Sunday, September 8, 2024
Homeसाहित्यपुस्तक परिचय

पुस्तक परिचय

“कथा मरुभूमीची”

अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती, कोकण प्रांतांच्या वतीने नुकताच ठाण्यातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे एक दिवसीय साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते श्रीप्रकाश अधिकारी यांना त्यांच्या
“कथा मरुभूमीची” या साहित्य कृतीबद्दल सन्मानित करण्यात आले.

तमिळ ही द्राविडी भाषांतील सर्वात प्राचीन व समृद्ध भाषा आहे़. इ.स.पूर्व ६०० च्या आधीपासून तमिळ भाषेत साहित्य निर्मिती होत असावी असे मानले जाते. त्यामुळेच “अभिजात भाषे” चा पहिला मान तमिळ भाषेला मिळाला आहे़. वैरमुत्तू हे तमिळ भाषेतील नामवंत साहित्यिक असून त्यांचा जन्म १३ जुलै १९५३ साली झाला. त्यांनी सात हजार पाचशे चित्रपटगीते लिहिली आहेत.त्यांचे अकरा कविता संग्रह, दहा कादंबऱ्या, सात निबंध संग्रह, दोन प्रवासवर्णने, अनेक लघुकथा संग्रह अशी एकूण ३८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कारासह देश विदेशातील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. साहित्य अकादमी तर्फे त्यांना सन्मानित केले आहे़. 

श्रीप्रकाश अधिकारी यांचे  मराठी भाषे प्रमाणे तमिळ भाषेवर प्रभुत्व आहे. त्यांनी चार तामिळ भाषेतील कादंबऱ्याचे मराठी भाषेत अनुवाद करून श्रध्दागौरी, कावेरी, मुके डोळे, स्नेहदी हया कादंबऱ्यांची निर्मिती केली. त्यांचे  विविध दिवाळी अंकात,  साप्ताहिकात, दैनिकांत, अनुवादित कथा, लेख प्रसिध्द झाले आहेत.ते नेहमी सांगतात  “मराठी भाषा ही आपली माता आहे तिचा आपल्याला नक्कीच अभिमान वाटला पाहिजे तिच्यावर प्रेम जरूर करा परंतु इतर सर्व भाषा हया आपल्या मावशी आहेत” . आपण आई प्रमाणे मावशीवर सुध्दा जसे प्रेम करतो तसेच इतर भाषांवर सुध्दा प्रेम करा त्या आत्मसात करा .त्यांनी बालचित्रवाणी कार्यक्रमासाठी लिखाण करून कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. रत्नागिरी आकाशवाणी वरून त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत.

वैरमुत्तु या साहित्यिकाच्या “कळळीकाट्टु इतिहासम्” या कादंबरीचे श्रीप्रकाश अधिकारी यांनी मराठी भाषेत “कथा मरूभूमीची” भाषांतर केले आहे़. ही कादंबरी तामिळनाडू मध्ये वैधई नदीवर १९५८ साली बांधण्यात आलेल्या धरणामुळे साधारणपणे १९४८ पासून आजूबाजूच्या दहा, पंधरा गावातील लोकांच्या समस्या, त्यांचे होणारे हाल, नुकसान याचे चित्रण शब्दबद्ध केले आहे़. लेखक वैरमुत्तु यांनी ही दुःखे अनुभवली आहेत. त्यामुळे ही कादंबरी एक आत्मकथा आहे़. शहरातील श्रीमंतांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, कारखान्यांना तसेच बड्या शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळावे यासाठी मोठमोठी धरणं बांधली जातात. त्यामुळे दहा बारा गावांचे स्थलान्तर होते. त्यांना पर्यायी जागा दिल्या जातात परंतु ज्या गावात व घरात अनेक पिढ्या रहात होत्या ती गांवं नकाशावरून कायमची पुसली गेलेली डोळ्यासमोर पहातांना होणारे दुःख, ज्या मंदिरातील देवांचे अनेक पिढ्यांना आशिर्वाद लाभले, ज्या झाडांनी फळं फुलं दिली, ज्या जमिनीने अनेक पिढ्यांवर आई प्रमाणे माया केली ती कायमची पाण्याखाली जाणार याची वेदना काय असते ते फक्त विस्थापितच जाणू शकतात, हे कादंबरी वाचल्या नंतर लक्षात येते. मूळ तमिळ  लेखक वैर मुत्तु आणि त्या कादंबरीचे मराठीत  भाषांतर करणारे नामवंत भाषांतरकार श्रीप्रकाश अधिकारी यांनी विस्थापितांच्या ज्या समस्या मांडल्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी वाचकांनी ही कादंबरी जरूर वाचावी.

दिलीप गडकरी

— परीक्षण : दिलीप गडकरी. कर्जत -रायगड 
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments