“दीपशिखा कालिदास”
दीपशिखा कालिदास, महाकवी कालिदास यावरची प्रसिद्ध चरित्र कादंबरीकार शुभांगी भडभडे यांची एक अप्रतिम कलाकृती. प्रथम आद्य शंकराचार्य आणि आता राज कवी कालिदास. अत्यंत गहन विषय घेऊन अतिशय समर्थपणे मांडणारी त्यांची शब्द सरिता इतक्या लयबद्ध, ओघवत्या आणि शब्द सौंदर्याने प्रवाहित असते की कादंबरीला न्याय देताना तुम्ही अंतर्मुख होता. अशी ही कादंबरी आणि त्यांच्या शब्दातून उलगडत जाणारा कालिदास वाचताना तुम्ही निश्चितच आत्ममग्न आणि निस्तब्ध होता आणि एक अनुपम कलाकृती वाचण्याचा निर्भेळ आनंद तुम्हाला सहज येतो.
अस्ति कश्चित वाग्विशेषः ह्या वाक्या पासून सुरू झालेला महाकवी, राजकवी, राज्य कवी पर्यंतचा कालिदासाचा एक अत्यंत संघर्षपूर्ण, मनोहारी, साहित्यिक, प्रेम रसाने ओथंबलेला, राजकीय, आणि आयुष्यभर एका वेदनेला आपल्या अंतर्मनात सतत जागृत ठेवून त्यासाठी संपूर्ण आयुष्याचं ते ध्येय मानणाऱ्या कालिदासाचा एक अत्युत्कृष्ट चित्रण कादंबरीतून इतक्या सुंदरतेने साकार झालंय की आपल्या नेत्रा समोर कालिदासाचं ते तेजस्वी आणि आपल्याला सत्य वाटावं इतकं सजीव चित्रण लेखिकेने आपल्या या कादंबरीतून सहजपणे साकार केलंय.

काव्य सृष्टीचा उद्गाता, काव्य शिरोमणी, देवी शारदेच्या कंठातील झळाळणारा कौस्तुभमणी, सुंदर सुंदर काव्य लिहिणारा, मेघदूत, ऋतू संहार रघुवंशम, कुमारसंभवम् विक्रमोर्वशीय, मालविकाग्निमित्र आणि अभिज्ञान शाकुन्तलम् ह्या काव्याची निर्मिती करणारा महाकवी कालिदास याविषयी खरं तर फारसे ज्ञात नाही किंवा त्याची वैयक्तिक माहिती देणारं कोणतंही चरित्र उपलब्ध नाही. त्याचं असणं कसं प्रमाणित करायचं पण तेवढेच सत्य आहे की प्रत्येक काळात त्याच्यावर संशोधन होते आहे पण त्याचं साहित्य बघता तो होता हे निश्चित पण मग त्याचा काळ कोणता ? इतिहासकारांमध्ये याविषयी मतभेद आहेत. काही त्याला चंद्रगुप्त मौर्याच्या काळातील मानतात तर काही विक्रमादित्याच्या नवरत्न दरबार आतला एक रत्न मानतात. त्याचे माता पिता पत्नी परिवार या विषयी कोणतीही माहिती ज्ञात नाही. पण लेखिकेच्या मते तो दुसरा चंद्रगुप्त म्हणजेच विक्रमादित्याच्या काळातील असावा कारण समाज जेव्हा शांत असतो तेव्हाच कलागुणांचा विकास होत असतो आणि त्याच्यातल्या कलेला उत्तेजन मिळालं ते चंद्रगुप्ताच्या काळात. युद्धकाळात असता तर त्याने तत्सम विषय हाताळले असते. परंतु त्याच्या नाट्यकृती, त्याची खंडकाव्य, महाकाव्य यातून दिसणारा निसर्ग, शृंगार, प्रेम, विरह हे अतिशय उत्कट रित्या मांडले गेलेले आहेत, याशिवाय त्याच्या नाट्य कृतीतून शृंगार, हास्य शांत, वीर, करूण रौद्र अशा सर्व रसांचे वर्णनही सुंदरतेने आलेलं आहे आणि लेखिकेने आपल्या शब्द सामर्थ्याने ते अतिशय सुंदर शब्दात मांडलेला आहे.
अस्ति कश्चित वाग्विशेषः घ्या वाक्य पासून झालेली कादंबरीची सुरुवात आपल्याला एका अख्ख्यायिकेची आठवण करून देते.”भोजप्रबंध”या लेखक राजशेखर च्या ग्रंथातून या कथेचा आधार घेऊन लेखिकेने प्रस्तुत कादंबरीची संकल्पना मांडलेली आहे . अर्थात त्यांनी लिहिलेलं साहित्य हे त्याच्या अस्तित्वाची सर्वात मोठी यथार्थता आहेच. भोज राजाला विद्योत्तमा नावाची कन्या होती. शास्त्रार्थ करणाऱ्या पुरुषाशी विवाह करेन हा तिचा दृढनिश्चय. अनेक राज्यातल्या विद्वानांना तिने शास्त्रार्थात हरवलं. दंत कथेतला गोपालक असणाऱ्या कालिदासाशी व्युह रचना करून तिचा विवाह होतो. विवाहाच्या पहिल्या रात्री ती अस्ति कश्चित वाग्विशेषः असा प्रश्न ती त्याला विचारते. आपल्या वाणीत काही विशेषता आहे? त्याचे उत्तर तो देऊ शकत नाही. अशा निर्बुद्ध व्यक्तीला ती नगराबाहेर हाकलून देते. पुढे तो कालीच्या मंदिरात घोर उपासना करतो आणि तिच्या कृपेने प्रज्ञावंत होतो. कालिदासाविषयी आपल्याला ज्ञात असलेली मूळ कथा एवढीच .या कथेला कादंबरीचा रुपात आणि तुम्हाला कालिदासाचं चरित्र यथार्थ आणि वास्तव वाटेल अशा कल्पनांमध्ये, घटनांमध्ये, विचारांमध्ये ,प्रवाहित करून लेखिकेने एक सर्वांगसुंदर निर्मितीचा आनंद आपल्या सर्वांना दिलाय. कल्पना कशी सत्यात उतरू शकते यासाठी योग्य त्या प्रसंगांची घटनांची निर्मिती हेही लेखिकेचं कौशल्य मानावं लागेल.
अपमानित झालेल्या कालिदासाने वेत्रावती नदीत स्वतःला अतिशय विकल अवस्थेत झोकून दिल्यानंतर कुठून तरी येणारा घंटाचा ना त्याच्या कानावर पडला आणि तो त्या दिशेने वळला पण शरीराने साथ सोडली होती पण काली मातेने त्याचं रक्षण केलं आणि जवळच असणाऱ्या आश्रमातल्या सरस्वती देवींनी त्याला आपल्या आश्रमात आणलं त्याला सर्व शिक्षण दिलं आणि इतके योग्य तयार केलं की विक्रमादित्याच्या दरबारात त्याचे पुढे वर्णीही लागली. हा प्रवास या घटना, ज्ञान, अभ्यास इतका सहजपणे झालाय की तुम्हीही विचार कराल की खरंच हे सगळं असंच असू शकेल. फक्त काली मातेच्या मंदिरात घोर तपश्चर्या केल्याने प्रज्ञावंत होणे शक्य नाही कुणीतरी त्याला हे ज्ञान दिलं असणार.
कालिदासाचा जीवन प्रवास जो लेखिकेने आपल्या कादंबरीतून मांडलाय तो अतिशय सहज सुंदर आणि ओघवता आहे. कालिदासाचं व्यक्तिमत्व इतक्या नितांत सुंदर रीतीने मांडले जे आहे की आपण संभ्रमित होतो. महाकवी कालिदास की एक राजकारणी कालिदास की एक अर्थतज्ञ कालिदास की एक राजा विक्रमादित्याचा तत्वज्ञ मित्र, जिव्हाळ्याचा मित्र की भारत भ्रमण करून निसर्गाची अविरत सौंदर्य उपासना करणारा, त्याच्या वर्णनात रंगून गेलेला ती सात खंडकाव्य, महाकाव्य, नाटक याची निर्मिती करणारा कालिदास सर्वच अनुपमेय. त्यातल्या या असंख्य गुणांचा आविष्कार बघतांना लेखिकेचं लेखन कौशल्य तुम्हाला सतत जाणवत राहतं. कालिदास हा एक फक्त शृंगार कवी नव्हता तर तो एक प्रकांड पंडित , वैदिक धर्म संस्कृती चा पुरस्कर्ता, नाट्य, काव्य, समीक्षा ,सहिता याचा अभ्यासक ब्राह्मणे, यांच्या आरण्यके व उपनिषदे स्मृती श्रुती, दर्शन ,धर्मशास्त्र, मनोविज्ञान, ज्योतिष याचा तो सखोल जाणतात चित्रकला संगीत याचा मर्मज्ञ युद्धनीती रणनिती चाणक्यनीति याचा अभ्यासक एका व्यक्तित्वात इतके सर्व गुणअसणारा श्रेष्ठ महाकवी कालिदासच. युगानुयुगं ज्याच्या काव्याने भारतीय मनावर अधिराज्य गाजवावं असा कालातीत कवी कालिदासच.
कादंबरी वाचताना राजा विक्रमादित्य त्याचा नवरत्न दरबार प्रजे तल्या समस्या प्रभादेवी तिचा विवाह तिचं उत्तम राजकारण निपूण असणं वाकाटकांची असणारी मैत्री आणि शकांची होणारी आक्रमणं आणि राजा विक्रमादित्याचा त्यामुळे वारंवार युध्दा वर जाणं हा विक्रमादित्याचा संपूर्ण काळ ही कालिदासाच्या जीवना बरोबर गतिमान आहे. राजा विक्रमादित्याला कालिदासाच्या प्रत्येक साहित्यकृतीत नितांत रस होता किंबहुना त्या साहित्यकृतीचा तो पहिला आस्वादक होता. लेखिकेने कालिदासाचा जीवनप्रवाह गतिमान ठेवताना त्याने निर्मित केलेल्या साहित्यकृतीवर ही विवेचन केलेलं आहे. त्या कशा कशा निर्मित होत गेल्या याचं अत्यंत मनोहारी चित्रण कादंबरीतून बघायला मिळतं.
कालिदासाच्या साहित्यात प्रेम कथा, विरह, शृंगार आणि त्याचबरोबर पराक्रम, वीरता आणि निसर्गाचे नितांत सुंदर वर्णन यांनी ओतप्रोत आहे. “कुमारसंभवम्” वहे काव्य शिवपार्वती व कार्तिकेय यांना समर्पित आहे. “रघुवंशम मध्ये आतील अनेक राजांच्या आदर्श वादाची आणि पराक्रमाची महती आहे.”मेघदूत”हे काव्य इतर महाकाव्याच्या तुलनेत लहान आहे. रामगिरी तील शापित यक्षा ची पत्नी कुबेराच्या अलका नगरीत विरहाने व्याकुळ झालेली आहे तिला आषाढातील मेघाला दूत बनवून त्याने प्रेम संदेश पाठवला आहे. आहे. “मालविकाग्निमित्र”हे नाटक महान सम्राट पुष्यमित्र शृंग यांचा मुलगा अग्निमित्र आणि मालविका यावर आधारित आहे. “विक्रमोर्वशीय” विक्रम व उर्वशी वर आणि अभिज्ञान शाकुन्तलम् राजा दुष्यंत आणि शकुंतला ची प्रीती कथा आहे. ऋतुसंहार मध्ये वेगवेगळ्या ऋतूंचा वर्णन आलेलं आहे.
असा हा भारत वर्षाचा महाकवी साहित्यातून अमर झाला. त्याच्याविषयी सार अज्ञात असूनही तो प्रत्येकाला आपलाच वाटला कारण त्याने केलेली भ्रमंती त्यांनी केलेल्या प्रांतांच वर्णन त्यामुळे तो फक्त आपल्या प्रांताचा ही भावना निर्माण झाली. रामगिरी पासून ते हिमालयापर्यंत प्रत्येक प्रांताचा सौंदर्य त्याने इतक्या सुंदर शब्दात मांडल आहे की सौंदर्याला सौंदर्य प्राप्त झालंय असंही म्हणता येईल. मनुष्याच्या चांगुलपणावर त्याचा संपूर्ण विश्वास होता त्यांच्या कोणत्याही नाट्यकृतीत खलनायक नाही.अस्ति कश्चित वाग्विशेषः या तीन शब्दांपासून तीन महाकाव्य निर्माण झाली. पण हे तीन शब्द म्हणजे त्यांच्या आयुष्याचं एक ध्येय बनलं होतं. विद्योत्तमेनी केलेला अपमान जिव्हारी लागला होता. प्रचंड साहित्य निर्मिती करूनही हे दुःख कुठेतरी मनात काय होतं. मधुलिका नावाची गणिका त्याच्या आयुष्यात त्याची प्रियतमा, सखी,मैत्रीण, पत्नी सर्वच बनून सतत राहिली अर्थात हे लेखिकेने निर्माण केलेलं व्यक्तित्व, पण ते इतकं सहज सुंदर, त्यांच्यातले संवाद, प्रेम, समर्पण सगळंच नितांत सुंदर. कालिदासाच्या विचारांची दिशा उत्तुंग होती. धर्म ,अर्थ ,काम ,आणि मोक्ष या चार पुरुषार्थाचे विवेकाने पालन म्हणजे जीवन साफल्य. म्हणूनच संस्कृतीचा ध्वज उंच नेणाऱ्या कालिदासाला सर्वोच्च स्थान मिळालं.
साहित्यातलं एक अनुपम , काव्य सृष्टीचा निर्माता साहित्यातला शिरोमणी महाकवी कालिदास अशा या भारत वर्षाच्या महानायकावर कादंबरी लिहिणं ही लेखिकेच्या प्रतिभेची शब्द लावण्याची अभ्यासाची आणि ओघवत्या भाषेची परिसीमा आहे असं मला वाटतं . साहित्याचे अनेक पदर असणारी, त्यावर त्याच्या साहित्यावर त्याच्या जीवनावर त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आणि मुख्य म्हणजे महाकवी च्या अनेक कला गुणावर भरभरून प्रेम करणारी लेखिकेची शब्द सरिता एखाद्या खळाळत्या नदी प्रमाणे प्रवाहित झालीय. त्याचं वर्णन करताना तुमच्या नेत्रा समोर उभा राहणार कालिदासाचं व्यक्तिमत्व इतके अनुपम आहे की तुम्ही सहज त्यात गुंतून पडता .
विजय प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या या संपूर्ण कादंबरीला सौंदर्याने आणि कालिदासाच्या भव्य व्यक्तिमत्वाने बांधून ठेवण्याचं अनुपम सामर्थ्य लेखिकेत आहे. महाकवी कालिदास यांच्या बरोबरीने महान सम्राट विक्रमादित्य याचाही प्रशासनाचा आढावा लेखिकेने घेतलेला आहे.
अनेक प्रसंगानुरुप असणारे श्लोक, उपमा, निसर्गाचे अद्भूत वर्णन ,सजीव निर्जीव वस्तूंची सहज सुंदर रीतीने होणारे संवाद ,आत्मचिंतन, सखोल अभ्यास यांनी कादंबरी परिपूर्ण आहे. लेखिकेच्या सामाजिक बरोबर चरित्रात्मक कादंबरी भरपूर आहेत किंबहुना राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार हे सन्माननीय विशेषणही तिच्यामागे आहे. अमाप साहित्य निर्मिती करणारी ही लेखिका निश्चितच अतिशय कौतुकास पात्र आहे. कालिदासा सारख्या एका गहन आणि कठीण विषयावर कादंबरी लिहून साहित्याची उंची गाठणारी कलाकृती तिने आपणा सर्वांसाठी उपलब्ध केलेली आहे.
— परीक्षण : शुभांगी गान.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800