जीवन जगत असताना सर्वांच्याच आयुष्यात संघर्ष अटळ आहे. तो कमी अधिक असू शकतो पंरतु संघर्ष अटळच. ज्या लोकांमध्ये शारिरीक क्षमतेचा अभाव असतो म्हणजे दिव्यांगता असते अशा लोकांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अधिक संघर्ष करावा लागतो. मात्र, अशक्य असे काहीच नाही.
दिव्यांगांनी अनेक क्षेत्रात प्रगती केली असल्याची प्रचिती नुकत्याच आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसाच्या निमित्त राष्ट्रीय कार्यक्रमात झाली. डोळयाचे पारणे फिटतील असा विविध क्षेत्रात दिव्यांगांनी आपल्या कामाचा डंका वाजवला आहे.
नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वर्ष 2021-22 मध्ये सर्वोत्कृष्ट कार्य केलेल्या दिव्यांग व्यक्तींना, गैरशासकीय संस्थेला तसेच राज्य शासनाला नुकतेच राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
पाहू या, त्यांचे थोडक्यात कार्यकर्तृत्व…
नागपूरचे उद्योजक जयसिंग चव्हाण यांना सर्वश्रेष्ठ दिव्यांग व्यक्तीच्या श्रेणीतील राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
श्री चव्हाण हे 87 % अस्थिव्यंग आहेत. तरी त्यांची जिद्द एवढी की त्यांनी वित्त विषयात एमबीए केले. त्यांची स्वत: ची रंजना ग्रुप ऑफ इंडण्स्ट्री्ज प्रा. लि. ही कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत 200 पेक्षा अधिक लोकांना प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यापूर्वी 2007 मध्ये त्यांना उत्कृष्ट दिव्यांग स्वंय उदयोजक या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. श्री चव्हाण यांची संघर्ष गाथा खरच कौतुकास्पद आहे.
औरंगाबाद येथील महात्मा गांधी सेवा संघ ही संस्था दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेला सर्वोत्कृष्ट संस्था या श्रेणीतील पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ही संस्था 1994 मध्ये स्थापन करण्यात आली. या संस्थेव्दारे दिव्यांग व्यक्तींना आरोग्य सेवा, सामाजिक, शैक्षणिक व पूनर्वसनात्मक अशा महत्वपूर्ण सेवा ही संस्था पुरविते. यासह या संस्थेने केंद्र तसेच राज्य शासनास धोरण तयार करण्यासाठी नॉलेज पार्टनर म्हणून कार्य केले जाते. आतापर्यंत 1 लाखाहून अधिक दिव्यांग वृद्धांना सहाय्यक साधने, उपकरणे वितरित करण्याचे उदात्त काम या संस्थेने केले आहे. दिव्यांगांच्या शिबिरांचे आयोजन या संस्थेच्यावतीने नियमित करण्यात येते.
एखाद्या शासकीय अधिकाऱ्याने ठरविले तर काहीच अशक्य नाही हे अकोला जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी सिद्ध करून दाखविले. त्यांनी दिव्यांग अधिकार कायदा तसेच वैश्विक ओळखपत्र प्रणाली (UIDAI) तथा दिव्यांग व्यक्तींसाठीच्या योजनांची अकोला जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी केली. त्यांसाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रपती यांनी सन्मानित केले हे विशेष.
अकोला जिल्ह्यातील दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात आले.
आधी अकोला जिल्ह्यात केवळ 13 हजार दिव्यांग होते. मात्र, श्री कटियार याच्या नेतृत्वाखाली झालेल्या सर्वेक्षणामुळे 32 हजार दिव्यांगांची भर पडली, हे विशेष. जिल्ह्यातील दिव्यांगांची आरोग्य तपासणी व प्रमाणपत्र वाटप तसेच दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र कार्डाचे वाटप करण्यात आले. या सर्वांना आता दिव्यांगांसाठी असणा-या योजनांचा लाभ मिळणार असून वंचितांसाठी हे मोठे संचितच ठरेल.
महाराष्ट्र : सुगम्य भारत अभियान
भारत सरकारची दिव्यांगासाठी “सुगम्य भारत अभियान” अशी योजना आहे. या योजनेंतर्गत शासकीय इमारती, मैदाने, सार्वजनिक परीवहनच्या ठीकाणी दिव्यांगाना सुलभता यावी यासाठी ही योजना आहे.
यात महाराष्ट्राने बाजी मारली. राज्याला ‘सुगम्य भारत अभियान’च्या उत्कृष्ट अंमलबजावणी करण्यासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या अभियानातंर्गत महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या चार शहरातील 137 इमारती सुगम्य करण्यात आलेल्या आहेत. याकरिता केंद्र शासनाकडून आतापर्यंत 2197.38 लाख रूपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. यासह या अभियानातंर्गत 24 संकेतस्थळे सुगम्य करण्यात आलेली आहेत. राज्यातील 29 % परिवहन सेवेतील वाहतूक साधने विशेषत: बस सुगम्य करण्यात आलेल्या आहे.
सर्वश्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती श्रेणीतील पुरस्कार ठाणे जिल्ह्यातील अशोक भोईर यांना प्रदान करण्यात आला.
श्री भोईर हे 75% अस्थिव्यंग आहेत. श्री भोईर यांचे व्यकिमत्व अंत्यत क्रियाशील आहे. ते गोळा फेकणे आणि भाला फेकणे या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहेत. त्यांनी दिव्यांगांसाठी स्वंयस्फुर्तपणे विविध संस्थेच्या माध्यमातून तसेच व्यक्तिगतरित्या कार्य केलेले आहे. श्री भोईर हे कलाकार ही आहेत. त्यांचा रांगडा आवजातून शब्द फेक करण्याची स्टाईल भारी आहे.
पुणे जिल्ह्याच्या विमल पोपट गव्हाणे यांना श्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती या श्रेणीतील पुरस्काराने राष्ट्रपतींनी सन्मानित केले. त्या पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पेरणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला आरोग्य कर्मचारी या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी कोविड महासाथी दरम्यान रूग्णांचे लसीकरणाच्या कामात वरिष्ठ वैद्यकीय अधिका-यांसोबत महत्वपूर्ण भुमिका बजावली. कुटूंब नियोजन, पल्स पोलिओ लसीकरण, 0 ते 16 वर्ष वयोगटातील बालकांचे लसीकरण, यासह आरोग्य केंद्रातंर्गत राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्याच्या उपक्रमांमध्ये हिरहिरीने श्रीमती गव्हाणे यांचा सहभाग असतो.
डॉ. शुभम धूत यांनाही श्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती श्रेणीतील पुरस्काराने गौरवविण्यात आले. डॉ. धूत हे टिळक आयुर्वेद महाविद्यालय, पुणे येथे कार्यरत आहेत. सात वर्षे संशोधन करून हेमोफिलिय ह्या दिव्यांग प्रवर्गातील आजारावर कायमस्वरूपी ‘रक्तामृत’ आयुर्वेद औषधाचा महत्वाचा शोध त्यांनी लावला आहे. त्यांना यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आयोजित आविष्कार संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. म्हणतात ना जहाँ चहाँ वहा रहाँ…. डॉ. धूत यांनी निश्चय केला की, दिव्यांगासाठी औषध तयार करायचेच आणि ते त्यांनी संशोधनाअंती तयार केलेच.
डॉ. भाऊसाहेब बोत्रे : संशोधन पुरस्कार
मूळचे पुण्याचे डॉ भाऊसाहेब बोत्रे यांना संशोधन क्षेत्रातील दिव्यांग सक्षमीकरण पुरस्काराने गौरविण्यात आले. ते 100% गतिविषयक दिव्यांग आहेत. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये पीएचडी केलेली आहे. ते सध्या सीएसआईआर राजस्थान या संशोधन संस्थेत मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असल्यामुळे त्यांना राज्यस्थान सरकारकडून पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे.
दिव्यांगांसाठी ई-असिस्ट ट्राइसाइकिल बनविली आहे. जी रस्ते, पुलांवरून, डोंगराळ भागातून सहज जाऊ शकेल. या ट्राइसाइकिल ची गती 20 किलो मीटर प्रती तास अशी आहे तसेच 4 किमी रिवर्स गती आहे.
250 वाट, 24 वोल्ट क्षमतेची असून इलेक्ट्रॉनिक नियंत्रक, व्हील हब बीएलडीसी मोटर, हैंड पैडल, उच्च प्रतीचे ब्रेक सर्किट, नियंत्रित इलेक्ट्रॉनिक ऊर्जा आणि गती ने पुर्ण अशी ही ट्राइसाइकिल आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक पावर नियंत्रित मोटर आणि हैंड पैडलिंग असे दोन्ही आहे. श्री बोत्रे यांच्या नावे दोन स्वामित्व (पेटेंट), आणि कॉपी राईटच्या नोंदी आहेत.
हे सर्व पुरस्कार विजेते केवळ दिव्यांगासाठीच आदर्श नसून सर्वच लोकांसाठी आदर्श आहेत, हे त्यांचे कार्य बघून निश्चितच वाटते. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

– लेखन : अंजु निमसरकर.
माहिती अधिकारी, महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800