नमस्कार, मंडळी.
आज ५ जून. जागतिक पर्यावरण दिन. या निमित्ताने पर्यावरणविषयक जागृती करणाऱ्या काही कविता वाचू या….
१. अनवट फटका !
अनवट आहे वाट वेगळी,
रुळल्या रस्त्या जाऊ नको ।
वसुंधरेची लाज राखण्या,
मागे पुढती पाहू नको ।।१।।
ओला कचरा सोने आहे,
मॅजिक बास्केट आण तू घरी ।
कचऱ्याचेही खत बनवोनी,
भाजीपाला उगव घरी ।।२।।
ऑरगॅनिक शेतीचाही,
प्रयोग करण्या विसरु नको ।
इमारतीच्या गच्चीवरती,
भाजी पिकव तू हरु नको ।।३।।
बीजगोळयाचा प्रयोग कर तू,
झाड लावण्या चुकू नको ।
चिमण्यापाखरा दाणे टाक तू,
पाणी ठेवण्या विसरु नको ।।४।।
मियावाकी अन् खारफुटीच्या,
जंगलासाठी झटत रहा तू ।
भाज्या फळांच्या बिया साठवुनी,
कस मातीचा वाढव तू ।।५।।
पातळ प्लास्टिक शत्रू आपला,
मोहात त्याच्या पडू नकोस ।
कापडपिशवी घेऊन जा तू,
गाईगुरांना विसरु नको ।।६।।
सौरशक्तीचा वापर करुनी,
बचत वीजेची करत रहा तू ।
नियोजनाने पाणी वापरुन,
पुनर्वापर करत रहा तू ।।७।।
घरादाराची स्वच्छता करण्या,
लाज वाटून तू घेऊ नकोस ।
गांधीजींच्या मार्गावरती,
अढळ रहा तू ढळू नकोस ।।८।।
आवाज टी.व्ही.चा, हाॅर्न गाडीचा
ध्वनीप्रदूषणा, मदत करी ।
पी.यू.सी. चा वापर करूनी
निसर्गचक्रा, साथ करी ।।९।।
मोठेपणाचा आव आणुनी,
एकटा हाकवीत जाऊ नकोस।
एस्.टी.आणिक रेल्वे सेवेतून,
इंधन वाचवत रहाच तू ।।१०।।
परंपरांच्या जोखडामध्ये,
विनाकारण तू अडकू नको ।
काळाप्रमाणे विचार बदलून,
नव्या रस्त्यावर चालत रहातू ।।११।।
देशी गाईचे महत्व ओळखून,
रोगमुक्त होत रहा तू ss ।
आत्मनिर्भरतेच्या मार्गी,
पहिले पाउल टाकून पहा तू ।१२।।
महामारीच्या काळामध्ये
मानवतेला, विसरू नको ।
माणुसकीच्या मार्गाने तू,
सृजनासाठी झटत रहा तू ।।१३।।

– रचना : शोभा नाखरे, मुंबई .
२. पृथ्वीचे सप्तरंग
सृष्टीचा रंग चितारी असे श्रीरंग
निसर्ग निर्मित असती सारे रंग ।।ध्रु।।
पर्जन्य बरसतो विरहीत रंग
इंद्रधनु दावी क्षणिक सप्तरंग
सुमन एक दिवस जगण्यात दंग
फुलाला मातीचा गंध उधळते रंग ।।2।।
करावा माणसाने, भूमीशी सत्संग
संगीत कला संस्कृती दावी बहुरंग
स्मरावे सर्वांचे ऋण आनंद तरंग।।3।।

– रचना : अरुण गांगल. कर्जत, रायगड
३. हिरवा शालु
शालु हिरवा होता पांघरलेला,
ह्या वसुंधरेच्या अंगावरती,
सिमेंट काॅंक्रेट वाल्यांनी,
अशी नांगरली ही धरती ||१||
निसर्गावर होती मानवाची,
एकेकाळी जिवापाड माया,
रस्ते, सिमेंट, काॅंक्रेटीकरण,
शहरीकरणामुळे गेली वाया ||२||
अशा गर्द हिरव्या जंगलात,
झाडं तोडुन, प्राणी मारुन,
स्वतःच्या स्वार्थापायी,
घेती पोटाचे खळगे भरुन ||३||
ह्या घनदाट जंगलामधी,
गात असे मंजुळ गाणी,
येत असे आवाज पक्ष्यांचा,
वाहत होते खळखळ पाणी ||४||
झाडे तोडली, वृक्ष मारली,
पर्यावरणाचा नाश केला,
श्वास घेण्यास माणसा,
आता प्राणवायु नाही उरला ||५||
पाणी आडवा, पाणी जिरवा,
विचार पुढचा नवी संकल्पना,
नका करू पाण्याची नासाडी,
आता विचार अंमलात आणा ||६||

– रचना : प्रविण खोलंबे. मुरबाड, जि.ठाणे.
४. वसुंधरा
~~~~~~~
नकोस होऊ क्रूर मानवा
नकोस घालू घाव
तूच मारिशी तुला स्वतःला
पुरे जाहली हाव…..
उजाड करिसी तू धरणीला
सांभाळी रे तू संतुलन
जगण्यासाठी प्राणवायूला
मिळवी करूनी वृक्षारोपण…..
मेघ अडविण्या डोंगर माथे
कुठे राहीले आता ?
तहानलेली धरणी बिचारी
कशी शमेल आता ?…..
नद्या नाले दूषित झाले
औद्योगीकरणानी
पर्यावरणा जपायचे आम्ही
झाडे लावुनी आणि जगवुनी…..
हिरवी हिरवी वने गेली
जागोजागी इमारती
काँक्रीटच्या या जंगलांनी
वसुंधरेवर आपत्ती…..
ऊठ मानवा जागा हो
अजुनही वेळ गेली नाही
सृष्टीदेवीला पुन्हा सजवुनी
आनंदाने तू राही…..

– रचना : अरूणा मुल्हेरकर. मिशिगन, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🙏अनवट फटका आणि वसुंधरा कविता जासि आवडल्या 👍🌷
सर्व कविता सुंदर .पर्यावरणाचे संरक्षणाचा संदेश देणाऱ्या .👌👌👌👌