Tuesday, June 17, 2025
Homeसाहित्य"प्रज्ञाभारती" डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

“प्रज्ञाभारती” डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

“संस्कृत अध्ययन, संस्कृतातील सृजनशील लेखन आणि संस्कृत प्रचार कार्य” या साठी देण्यात येणारा, संस्कृत विश्वामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा आणि महत्वाचा असलेला ‘प्रज्ञाभारती’ डॉ. श्री. भा. वर्णेकर यांच्या स्मृत्यर्थ संस्कृत भाषा प्रचारिणी सभा, नागपूर यांच्याद्वारे गेली ३० वर्षे दिला जाणारा सन २०२२ चा, “प्रज्ञाभारती स्मृती पुरस्कार” नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांना संस्कृत-भवनम्, नागपूर येथे प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संस्कृत कवयित्री डाॅ. लीना रस्तोगी होत्या. संस्कृत आणि संगणक या विषयातील जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. चंद्रगुप्त श्रीधर वर्णेकर, संशोधिका अनुश्री घिसाड, डाॅ. वीणा गानू यांची विशेष उपस्थिती होती.

डाॅ. चंद्रगुप्त वर्णेकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात संस्कृत भाषा प्रचारिणी सभा नागपूर या संस्थेच्या कार्याची माहिती देऊन, संस्कृतच्या क्षेत्रात अनेक संस्थांचे एक जाळे तयार व्हावे, त्यांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

संशोधिका अनुश्री घिसाड यांनी अफगाणिस्तानातील भारतीय संस्कृतीच्या वारशांवर प्रकाश टाकला. डाॅ. लीना रस्तोगी यांनी अध्यक्षीय भाषणात, संस्कृतच्या क्षेत्रातील तरुणांच्या सहभागाबद्दल कौतुक केले. श्री. योगेश गानू यांनी संस्कृत भाषा प्रचारिणी सभा या संस्थेच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. रेणुका करंदीकर यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय डाॅ. वीणा गानू यांनी करून दिला. कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने झाली. या प्रसंगी मार्तंडराव वाईकर व्याख्यानमालेचेही आयोजन करण्यात आले होते.

अल्प परिचय
संस्कृत-अभ्यासक डॉ. चंद्रहासशास्त्री दुर्गादासशास्त्री सोनपेठकर हे टिळक शिक्षण महाविद्यालय, पुणे येथे
अध्यापक आहेत. विसाव्या शतकातील थोर संत वै. श्रीगुरू भगवानशास्त्री महाराज सोनपेठकर यांचा वारसा समर्थपणे ते चालवीत आहेत.

शास्त्रीजींचे लौकिक शिक्षण एम. ए. संस्कृत (स्वा.रा.ती.म.विद्यापीठ सर्वप्रथम), एम.एड. सेट संस्कृत, सेट व नेट शिक्षणशास्त्र, पीएच. डी. (उपनिषद) असे आहे. त्यांच्या सांप्रदायिक शिक्षणाचा शुभारंभ वै. श्रीगुरू भगवानशास्त्री महाराज सोनपेठकर यांचेकडे झाला. वयाच्या चौथ्या वर्षी चंद्रहास शास्त्रींनी संत श्री ज्ञानेश्वर माऊली जन्मस्थान, आपेगाव येथे पहिले प्रवचन केले.

पुढे माघ दशमी, इ.स. १९८७ साली प्रात:स्मरणीय श्रीगुरुंनी चंद्रहासला तुळशी माळ घातली. प्रात:स्मरणीय श्रीगुरूंचा शिष्य परिवार खूप मोठा आहे. मात्र त्यात श्रीगुरूंचा अंतिम शिष्य म्हणजे चंद्रहास शास्त्री. माघ व. नवमीचे दिवशी श्रीगुरु ब्रह्मलीन झाले. या नंतर ह.भ.प. श्री रेणुकादास महाराज यांच्याकडे चंद्रहास शास्त्रींचे आध्यात्मिक शिक्षण संपन्न झाले.

संस्कृत अध्ययनातील प्रावीण्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र शासनाने सन्मान केलेला आहे. परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी त्यांना परभणी रत्न पुरस्कार देऊन गौरविले आहे.
डॉ. शास्त्रीजी हे एक सिद्धहस्त लेखक आहेत. त्यांची अनेक पुस्तके, लेख इत्यादी प्रसिद्ध आहे. समाज माध्यमांवरही ते क्रियाशील असतात. त्यांच्या काही पुस्तकांचा परिचय पुढीलप्रमाणे :-
१. नारदभक्तीसूत्र :
संस्कृत सूत्र आणि मराठी अर्थ असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.
२. Values in Raghuvansham :
संस्कृत महाकवी कालिदासाच्या रघुवंशातील जीवनमूल्यांचा आढावा घेणारे असे हे संशोधनात्मक पुस्तक आहे.
३. Essays on Education :
या पुस्तकाचे सहलेखन शास्त्रीजींनी केले आहे. यात शिक्षणव्यवस्थेवरील विविध लेख आहेत.
४. भगवती रंगचंद्र गाथा :
या पुस्तकात माहूरगडनिवासिनी जगदंबा रेणुकामातेवरील भक्तिपूर्ण रचना आहेत. विशेष म्हणजे या रचना स्वत: डॉ. शास्त्रीजींच्या आहेत.
५. सार्थ श्री देवी स्तोत्रे :
श्रीमदाद्य शंकराचार्य विरचित श्रीदेवीच्या नित्य पाठासाठी उपयुक्त अशा स्तोत्रांचा सार्थ संग्रह शॉपिजेन प्रकाशन, अहमदाबाद यांचे द्वारे प्रकाशित करण्यात आला आहे.

या शिवाय एम एड. परिपूर्ण अभ्यास, बी.एड. परिपूर्ण अभ्यास इत्यादी पुस्तकांचे लेखन/संपादन शास्त्रीजींनी केले आहे. आकाशवाणी, दूरचित्रवाहिनी इ. माध्यमातूनही शास्त्रीजींचे कार्यक्रम होत असतात. व्याख्यान, प्रवचन, कीर्तन, भागवत आदि कार्यक्रमांसाठी त्यांची भ्रमंती सतत सुरूच असते.
भगवद्भक्ती हा शास्त्रीजींचा स्थायीभाव आहे. रसाळ वाणीचे वरदान त्यांना लाभलेले आहे.

व्यासंग, निरंतर वाचन-लेखन हा त्यांचा नित्यक्रम आहे. सात्विक आचरण, सतत नामस्मरण यात ते रत असतात. ज्योतिष शास्त्राचाही त्यांचा अभ्यास आहे. शास्त्रीजी वर्गात असोत किंवा व्यासपीठावर, अध्यापनाचा विषय कितीही अवघड असला, तरी तो सोपा करून सांगण्याची त्यांची हातोटी आहे.

वै. श्रीगुरू संत श्री. भगवानशास्त्री महाराज आणि ब्र. भू. संत श्री रंगनाथ महाराज गुरुजी यांचेवर डॉ. शास्त्रीजींची अतीव निष्ठा आहे. या दोन विभूतींच्या स्मरणार्थ त्यांनी वारकरी संत विचार परिक्रमा सुरू केलेली आहे.

सकारात्मकता हे डॉ. शास्त्रीजींच्या कार्यशैलीचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. वारकरी संत विचार परिक्रमा यात्रे निमित्त ते प्रवास करीत असतात. लॉक डॉउनच्या काळात हार न मानता त्यांनी परिक्रमेचे कार्य फेसबुक पेजच्या माध्यमातून सुरु ठेवले.

शास्त्रीजींच्या या उपक्रमांमध्ये त्यांच्या सहधर्मचारिणी सौ. मानसी वहिनींचे देखील खूप सहकार्य असते.
त्यांच्या बहुतेक कार्यात मित्रमंडळींचाही सहभाग असतो.

संस्कृतच्या क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यावर शास्त्रीजींचा भर असतो. विनम्रता, मधुर संभाषण, माणसे जोडण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. या बळावरच त्यांचे कार्य सुरु आहे.

शास्त्रीजींच्या भावी कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा💐

देवेंद्र भुजबळ

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments