Monday, June 16, 2025
Homeसाहित्यपर्यावरण : काही कविता...

पर्यावरण : काही कविता…

आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने काही कविता सादर करीत आहे.
— संपादक

१.

फुलांची शपथ घेऊन
पानापानांवर
मी असे प्रतिज्ञापूर्वक
लिहून देतो की

“मला मुळापासून
झाडांना जोपासण्याची
खोड आहे”
आणि हेच
माझ्या कष्टाचे
फळ आहे…

— रचना : अशोक बागवे. ठाणे

२. वृक्ष वल्लरी

वन सखे, वृक्ष वल्लरी
सहा ऋतु जीवन बहरी
किलबिल पक्षी अवीट गोडी
शुभ्र कपिला, खिल्लारी बैल जोडी

संवर्धन करुनी सृष्टीचे
प्रेम करावे निसर्गावर
भान राखुनी भवतालीचे
स्वार होऊन विज्ञानावर

अलौकिकाने दान द्यावे
दोन करे लुटून घ्यावे
आनंदाचे सोहळे करावे
कृतज्ञतेंने भारून जावे

जपावे पर्यावरण
सदा संधी साधून
ध्यास हरित क्रांतीचा,
वसुंधरेचा मान राखून

घेणे देणे व देणे घेणे
नियम आहे जगण्याचा
कर्तव्याचा धर्म जाणणे
हाच मंत्र आयुष्याचा.

— रचना : मीरा जोशी. नवी मुंबई

३. वृक्षवल्लींची व्यथा

असे कसे हे उलटे काळिज
उगा तोडशी मला
जगण्यासाठी मीच पुरवितो
प्राणवायू सकला

प्रदूषणाच्या विळख्यामध्ये
तुझा कोंडला श्वास
परी न सरला स्वार्थ तुझा
अन् संपत्ती-हव्यास

फळे, फुले अन् विहग
विहरती माझ्या खांद्यावरी
वने वनचरे सुखात होती
माझ्या भरल्या घरी

विकास करण्या तुम्ही
फिरविली कुऱ्हाड रानावरी
आज वायुची भीक मागता
पडता आजारी

आता तरी तू उघड लोचने
समजून घे धोका
वृक्षवल्ली आम्हा सोयरे
सांगून गेला तुका

— रचना : सुरेश शेठ. पुणे

४. पाऊस

अरे पावसा पावसा
तुझा नाही भरवसा
शेती पडली ओसाड
सांग नांगरू मी कसा?

येतो भरल्या पिकास
कसा घडावा विकास?
ऐन वेळी नेशी जेव्हा
पिक येते रे हातास

कधी वादळ वाऱ्यात
पिक पडती आडवी
भुकमार घडवोनी
नेत्री दाटती कडवी

येते पिक महामूर
भाव जाती घसरून
सारी सोनेरी स्वपने
क्षणार्धात विसरून

मोत्यावाणी पिकावर
टोळ धावे अचानक
मन जातसे विटून
ऊरी भरते सनक

निरंतर देतो पिडा
काळजाचे हो तुकडे
सांग देवा आता घालू
कोणा देवीला साकडे !

— रचना : सौ.शोभा  कोठावदे. नवी मुंबई

५. एक झाड लावावं…..

आपल्या जगण्यासाठी, फक्त एक करावं,
जे आपल्याला आवडतं, ते झाड लावावं,
रोप आणावे उत्साहाने, त्याला रुजवावं,
थोडी निगा राखून, खत पाणी घालावं,

रोप बहरते, मोठे होते, पाने, फुले लागती,
कुणा सावली आवडे, कुणी फुले देवास वाहती,
फळ देणारा वृक्ष होई, त्याची वाढे महती,
मग विस्तार होई सुंदर, पक्षी बांधती घरटी,

किलबिलाट पक्षांचा चाले, खेळती बागडती मुले,
प्रसन्न हिरव्या वृक्षाखाली, विसावती पथिक थकले,
कुणी येती तरुतली जेवती, हास्य मधुर बोले,
हे सारे घडते ज्यामुळे, हे वृक्ष कुणी लावले,

म्हणून म्हणतो, झाडे लावा, फुले फळे राखावी,
उद्याने बांधा, छान सावली, सहभोजने करावी,
एकत्र येऊनी, सहवासाचा, घेऊ या आनंद,
जगणे सुंदर, हिरवा परिसर, मित्र, आप्त आणि छंद…!!!

– रचना : हेमंत भिडे. जळगाव

६. “निसर्ग निखळ सुंदर”

पहाटे उठता म्हणावे सर्वां सुप्रभात
चैतन्य मिळेल आपोआप निसर्गदत्त !!धृ!!

निसर्ग सदा माणसाशी बोलतो निखळ
मनाचा आरसा प्रतिबिंब दिसे निर्मळ
हिरवाई ठेवते तजेलदार सुमन !!1!!

निळे विस्तीर्ण आकाश असते भवताल
पाखरे विहरतात स्वच्छंदे अंतराळ
खगांची चिव चिव बनते जीवन संगीत !!2!!

विना साधना कोण शिकवते हे संगीत
तुकोबा म्हणती उद्याने कोकीळ गाते गीत
जीवन बहरे खुलवे फुलवे सप्त नाद !!3!!

फुलांचा गंध आयुष्याचा असे मधुमास
रंगसंगती लाभते निसर्गदत्त लोभस
उमलती विभिन्न वेळी आकार सुगंध !!4!!

सूर्य चंद्र उदय अस्त देती नित्यानंद
ना कंटाळा ना कधी कोणाची पहात वाट
सदा असे त्याग ना निंदा ना कशाची खंत !!5!!

ना धरी खोटा मुखवटा स्वरूप सत्य
ना कसली हूर हूर कृतज्ञता ना बोज
स्थित्यंतरे घडती तरी सर्व स्थितप्रज्ञ !!6!!

निसर्ग पहावा वाचावे ऐकावे संगीत
जे ठेवी मनांस ताजेतवाने अनुलीप्त
सर्व कर्म देते नित्य नवा शोध आनंद !!7!!

— रचना : अरुण गांगल. कर्जत, रायगड

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ.  ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments