सुप्रसिद्ध साहित्यिक, पत्रकार, कादंबरीकार ह.मो.मराठे यांचे बरेचसे साहित्य मी वाचले आहे. पत्रकारिता, जनसंपर्क क्षेत्रात वावरलेल्यामुळे त्यांच्या ‘इतिव्रुत्त’, ‘न्युज स्टोरी’ या कादंबर्या, प्रासंगिक घडामोडीवरील ‘पहिला चहा’, ‘एक माणूस एक दिवस’, ‘मधल पान’, ह्या व्रुत्तपत्र मालिका आणि सर्वात विशेष म्हणजे औद्योगिक क्षेत्रातील ‘मार्केट’, ‘साँफ्टवेयर’ ‘कलियुग’, ‘ज्वालामुखी’ या गाजलेल्या कादंबर्याच वाचन यापूर्वीच केलं आहे. महानगरी जीवनातील मराठी माणसांचे दुःख, वेदना आणि स्पर्धा, संघर्ष त्यांतून प्रकर्षांने दिसला.
‘हमो’ यांच्या या साहित्य क्रुतींचा तसेच त्यांच्या अनेक कथांचा आस्वाद नियमित घेतल्याने अलीकडेच त्यांच्या आत्मचरित्त्रावर आधारित विविध पुरस्कार मिळालेल्या ‘बालकांड‘ आणि नंतरची ‘पोहरा‘ या दोन्ही कादंबर्या उत्सुकतेमुळे वेळात वेळ काढून वाचून काढल्या. त्या विषयी…..
हमो मराठे हे ‘हमो‘ नावाने पत्रकारिता क्षेत्रात, लेखक मंडळीत लोकप्रिय होते. त्यांच्या बालपणाच्या जीवनातील सर्व लहान मोठ्या घटना ‘बालकांड’ या कादंबरीत चित्रीत केल्या आहेत. आई, वडिलांचा लहापणापासून आधार नसलेल्या व एकुलता एक वडिल भावाच्या शिंपी कामाच्या नोकरीच्या अत्यंत हलाखीच्या गरिबीत त्यांचा काळ गेला. त्यातून त्यांनी पहिली पासून बीए पर्यंतच्या शिक्षणाचा व त्या जीवनाचा संपूर्ण तपशीलच ‘पोहरा’ या कादंबरीत उत्तम भाषाशैलीत ग्रथित केला आहे. जीवनात सतत धडपडणाऱ्या व संघर्ष करणाऱ्या तरुणांनी
‘पोहरा’ अवश्य वाचावी असे मला आवर्जून सांगावसे वाटते.
या कादंबरीत नेमके काय आहे असा सवाल पुढे येईल म्हणून त्याकडे संक्षिप्तपणे वळतो.
‘पोहरा’ हा ‘बालकांड’ या अत्यंत लोकप्रिय कादंबरीचा दुसरा भाग.
आयुष्यातील खूप मोठा काळ शिक्षणापासून वंचित राहिलेला ‘हनू’ भविष्यात इतका प्रसिद्ध लेखक, संपादक कसा झाला असा सवाल सहाजिकच वाचकांकडून आल्यामुळे ‘हनू’च्या व्यक्तिमत्वाचा कसकसा विकास होत गेला व आपल्यातील ‘लेखक’ त्याला कसा गवसत गेला हे उलगडत नेणारी कहाणी हमो मराठे यांनी वाचकासमोर आणली.
हनू हा सिंधुदुर्ग जिल्हयातील दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावाचा!त्यामुळे पोहरात मालवणी चित्पावनी भाषेचा वापर खुप आहे. सर्रास सर्वांच्या बोलण्यात असणारी ही लोकभाषा शाळेतील मुले, कधी कधी शिक्षकसुध्दा मालवणीतच बोलतात. ‘पोहरा’चा पुष्कळसा भाग मालवणात घडतो. त्यामुळे मालवणीचा वापर स्वाभाविकपणे अधिक झाला आहे. लेखकाचा मोठा भाऊ मालवणमध्ये स्थीरसावर झाला आणि हनूच्या शिक्षणाची जबाबदारी त्याने स्वतःकडे घेतली. अत्यंत बेताच्या आर्थिक परिस्थिती मध्ये शिक्षण घेणे ही सोपी गोष्ट नव्हतीच. पण परिस्थितशी तडजोड करण्याचा समजूतदारपणा, कोणत्याही कामाला कमी न लेखण्याची मानसिकता, शिक्षण घेण्याची प्रचंड आवड व जिद्दीने कष्ट करण्याची तयारी या गुणांनी सर्व प्रतिकूल परिस्थितीवर हळूहळू मात केली व लेखक यशाची एकेक पायरी चढू लागला.
अडथळे तर अनेक होतेच पण म्हणून वाटचाल थांबली नाही. पार पडत गेलेल्या प्रत्येक पायरीवर लेखकाचा वाढत गेलेला आत्मविश्वास आणि या प्रवासातच त्याला आपल्या सुप्त लेखकाचा लागलेला शोध अतिशय सूत्रबद्धपणे वाचकांसमोर येतो त्यामुळे अत्यंत ओघवत्या व सहज सोप्या भाषेत लिहिलेली ही कादंबरी प्रत्येकाला प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

– लेखन : सुधाकर तोरणे,
निवृत्त माहिती संचालक. नासिक.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
अतिशय अभ्यासपूर्ण उत्कंठावर्धक पुस्तक परिचय.. आदरणीय साहेबांचा या क्षेत्रात दांडगा अभ्यास आहे. मला वाटते यापूर्वी त्यांनी बालकांडचाही असाच परिचय करुन दिलेला होता. मनापासून धन्यवाद सर