आज गाडीत सहज रेडीओ लावला होता. मस्त लांबचा ड्राईव्ह होता. छान गाणी लावली होती. आवडती गाणी, सुंदर हवामान, बाहेर बघण्याजोगा सुंदर निसर्ग.
वाह ! सारं कसं जिथल्या तिथे जुळून आलेलं.
अशा छानशा वातावरणात मन कसं प्रफूल्लित झालं.
पण एक एक विचार मनात सतत डोकाऊ लागला. नविन विचारांसाठी मन कसं असं ताजं, मोकळं, शांत हवं, नाही का ? कसं आपण हव ते स्टेशन, हव्या त्या लहरी (फ्रीक्वेन्सी) आकर्षित करून लावतो नाही ? हिंदी गाणी नाही आवडली तर लगेच बदल करून मराठी लावतो. ते ही नाही आवडलं तर आणखी काही. पर्याय अनेक असतात. आपल्या मनाजोगत्या सफरीचा पुरेपूर आनंद लुटता यावा म्हणून आपण हर प्रकारे प्रयत्न करतो. प्रसंगी लहरी (फ्रीक्वेन्सी) बदलून किंवा हवी ती गोष्ट मिळेपर्यंत शोध घेऊन कसंही !
आता जरा विचार करा मित्रांनो, आपलं जीवन ही देखिल एक मोठी सफरच नाही का ? एका ठिकाणाहून सुरू होऊन कोण्या एका अज्ञात क्षणी थांबणारी !
पण या सफरीत मात्र आपण फक्त आणि फक्त शेवटच्या त्या बिंदूचाच विचार करत राहतो. इतका की त्याचं मळभ आपल्या अख्ख्या जीवनावर पसरत असतं. रस्त्यातून जाताना थोड्या काळासाठी असणाऱ्या प्रवासात आपण खूष राहण्याची इतकी काळजी घेतो. एखादा पर्याय आवडला नाही तर दुसरा स्विकारतो, शोध घेतो, न आवडलेल्या पर्यायात गुंतुन पडत नाही. मन आणि मेंदू हातात हात घालून प्रयत्न करतात. कशासाठी तर हवी ती गोष्ट हवं ते सूख मिळवण्यासाठी.
हे जर इतक साधं आहे तर प्रत्यक्ष आयुष्यात आपण नको त्या लहरी का सांभाळत बसतो ? ते ही ज्याचा त्रास होते अशाच. आपली सारी शक्ती पणाला लावून आपण अगदी चित्त एकवटून न आवडलेल्या गोष्टीला घट्ट कवटाळू पाहतो. कशासाठी ?
सहानुभूती मिळावी म्हणून ? की कोणी तिसऱ्यानी हवी ती भावनिक लहर आपल्याला मिळवून द्यावी म्हणून ?
तिथे का नाही आपण आनंदी लहरींचा पर्याय शोधत ? प्रवास सुखाचा व्हावा म्हणून प्रयत्न करत ?
रेडीओची हवी असलेली फ्रीक्वेन्सी मिळवण्यासाठी बटन मागे पुढे फिरवतो. अंदाज घेतो. शांतपणे ऐकतो. मग त्यानुसार हव्या त्या बाजूला फिरवून आवडती फ्रिक्वेन्सी मिळेपर्यंत शोधत राहतो, न थकता ! तेव्हा एकदाही मनात नको असलेल्या फ्रिक्वेन्सीशी रेंगाळण्याचा विचार येत नाही. उलटपक्षी ती जितक्या लवकर निघून जाईल, येणारी खरखर पटकन नाहीशी व्हावी म्हणून मनापासून प्रयत्न करतो. केव्हा केव्हा चिडतो, चरफडतो पण प्रयत्न सोडत नाही.
असेच आपणही स्वतःला स्वतःच स्वतःचे बटन होऊन हव्या त्या लहरींशी सामोरं का नाही करत ? तिथेही हव्या त्या दिशेस वळण्याचा, येणारी खरखर नामशेष व्हावी म्हणून प्रयत्न करण्याचा पर्याय असतोच की ! आपण मात्र तेथे नेमके उलट करतो. खरखरीचच एवढं अवडंबर माजवतो की योग्य काय ? अयोग्य काय ? नेमकी हवी ती दिशा कोणती ? ती मिळवण्यासाठी आपल्या स्वतःला कसं बदलाव लागेल या सर्वाकडे जराही लक्ष देत नाही आणि पूर्ण लक्ष त्या खरखरीवर देऊन स्वतःच स्वतःच्या समस्या वाढवतो, विचका करतो. मिळालेली सफर वाया घालवतो.
हे सारं करण्याचं बटन आपण स्वतःच आहोत हे का लक्षात येत नाही ?
या मधे आणखी भर असते ती म्हणजे आपले लक्ष दुसऱ्या समकालीन प्रवाशांची सफर कशी छान होतेय तिकडेच जास्त असते. तशी ती व्हावी म्हणून ते काय प्रकारचे प्रयत्न करतात याकडे मात्र सपशेल दुर्लक्ष केलं जातं.
मला वाटत मला काय म्हणायचय हे एव्हांना सुज्ञ वाचकांच्या लक्षात आलं आहे. रेडीओ ऐकताना आता आवडते गाणं एन्जॅाय कराच पण त्या बरोबरच आपली जीवन सफर आनंददायी व्हावी म्हणून सकारात्मक होऊन नक्की प्रयत्न करा !

– लेखन : शिल्पा कुलकर्णी. अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800