महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून देण्यात येणारा द्वितीय राज्यस्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार फलटण येथे नुकत्याच झालेल्या यशवंतराव चव्हाण साहित्य संमेलनात नगर येथून गेल्या 22 वर्षांपासून प्रकाशित होणाऱ्या “निशांत” दिवाळी अंकाचे संपादक निशांत दातीर यांना प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी संमेलनाध्यक्ष किशोर बेडकिहाळ, आमदार उल्हास पवार, माहिती उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर, हरणाई सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले, कार्याध्यक्ष डॉ.सचिन सुर्यवंशी, मसापचे फलटण शाखाध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे, जेष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, सौ.शोभा दातीर, स्वानंद पिंपुटकर, सौ.निर्मला दातीर आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना संमेलनाचे अध्यक्ष किशोर बेडकिहाळ म्हणाले, राजकारणात वैरभाव निर्माण केला जाता आहे, ऐतिहासिक कादंबर्यांना मनोरंजनाच्या मार्गावर नेण्याचा दुर्दैवी प्रकार घडत आहे. आज इतिहासाला वर्तमानाचे नायक करण्याची गरज आहे. त्यासाठी साहित्यिक, लेखक, कवी यांना पुढाकार घेणे आवश्यक आहे. अशा संमेलनात विचारांची देवाण-घेवाण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.
तर उल्हासदादा पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी वैश्विक मानवतेचा विचार मांडला. राज्यात उदारमतवादाची, मानवतेची संस्कृती टिकावी आणि महाराष्ट्र एकसंघ रहावा अशी त्यांची नेहमीच भूमिका होती. दुर्दैवाने त्यांच्या विचारांची प्रगल्भता आजच्या राजकारणात दिसत नाही. समाज परिर्तनात साहित्यिकांचे मोठे योगदान राहिले आहे. दिवाळी अंक हा घरोघर पोहचणारे वैचारिक साहित्य असल्याचे त्याचा यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो. अशा दिवाळी अंकास पुरस्कार देऊन प्रोत्साहित करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे श्री.उल्हास पवार यांनी सांगितले.
निशांत दिवाळी अंकास राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संपादक निशांत दातीर यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
– टीम एनएसटी.. ☎️ 9869484800