“रागावलीस ?”
“रुसलीस ?”
“काही दुखतंय का ?”
“काही खुपतंय का ?”
“कोणी त्रास दिला का तुला ?”
“कोणी काही बोललं का ?”
“तुझं काही हरवलंय का ?”
“नाही.. नाही..नाही !”
“मग काय झालंय तरी काय तुला ?”
“मला कंटाळा आलाय..खूप खूप कंटाळा.. रोज उगवणारा दिवस कधी ताजा वाटेनासाच झालाय. रोजचं रुटीन कसं अगदी शिळं शिळं झाल्यासारखं वाटतंय..”
या अश्या कंटाळा येण्याला काही पर्याय नसतो. तो येतो, रेंगाळतो.. कधी काही वेळ.. कधी काही दिवस.. तर कधी काही वर्षे..काही सुचत नाही, कुणाशी बोलावसं वाटत नाही, कोणी आपल्या कंटाळ्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारले तर अजूनच कंटाळा येतो. एरवी पळत पळत जाणारा वेळ आता अगदी ठिय्या देऊन आपल्यापाशी बसूनच रहातो. जाता जात नाही.कशाचा कंटाळा आलाय ते सांगताही येत नाही.. फक्त तो येतो कधी कधी एव्हडे मात्र खरे !
या अशा कंटाळ्यावर एक मस्त उपाय असतो. कोणाच्या तरी घरी, किंवा एखाद्या सहलीला चार दिवस जाऊन यावे. तिथली पहाट उमलताना पहावी. हो.. प्रत्येक ठिकाणची पहाट वेगवेगळी असते. ती अनुभवावी.. आपल्याला ती अनुभवून ताजेतवानं व्हायला होतं..
काही ठिकाणची पहाट उमलते ती गजरांच्या आवाजाने..प्रत्येकाने आपला गजर लावलेला.. आपापल्या वेळेचा.. त्यामुळे थोड्या थोड्या फरकाने वेगवेगळे गजर वाजत रहातात..
त्यातही गंमत.. कोणी एखादा गजरापूर्वीच जागा होता.त्याच्या डोक्यातील कामांच्या गर्दीमुळे त्याला वेळेपूर्वीच जाग येते.कोणाच्या डोक्यात एखादे function असते..त्याचे वेध लागलेले असतात.. त्यामुळे त्याच्या डोक्यात excitement असते. कधी function होऊन गेलेले असते, पण त्याच्या गोड आठवणींमुळे नीट झोप लागलेली नसते..त्याची झोप आठवणीतच विरघळलेली असते.
कोणी एखादा झोपेतून उठता उठता आळसटलेलाच असतो., तर कोणी एखादा गजर बंद करून कूस बदलून पुन्हा एक डुलकी काढतो..!
कोणी उठल्या उठल्या चहा, कॉफी, दूध काहीच घेत नाही. तर काहींचा दिवस चहाशिवाय उगवतच नाही. त्यातही कोणाच्या चहाला गवतीचहाचा वास, तर कोणाच्या पहाटेला आलं, वेलदोड्याचा वास..!
कोणाला उठल्या उठल्या नुसतेच कोमट पाणी..!
कोणी एखादा तो किंवा ती, पहाटे सर्वांच्या आधी उठते, देवाशी प्रथम उदबत्ती लावता लावता स्तोत्रे गुणगुणते.. कोणी स्वतःची आन्हिके उरकून लवकर पूजा करते.
काहींची पहाट भक्तीगीतांनी उजाडते. नंतर कधी कधी रेडिओ वरून ‘चिंतन’ या सदराचा आवाज ऐकू येतो..
कोणी उठल्या उठल्या आपला मोबाईल चार्जिंगला लावते. कोणाच्या गुड मॉर्निंगच्या मेसेज मधे कधी फुले, तर कधी वाफाळत्या कॉफीचा मग आलेला असतो..
कोणाच्या दिवसाची सुरुवात व्यायामाने होते, कोणाची जिममध्ये जाण्याने, तर कोणाची सायकलिंगने !
कोणी कोणी फक्त चालत फिरायला जाणेच पसंत करतो.
काही घरांमधून पहाटे पहाटे पाठोपाठ पाठोपाठ शिंकांचाच आवाज ऐकू येत असतो.
कोणा कोणाला पहाटे उठल्यावर काही वेळापुरती सर्दी झालेली, तर कोणाचा आवाज काही वेळापुरता घोगरा झालेला.. कोणाकोणाचा वाफारा, तर कोणाच्या खाकरण्याचा आवाज !
कोणाला पहाटे पहाटे एखादे स्वप्न पडलेले असते. त्यानेच जाग येते. कधी ते गोड असते, तर कधी भयावह.. दचकूनच जाग येण्याजोगे.. मग उगाचच चिंता.. ते खरे तर होणार नाही ना याची..नंतर दूधवाल्याची बेल..
कधी परगावची, एखाद्या सहलीची पहाट अनुभवावी..उदाहरणार्थ.. कोकणची पहाट.. तिथली हवा वेगळी, झाडे वेगळी, पाखरे वेगळी, अंगणे वेगळी..सडा रांगोळीने सजलेली..कोंबड्याच्या आरवाने उजाडलेली पहाट.. तिथल्या पक्ष्यांचा चिवचिवाटही वेगळाच !
कोणाच्या माजघरातून येणारा आरत्यांचा आवाज..कधी बाजूच्या छोट्या छोट्या देवळांमधून येणारा अभंगांच्या रेकॉर्ड्सचा आवाज..
कोणाचा वाडीत फेरफटका.. तर कोणाचे हातात परडी घेऊन देवासाठी फुले, दूर्वा, तुळस आणणे..
काही काही घरांमधे अगदी पहाटे पहाटे होणाऱ्या आंघोळी.. त्याशिवाय घरात वावरायचेच नाही हा शिरस्ता..
कोणाची पहाट उजाडते ती थायरॉईड/बी. पी. च्या गोळ्यांनी..
कोणाची पहाट उजाडते घरात प्यायचे पाणी भरण्याने, तर कोणाकोणाची उठल्या उठल्या पंप लावण्याने..!
कधी पहाटे पहाटे सहा वाजता अजुन अंधारच, तर कधी सहा वाजता अगदी फटफटीत उजाडलेले ! तर कधी कधी पहाटे पहाटे संधीप्रकाश.. सोनसळी पिवळा..
कोणाच्या घरातून डब्याची गडबड.. पहाटे पहाटे कुकरच्या शिट्ट्या..तर कोणाकोणाच्या खिडकीतून कांद्यापोह्याचा वास..!
कोणाकोणाचे लगेच आपल्या कुत्र्याला चक्कर मारायला नेणे.. तर काहींचे पहाटे पहाटे पेपर वाचणे..
खरंच पहाट किती किती वेगळ्या वेगळ्या प्रकारे उमलत असते नाही ठिकठिकाणची..!
मग या की तुम्हीही फिरून थोडं.. तुमच्या घरची पहाट मग पुन्हा नव्याने बहरून येईल.. मग आलेल्या कंटाळ्याला थारा तो काय..!!

– लेखन : सौ. अनुराधा जोगदेव.
– संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800