाची’ तिला वाटतच नाही !
मी नोकरी करत असताना एकदा असा चान्स आला की मला आणि माझ्या नवऱ्याला एकच ब्रांच मिळणार होती. मी अगदी आनंदात होते. त्यामुळे माझे कन्व्हेयन्सचे वगैरे बरेच प्रॉब्लेम्स सुटणार होते. पण म्हणतात ना कुणाकुणाला दुसऱ्याचं चांगलं बघवत नाही. तसंच झालं. आणि कोणी एका महाभागाने बॉसला चुगली केली. झालं ! माझ्या ट्रान्सफर वर गदा आली. मला हातात ऑर्डर आली ती तिसऱ्याच ब्रांच ची. पण तोंड दाबून बुक्क्याचा मार. बोलणार कुणाला ? कारण अशा गोष्टींना पुरावा नसतो. “आलिया भोगासी असावे सादर”, असं म्हणून गप्प बसणे, हेच आपल्या हातात. ही गोष्ट मला कळली केव्हा, जेव्हा तो माणूस रिटायर होणार होता. त्याचा निरोप समारंभाच्या दिवशी त्यानेच या गोष्टीची कबुली मला देऊन, सॉरी म्हटले. असंही होतं निरोपाच्या वेळेला माणसं खरं काय ते बोलून जातात.
भाद्रपदात गणेशोत्सव असतो. आपण सर्वजण गणपतीची अगदी आतुरतेने वाट पहात असतो. वास्तविक पाहता, गणपतीची मूर्ती म्हणजे मातीने बनवलेली एक निर्जीव वस्तू. पण दहा दिवस आपण मोठ्या उत्साहात त्याची पूजा करतो, एकत्र जमून मोठमोठ्याने आरत्या म्हणतो. असे करता करता दहावा दिवस उजाडतो. त्या दिवशी मात्र गणपतीचं विसर्जन करायचं, त्याला बिदा करायचं म्हणजे मन खिन्न होतं. गणपतीच्या विसर्जनानंतर मनाला एक प्रकारची रिक्तता येते. आपण म्हणतोच गणपती गेले गावाला चैन पडेना. आम्हाला गणपतीच्या निरोपाची वेळ चटका लावून जाते. जरी दरवर्षी आपण गणपती उत्सव साजरा करत असलो तरीही, कारण अगदी मनापासून भक्तिभाव त्यात ओतून आपण त्या उत्सवात समरस होऊन जातो. दहाव्या दिवशी घर कसं मोकळं मोकळं, सुनं सुनं वाटतं ते त्यामुळेच.
गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. या वाक्याचा अनुभव आम्ही जेव्हां खोपोली चे घर सोडून आलो तेव्हा आला. माझे घर कसे होते सांगते. आमचे घर, घर होते ज्यात होते घरपण भिंतींना होता ओलावा आणि आपलेपण.
घराने जपली नातीगोती नव्हता कोणी उपरा
दारे-खिडक्यातून वाहिला मन मोकळा वारा
प्राजक्ताचा सुगंध भरे प्रसन्नता घरात
उंबरठा करे स्वागत आल्या गेल्याचे दारात
शेजारधर्म पाळण्यात नीती घराची धावली
छप्पर आने धरली डोक्यावर मायेची सावली
ह्याच घराने दिला भरभक्कम आधार
दमदार पाऊले टाकीत चाले माझा संसार
ह्याच घराने पाहिली यशाची चढती कमान
म्हणाले, “जमिनीवर राहू दे पाय, ठेव हे भान”
तुला सोडून जाताना जड झाली पाऊले
ऊर भरले अडखळली उंबरठ्यात पाऊले
नि:श्वास टाक मोकळ्या घरा, घे शांत झोप
साश्रू नयनांनी मागे वळून घेते तुझा निरोप
प्रत्येकालाच एकदा आणि शेवटचा, कायमचा निरोप घेण्याची वेळ येणार असते. तेव्हा मात्र आपल्या स्वतःला नाही पण आपल्या आप्तेष्टांना, जिवलगांना, मित्र-मैत्रिणींना दुःखाचा चटका आपल्यामुळे लागतोच.
असे ऐकले आहे की मृत्यूही फार सुंदर असतो. त्याचाही अनुभव पुढे घेऊ. तर असा हा अगदी अंतिम निरोपाचा सोहळा. येण्याच्या वेळेला ही निरोपाची वेळ ही अशीच जोडलेली असते का ?
निरोपाची एक अशी वेळ त्या वेळी मन भरून येतं. मागे वळून पहावसं हि खूप वाटतं. पण मागे वळून पाहताना त्या क्षणी आपलं स्वतःचं जग रिकामच आहे असं वाटतं. डोळे मिटून आठवणींच्या जगात रमावं असं वाटतं. पण डोळे उघडताच मात्र अश्रुंचे ओहोळ वाहू लागतात. पण समोरच्याच्या आनंदासाठी त्या अश्रूंना ही बांध घालावाच लागतो. अशी ती वेळ म्हणजे निरोपाची वेळ. आणि तोंडातून शब्द फुटतात,
निरोपाची वेळ झाली आशिर्वचन द्यावी आता
चुकलं माकलं असलं काही, समजून थोडं घ्यावं आता…

– लेखन : शुभदा दीक्षित. पुणे
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
शुभदाताई सारेचं निरोप समारंभ खुप सुंदर शब्दात रेखाटले आहेत .वाचताना मन भरून आले .सुंदर लेख .👌👌👌👌 धन्यवाद।🙏🙏🙏🙏
A very soulful article….