Wednesday, September 17, 2025
Homeलेखपोलीस : शांतता, सुव्यवस्थेचा पाईक

पोलीस : शांतता, सुव्यवस्थेचा पाईक

आज २१ऑक्टोबर. पोलीस शहीद दिवस. 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकांसोबत लढताना केंद्रिय राखीव दलाच्या 10 जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. म्हणून हा दिवस पोलिस शहीद दिन म्हणून संपूर्ण भारतात हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी जे पोलीस व जवान देश सेवा करताना शहीद झालेत, त्या पोलिसांना व जवानांना मानवंदना दिली जाते. कृतज्ञता व्यक्त केली जाते.

मी माझ्या जीवनामध्ये जय जवान जय किसान हे तत्व अवलंबले आहे आणि मी सर्वात जास्त महत्त्व जवानांना आणि शेतकऱ्यांना देतो. कारण या दोघांना जर आपल्या जीवनातून वगळले तर आपण जिवंतच राहू शकणार नाही असे मला प्रमाणिकपणे वाटते.

समाजामध्ये पोलीस आहेत म्हणून आपल्या सर्वांचे जीवन सुखकर आणि सुसह्य झालेले आहे. आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी फौजदार निष्ठा आहे. चौकात पोलीस उभा असेल तर आपण सहसा नियम तोडत नाही. टू व्हीलरवर दोनच्या वर तिसरी सीट बसवत नाही. चौकात असलेल्या सिग्नलचे तंतोतंत पालन करतो. शक्यतोवर नियमांचा भंग करीत नाही. कारण तुमच्यावर देखरेख करायला चौकामध्ये पोलीस असतो. तो केव्हा शिट्टी वाजवेल आणि तुमची गाडी थांबवेल याचा नेम नसतो.

पण हाच पोलीस जर चौकात नसला तर तुम्ही गाडी वाकडी तिकडी चालवणार. टू व्हीलर वर दोनच्या ऐवजी चार सीट बसवणार आणि नियमांचा भंग करणार. थोडा आपण पोलिसांचा जर विचार केला तर तुमच्या माझ्यासाठी स्वतः जीवन अर्पण करणारा पोलीस वेळप्रसंगी आपल्या जीवाचे बलिदान पण देतो. गुन्हेगारांचा पाठलाग करताना, गुन्हेगारांना शोधताना असे अनेक पोलीस दरवर्षी शहीद होतात.

खरं म्हणजे समाजामध्ये पोलिसांना अनन्यसाधारण महत्त्व असायला पाहिजे . आपल्याकडे चोरी झाली तर आपण शेजाऱ्याला उठवत नाही तर डायरेक्ट पोलीस स्टेशनला फोन करतो. रात्र असो मध्यरात्र असो पाऊस असो पोलीस येतातच. तुमच्या तक्रारीची दखल घेतातच. अनेक असे प्रकार घडतात की ज्यामध्ये आपणच “आ बैल मुझे मार” अशी परिस्थिती निर्माण केलेली असते.

आज-काल ऑनलाईन मध्ये चांगले चांगले लोक फसतात. खरं म्हणजे आपण प्रत्येक काम काळजीपूर्वक शिस्तबद्ध केले तर खूप काही बदल होऊ शकतात. पोलिसांवरचा ताण कमी होऊ शकतो. तुम्हाला केव्हाही सुट्टी मिळते. पण पोलिसांचे तसे नाही. त्यांना अगदी त्यांच्या मुलीचे लग्न असले तरी सुटी मिळेलच याची गॅरंटी नाही आणि मिळालेली सुट्टी केव्हा रद्द होईल हे पण सांगता येत नाही.

हा आमचा पोलीस बांधव सतत समाजासाठी समाजाच्या कल्याणासाठी कार्य करीत असतो. पण समाजाला पोलीस विभागाविषयी जेवढा आदर असायला पाहिजे तेवढा आदर दुर्दैवाने दिसत नाही. संकटात सापडले म्हणजे पोलीस आठवतो. पण मी स्वतःहून शिस्तीने वागलो तर पोलिसांचा किंवा पोलीस स्टेशनचा प्रश्नच येणार नाही असा विचारही आपल्या डोक्यात येत नाही.

आजकाल शेजाऱ्या शेजाऱ्याचे भांडण, शेतीच्या धुऱ्याहून भांडण, उलट सुलट तक्रारीचे प्रकार खूप व्हायला लागले आहेत. पण हे प्रकार मिटविता येऊ शकतात. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपण शिस्तबद्ध वागले पाहिजे याचा अवलंब करणे गरजेचे आहे.

अमरावतीचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून सेवानिवृत्त झालेले स्वर्गीय श्री सूर्यकांत जोग यांची एक आठवण मला आठवते. ते सांगत होते,ते आणि मधु दंडवते मुंबई ते दिल्लीचा प्रवास करीत होते. जोग सरांनी लक्षात घेतले की दंडवते साहेब स्टेशनवर उतरताना एका दारातून उतरतात दुसऱ्या दारातून चढतात. असे दोन चार स्टेशनवर झाल्यानंतर त्यांनी मधु दंडवते यांना विचारले की सर आपण ज्या दारातून उतरता त्या दारातून का चढत नाही. तर त्यांनी त्या डब्यावर असलेल्या पाटीकडे बोट दाखवले, जिथून एक नंबर सुरू होतो तिथे इन लिहिलेले होते आणि जिथे ७२ वा नंबर संपतो तिथे आऊट लिहिलेले होते. म्हणून दंडवते म्हणाले जोग साहेब नियमांचे पालन केले पाहिजे. इथे इन लिहिलेले आहे तर इथूनच आत मध्ये प्रवेश केला पाहिजे आणि ज्या दारावर आउट लिहिलेला आहे तिथूनच आपण गाडीतून उतरले पाहिजे. आज लाखो लोक गाडीने प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करतात. परंतु डब्यावर इन आणि आऊट लिहिलेले आहे हे किती लोकांना माहीत आहे ?

सुप्रसिद्ध सर्वोदय नेते आचार्य दादा धर्माधिकारी इंदोरला गेले. तिथले राजकारणी लोक त्यांना तुरुंग दाखवायला घेऊन गेले आणि बोलता बोलता ते राजकारणी म्हणाले की हा तुरुंग खूप मोठा आहे .एवढा मोठा तुरुंग भारतात कुठेच नाही आहे. आम्ही आता लगेच यापेक्षा मोठा तुरुंग बांधणार आहोत. दादा धर्माधिकारी विनम्रपणे म्हणाले अहो तुरुंग बांधण्यापेक्षा माणसं मोठी करा .ही माणसं मोठी झाली ना, चांगली झाली ना, ही माणसं सुसंस्कृत झाली ना तर तुरुंग बांधण्याची गरजच पडणार नाही. मोठा तुरुंग असणे हे तुमच्या शहराला भूषणावह नाही. उलट तुमच्याकडे गुंड गर्दी जास्त आहे, अत्याचार जास्त होत आहेत असा अर्थ निघतो .दादा धर्माधिकाऱ्यांचे ते वाक्य वाचून ते राजकारणी स्तब्ध झाले.

माझे एक मित्र होते. प्रा.अरुण एलगुंदे. ते पुण्याला स्थायिक झाले. आणि एक वेळ ते अमरावतीला आले. मी त्यांना भेटायला गेलो. वेळ सकाळची होती. जे मित्र त्यांना अमरावती शहरात फिरविणार होते ते स्कूटर घेऊन आलेच नाहीत. तेव्हा स्कुटरचा जमाना होता .मी त्यांना म्हटलं माझी स्कुटर घेऊन जा आणि तुमचे काम करून घ्या. ते म्हणाले मी ड्रायव्हिंग लायसन आणलेले नाही. मी त्यांना म्हटले ड्रायव्हिंग लायसन नाही तर नाही ? इथे अमरावती शहरात कोण लायसन पाहणार आहे ?ते म्हणाले.काठोळे सर माझ्याजवळ लायसन नाही तर मी गाडी चालविणार नाही. तुम्ही मला आग्रह करू नका. आजकाल शहरांमध्ये ज्या गाड्या चालतात त्या टू व्हीलर चालतात त्यांच्याजवळ किती लोकांजवळ लायसन असते ? लायसन असणे ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपण निभवलीच पाहिजे असे किती लोकांना वाटते? आणि आपल्याला ते वाटावं, आपला जीव व्यवस्थित राहावा यासाठी सदैव तत्पर राहणारा तुम्हाला सतर्क करणारा प्रसंगी तुम्ही चुकले तर तुम्हाला अडविणारा पोलीस हा सदैव आज समाजामध्ये दक्ष आहे.

कुठे काही घटना घडली की पोलीस आपली तहान भूक विसरून त्या कामात स्वतःला झोकून देतात. पोलिसांबद्दल अनेक उलट सुलट बातम्या वर्तमानपत्रांमध्ये येत असतात. परंतु आपण थोडा विचार करू या. पोलिसांना स्वतःचे आयुष्य उरलेलं नाही. कधी कधी तर २४ तास ड्युटी लागू शकते. निवडणुका आहेत. आणीबाणी सारखी परिस्थिती आहे. महापूर आहे .दंगल आहे अशा वेळेस पोलिसांना घरी पण जाता येत नाही. आपलं एकच काम आहे.

संकट समयी आपल्याला सदैव मदत करणारा पोलीस जर आपल्याला दिसला तर त्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करा .शक्य असल्यास त्याच्याशी प्रेमाने बोला. आदरतिथ्य केलेच पाहिजे असे नाही. मला आठवते मी ज्या ज्या राजकारणी लोकांबरोबर फिरलो त्यामध्ये मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील त्या सर्वांनी त्यांच्या गाडीत असणाऱ्या पोलिसांची अगोदर काळजी घेतलेली आहे. माझ्याबरोबरचे पोलीस सहकारी जेवले की नाही, त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था नीट झाली की नाही हे पाहणारे मा.ना.श्री.बाळासाहेब थोरात सारखे महसूल मंत्री देखील मी पाहिलेले आहेत आणि म्हणून आपल्या शहराचे स्वास्थ सुरळीत सुरू आहे ते केवळ पोलिसांमुळे आहे.

शहरातील गुंड प्रवृत्ती,अपप्रवृत्ती अत्याचार हे आटोक्यात आहेत हे केवळ पोलिसांमुळे आहेत. आणि त्यासाठी हा पोलीस सदैव आपल्या प्राणाची आहुती द्यायला तयार आहे. अशा शहीद झालेल्या पोलिसांना आदरांजली अर्पण करण्याचा आजचा शहीद दिन आहे.
या आमच्या सर्व पोलीस बांधवांना यानिमित्त मानाचा मुजरा.

डॉ नरेशचंद्र काठोले

— लेखन : प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आयएएस
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं