१. ऋतू पावसाळा
बदललेल्या ऋतुसारखा
तोही येतो रूप बदलून
कधी ग्रीष्मातलं ऊन
तर कधी …
गारव्याची झुळूक होऊन
रस्त्यामध्ये भेटतो अवेळी
भर दुपारी अवचित कधी
अबोल कळ्या ओठांवरच्या
आतल्या आत सुकण्याआधी
मौनातूनच होतात व्यक्त
गुपितं अंतरी दडलेली
ओल्या देहाची अबोल भाषा
मनात अलगद रुजलेली
काळेसावळे रूप पाहुनी
जीव प्रेमात पडतो वेडा
नाद अनाहत कानी येता
पडतो जसा फुलांचा सडा
रानफुलांचे बांधून पैंजण
नाच नाचतो माझ्या सुरावर
ओढ अनामिक रुजवुनी जातो
जादू करतो खुळ्या मनावर
छेडत राहतो गोड आलाप
कोकिळेच्या कंठातून
पाहत राहते मीही त्याला
मग पाना पानाआडून
ऋतू आले खेटुनी गेले
ना दुसरा मनात रुजला
पुन्हा भेटण्याचे वचन देऊन
पाऊस काळीज घेऊन गेला

– रचना : लता गुठे
२. पाऊस…
रिमझिम धारा बरसू लागल्या, मृदगंध हा करी बेभान
रेशीम स्पर्शाने त्या हरखून गेले हिरवे रान ll
झुळझुळ झरे वाहू लागले माझ्या शेता मधूनी
मोर ही आनंदे नाचू लागले छान पिसारा फुलवूनी ll
फडफड करून पंख आपुले, पाखरे ही आनंदली
थेंब झेलण्या पावसाचे ती अधीर किती जाहली ll
इवले कोंब फुटू लागले माझ्या मायभुईवर
बळीराजा ही आनंदला ती बघून रिमझिम धार ll
आगमन हे वरुणराजा चे रवि ही पाहे ढगा आडूनी
इंद्रधनू ची कमान करुनी स्वागत करतो थेंबातूनी ll
सुरू जाहले सणही आता, बाल मैत्रिणी त्या आठवल्या
गळाभेट ही घेण्यासाठी सख्या साजण्या आतुरल्या ll

– रचना : नीता य. देशपांडे.
३. ••• पहिला पाऊस •••
वादळवारे सुटले
घन ओथंबुनी आले
जल कोसळु लागले
अवनी जलमय ……….१
जलद गडगडती
चपला कडकडती
पवन भिरभिरती
आसमंत भरून …….२
धुळीचे साम्राज्य गेले
गच्ची अंगण नहाले
पाऊसधारा कोसळे
आवाज करुनिया. …३
जलानी शिवार भरले
चिखल साम्राज्य आले
जल फारच कोसळे
प्रुथ्वीवरी सर्वथा …….४
सभोवार कल्लोळले
महापूरी झोडपले
नुकसान खूप झाले
सर्वदूर देशात ……….५

– रचना : पांडुरंग कुलकर्णी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सर्व कविता अप्रतिम.
पावसाच वर्णन खूप छान केलं आहे.
ऋतू पावसाळा. कवितेच शेवटचं कडव मनाला
भाऊन गेलं.
“पाऊस काळीज घेऊन गेला ‘
अतिशय उत्तम.
सर्व कवीचे /कवयत्री अभिनंदन
🌹🌹🌹🌹🌹
अशोक बी साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ