वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरचित्रवाणी, चित्रपट ही माध्यमे क्षणिक असतात तर पुस्तक हे माध्यम शाश्वत आहे,असे प्रतिपादन माध्यमकर्मी देवेंद्र भुजबळ यांनी केले. ते जागतिक पुस्तक दिनानिमित्त नवी मुंबईतील साहित्य मंदिरात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि प्रा माणिकराव किर्तने वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पुस्तक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी “कुटूंब रंगलंय काव्यात” फेम प्रा विसुभाई बापट होते.
श्री भुजबळ पुढे म्हणाले, थोर इंग्रजी नाटककार विलियम शेक्सपियर यांचा जन्म २३ एप्रिल १५६४ रोजी झाला. हा त्यांचा जन्म दिवस १९९५ सालापासून जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो, असे असले तरी मराठी वाचकांनी दोन जणांचे स्मरण केले पाहिजे, ते महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी, ज्यांनी अकराव्या शतकात मराठी भाषेला धर्म भाषा, साहित्य आणि संवादाची भाषा केले आणि दुसरे म्हणजे १४४० साली छपाई यंत्राचा शोध लावणारे जर्मन संशोधक जॉन गटेनबर्ग हे होत.
पुस्तकाविषयी चे स्वानुभव सांगताना श्री भुजबळ म्हणाले, मी गेली ४० वर्षे पत्रकारिता, दूरदर्शन, जनसंपर्क आणि आता डिजिटल माध्यमात कार्यरत आहे. पण पुस्तके जितका शाश्वत आनंद देतात, दर्जेदार पुस्तके वाचत असताना आपले स्वतःचे जे विश्व असते, ते प्रत्येक वाचकाचे वेगवेगळे असते. प्रत्येक वाचकाच्या कल्पना शक्ती प्रमाणे तो त्या त्या पुस्तकाचा स्वतंत्र, व्यक्तिगत आनंद घेऊ शकतो, असे सांगून पुस्तक हे त्याच्या स्वरूपामुळे कधी ही, कुठेही नेऊ शकतो, दुसऱ्या कुणालाही देऊ शकतो, पुढच्या पिढ्यांसाठी तो ठेवा ठेऊ शकतो, अशी पुस्तकाची विविध वैशिष्ट्ये त्यांनी विशद केली.
विविध प्रसार माध्यमे एकमेकांना कशी पुरक ठरतात, हे सांगताना त्यांनी त्यांच्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टल वर प्रसिध्द झालेले लेखन आता पुस्तक रुपात कसे येत आहे, ते सांगितले.
दुसरे वक्ते सनदी लेखपाल अमरजित सुर्वे यांनी विविध पौराणिक, ऐतिहासिक दाखले देत प्रेरक विचार, नवीन दृष्टी ही आपल्याला पुस्तक वाचनामुळेच कशी प्राप्त झाली हे अतिशय रसाळपणें सांगितले.
प्रा विसुभाऊ बापट यांनी पुस्तकांच्या मदतीमुळेच
आपण गेली ४२ वर्षे कुटूंब रंगलंय काव्यात हा कार्यक्रम सादर करीत आलो आहे, हे नमूद केले.
प्रारंभी मराठी साहित्य, संस्कृती मंडळाचे अध्यक्ष श्री सुभाष कुळकर्णी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. तर अमरजा चव्हाण यांनी सूत्र संचालन केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री प्रशांत पाटील यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास विविध मान्यवर, रसिक उपस्थित होते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800