कल्याण येथील नूतन ज्ञान मंदिर शाळेत नुकताच स्काऊट गाईड कॅम्प पार पडला.
तसे तर बरीच वर्षे स्काऊट गाईडचे कॅम्प होत आले आहेत. परंतू करोना नंतरचा हा पहिलाच कॅम्प होता.
शाळेतील शिक्षिका वाबळे मॅडम या बऱ्याच वर्षापासून यशस्वीरित्या स्काऊट गाईडचे यशस्वी कॅम्प घेतात. त्याचबरोबर त्यांना सहकार्य करण्यासाठी शाळेतील शिक्षिका सौ मागाडे तसेच श्री विकास चव्हाण, श्री लोखंडे सर हे ही बाया कॅम्प मध्ये झाले सहभागी होते.
स्काऊट गाईड चा हा कॅम्प म्हणजे विद्यार्थ्यांना नव्या अनुभवांची अनुभूती असते. या कॅम्पमध्ये विविध स्पर्धा नृत्य, गायन, कोपरा सजावट यांचा समावेश असतो. पण मला सगळ्यात आवडलेला भाग म्हणजे विद्यार्थ्यांच्या पाककृती.
आपण म्हणतो चूल संस्कृती कुठेतरी लुप्त होत आहे. परंतू स्काऊट गाईडच्या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना चूल संस्कृतीची ओळख होते. यासाठी संपूर्ण गट कामाला लागतो .कोण चूल मांडतात.कोणी चुलीसाठी सरपण गोळा करतो. काही जणं खाद्यपदार्थाची तयारी करतात. म्हणजे अगदी सांघिकवृत्तीचा चांगला प्रत्यय इथे येतो.
सर्व विद्यार्थी एक विचाराने आपापली कामे नीट करत असतात. स्वयंपाक बनवणाऱ्या मुली, त्यांना मदत करणारी मुले यातून एका सुंदर मेजवानीचा आणि मैत्रीचाही प्रत्यय येतो. अगदी जीव ओतून सर्व विद्यार्थी स्वयंपाक करत असतात.
आईला स्वयंपाक करताना किती कष्ट पडत असतील याचीही त्यांना जाणीव होते. डब्यामधला आईने दिलेला पदार्थ किती छान झालाय हे ऐकण्यासाठी आई कधीतरी उत्सुक असते. हेही त्यांना माहित पडते कारण शिक्षकांच्या चवीस आपला पदार्थ पात्र ठरतो का ? तो त्यांना आवडतो का ? त्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक प्रकारची आस असते की आमचंही कौतुक कोणीतरी करावं आणि त्यासाठी हे विद्यार्थी अगदी मन लावून तो पदार्थ करत असतात आणि आकाराला आलेला सुंदर असा पदार्थ शिक्षकांपुढे सादर करतात.
या कॅम्प मध्ये अगदी झणझणीत मिसळ, पाणीपुरी, पनीर, खीर, काकडी वडे, थालीपीठ, पराठा, डोसा, मॅगी, नूडल्स, चहा, कॉफी, पोहे असे महाराष्ट्राची तसेच विविध खाद्यसंस्कृती सांगणारे पदार्थ विद्यार्थ्यांनी बनविले होते. यामध्ये सर्वोत्कृष्ट ठरले ते काकडीवडे आणि पोहे. हे दोन्ही विद्यार्थ्यांनी अप्रतिम बनवले होते.
या सगळ्याचा मनसोक्त आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.
सध्या सहली किंवा अशा प्रकारचे स्काऊट गाईडचे कॅम्प हे बाहेर कुठेतरी रिसॉर्ट किंवा अशा ठिकाणी घेऊन जातात. तिथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देता येत नाही. तुम्हांला सर्व तिथे मॅनेजमेंटवाले पुरवत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना सहल म्हणजे दंगामस्ती हे कुठेतरी समीकरण झालेले आहे. सहली या निसर्गरम्य ठिकाणी न काढता वेगवेगळ्या रिसॉर्ट मध्ये काढल्या जातात. विद्यार्थ्यांकडून भरमसाठ पैसा घेतला जातो. परंतु जो आनंद निसर्गात आहे, निसर्गाची विविध रूपे पाहण्यात आहे तो आनंद मात्र कुठेतरी संकुचित अशा डबक्यामध्ये कैद झालेला आहे आणि आता ती संस्कृती होत चालली आहे. असाही आनंदाने आनंद विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.
परंतु ज्याप्रमाणे ही रिसॉर्ट्स बंदिस्त असतात त्याचप्रमाणे कुठेतरी विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती ही बंदिस्त होते. सहसंदर्भ जोडण्याचा सुवर्णमध्ये साधण्याचा विचार हा निसर्गातून येत असतो. परंतु तुम्ही त्यांना जर निसर्गात घेऊनच गेला नाही तर त्यांना हा प्रत्यय येतच नाही. कार्यकारण भाव कळतच नाही. त्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी शाळांनी याचा विचार केला पाहिजे, असे या कॅम्प च्या निमित्ताने आवर्जून सांगावेसे वाटते.

– लेखन : आस. कल्याण
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800