नमस्कार,
वाचक हो
विविधांगी दृष्टीने केरळ एक आकर्षक राज्य आहे. निसर्ग, मंदिरे, वन्यजीव, आयुर्वेद, मसाले, वनस्पती,सण समारंभ, आहार आणि अशाच अजून बऱ्याच केरळ मधील गोष्टी पर्यटकांना भुरळ घालत असतात.
या बरोबरच केरळचे अजून एक खास आकर्षण म्हणजे राज्याला लाभलेला अथांग, निळाशार सागरी किनारा. इथले विविध समुद्र किनारे पर्यटकांना वेड लावतात. यात्रा रोमांचक करतात असे म्हणले तरी हरकत नाही.
समुद्र किनाऱ्याची सुरुवात आपण केरळच्या उत्तरेपासून करूया. कासारगोड हा जिल्हा आहे . इथे बेकल फोर्ट बीच म्हणून प्रसिद्ध किनारा आहे. बेकल किल्ला (Bekal fort) हा केरळ मधील सर्वात मोठा किल्ला आहे. तो समुद्रालगत असल्यामुळे बेकल फोर्ट बीच या नावानेच बीच ओळखला जातो. किल्याची भव्यता आणि सागराची अथांगता दोन्हीही एकमेकांना शोभून दिसतात.
बॉम्बे या सिनेमातील गाण्याचे चित्रीकरण इथे झाले होते. अजूनही काही मल्याळी सिनेमांचे चित्रीकरण झाले आहे आणि होतेही.
कन्नूर जिल्ह्यात तल्लशेरी जवळ मुळप्पीलंगाड Muzhappilangad हा drive in beach प्रसिद्ध बीच आहे. इथे गाडीतून किनाऱ्यावर फेरफटका मारता येऊ शकतो. याबरोबरच पाराग्लाइडिंग , पारासेलिंग, माइक्रो लाइट फ्लाइट्स, वाटर स्पोर्ट्स, पावर बोटिंग याचाही आनंद इथे घेऊ शकता. हा भाग मलबार भाग म्हणून प्रसिद्ध आहे आणि महत्वाचे म्हणजे वरील सर्व गोष्टींचा आनंद घेतल्यावर मलबारी आहाराचा आस्वाद घ्यायला मात्र विसरायचे नाही.
कप्पाड बीच (kappad / kappakadavu) कोळीकोड जिल्ह्यामध्ये कोयलांडी या गावाजवळ हा बीच येतो. १४९८ मध्ये वास्को द गामांनी इथूनच भारतात प्रवेश केला होता. यांची आठवण म्हणून इथे एक स्मृति चिन्ह ही उभारलेले आहे.
इथूनच गुरुवायूरला आल्यानंतर मंदिरापासून जवळ असलेला अजून एक बीच म्हणजे चावक्काड बीच (chavakkad) श्रीकृष्णाचे दर्शन घेवून या किनाऱ्यावरती जायचे. मुक्तपणे पाण्यात खेळत, वाळूत घर करत निवांत सागरी लाटांशी मस्ती करायची. जसं जशी संध्याकाळ होते जाते तेव्हा किनाऱ्यावरची लगबग वाढलेली असते. ती म्हणजे मासेमारीसाठी गेलेल्या कोळ्यांची परत यायची वेळ झालेली असते त्यामुळे..
एक एक बोट किनाऱ्याला येवून थांबत असते. आणलेली मासळी बाहेर काढून विकण्यास व्यवस्थित ठेवून त्यांचा लिलाव करण्याची गडबड चालू होते . माश्यांचा लिलाव करताना पाहणे म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो. यावेळी मासे खरेदीसाठी आलेले लोक, पर्यटक, कोळी बांधव सर्वांनी किनारा गजबजून गेलेला असतो आणि या गर्दीतून दूर असलेला गडद तांबडा गोळा हळू हळू अस्ताला चाललेला असतो. हा नजारा म्हणजे अवर्णनीय..
गुरुवायूर मधील कृष्णाच्या दर्शनानंतर संध्याकाळ अशी सागराच्या सोबतीत घालवणे म्हणजे दिवस सार्थ झाल्याची भावना होते.
क्रमशः
– लेखन : सौ.मनिषा पाटील. पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800