“शाळा हे विद्येचे माहेरघर आहे.” हा सुविचार खरंच किती समर्पक आहे. अगदी सामान्य कुटुंबातील व श्रीमंत कुटुंबातील मुलालाही आपली शैक्षणिक गुणवत्ता शाळेतूनच वाढवता येते.
एIखादी सासुरवाशीन कितीही सुखात जरी सासरी असली तरी माहेरी आल्यावर तिच्या आनंदाला पारावार राहत नाही. आईचे प्रेम तिला माहेरीच अनुभवायला मिळते. तिच्या बालपणीच्या सर्व गोड आठवणी माहेरी आल्यावर उजळल्या जातात.
घरातून शाळेत येणारे मूल आईच्या मायेपासून दुरावते. शाळा त्याला कारावास वाटू लागतो. ते रडू लागते. शाळेतील शिक्षिका मायेच्या ममतेने त्याला जवळ घेतात. नवे खेळ शिकवतात. त्याच्याशी खेळतात. गप्पा मारतात. चित्र काढून रंगवण्यास देतात. गाणी, गोष्टी ऐकवून त्याचे अवधान खेचतात. हळूहळू शाळेविषयी बालकाला गोडी वाटू लागते. काही नवीन मित्र होतात. त्यांच्याशी खेळून, मस्ती करुन हे मूल वर्गात स्थिरावते. ते नियमित शाळेत येते.
शिक्षकाची भूमिका मुलाला शाळेत टिकवून ठेवण्यासाठी मोलाची आहे. शिक्षकाला मुलात मूल होऊन राहावे लागते. तसे न केल्यास मुलांचे शाळेविषयी आकर्षण कमी होताना दिसते. शाळेतील मुले कोणत्या परिसरातील, सामाजिक गटातील, आर्थिक परिस्थितीतील, शैक्षणिक वातावरणातील याचा शिक्षकांनी अभ्यास करणे गरजेचे आहे. शाळेत केवळ वर्ग अध्यापन करणे ही त्याची जबाबदारी नाही. तर विद्यार्थ्यांचा मित्र होणे आवश्यक आहे. बरेच पालक अशिक्षित असतात. काही शिकलेले असले तरी अगदी जुजबी ज्ञान असते. अशा पालकांशी शिक्षकाने संपर्क साधून मुलाला शालेय प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

शाळेचे महत्त्व केवळ शिक्षणापुरते मर्यादीत नसून त्यातून आदर्श नागरिक घडवण्याचे ध्येय साध्य करणे हे आहे हे त्यांना समजावून देणे अगत्याचे आहे. मूल्य संस्कारित व्यक्ती शाळा या वास्तुतूनच घडत असते. झोपडपट्टी, छोट्या वस्ती, आदिवासी पाडा, साखर कारखाने, वीट भट्टी येथील मुले बालकामगार म्हणून काम करताना दिसतात. घरची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने पैशाचा प्रश्न त्यांना भेडसावू लागतो. या मुलांचे, पालकांचे हृदय परिवर्तन करून या मुलांना शाळेत आणण्यासाठी रहिवासी शिक्षक कसोशीने प्रयत्न करतात.
पालकांना शिक्षणाचे महत्त्व नसते. त्यांच्या अबोध मुलांना ते महत्त्व कसे बरे कळणार ? पालकांनी शाळेत पाठवली नाही तर ही मुले शाळेत येत नाहीत. तरीही सरकारच्या सार्वत्रिक शिक्षणाच्या धोरणातून या ठिकाणी ज्या शाळा निर्माण झाल्या आहेत; तेथील संस्थाचालक, पदाधिकारी, शिक्षक वर्ग यांची तळमळ या ठिकाणी कामी येते. बरीच मुले शाळेत येऊ लागतात. शिक्षक अशा दुर्गम भागात जाऊन शिक्षणाचे महत्त्व पालकांना समजावून देण्याचा प्रयत्न करतात.
बऱ्याचदा पैशाची सवय लागलेली मुले मध्येच शाळा सोडतात. त्यातून गळतीचे प्रमाण वाढते. यासाठी शिक्षकाला काही वेळा पदरमोड करून या पालकांसमोर, मुलांसमोर औदार्य भावना दाखवून गळती थांबवणे शक्य आहे.
प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असल्याने बऱ्याचदा पालकांना शाळेत असलेली अगदी क्षुल्लक फी देखील देणे मान्य नसते. दैनंदिन जीवनातील प्रत्येक वस्तूला आपण खर्च करुन विकत घेतो. कुठलीही वस्तू आपल्याला मोफत मिळत नाही. मग शिक्षणासारखं एक अमूल्य असं अमृत आपण पिणार आहोत. त्याचा एक छोटासा मोबदला देखील देणे पालकांना मान्य नसते. याबाबतीत शासनाचे मानावे तितके धन्यवाद कमीच आहेत. मोफत पाठ्यपुस्तके, मध्यान्ह भोजन, गणवेश, वह्या, शालेपयोगी वस्तू यांच्या वाटपातून आपल्याला आज हे मिळणार या आशेने ही मुले उपस्थित राहतात. या ठिकाणी शाळेने, शिक्षकांनी नियमित उपस्थित राहणा-या विद्यार्थ्याचा गुणगौरव केल्यास इतर विद्यार्थ्यांना शाळेविषयी ओढ वाढते. आपल्याला ही बक्षीस मिळावे या लालसेतून ती शाळेत येऊ लागतात. आदर्श शिक्षक असे नवनवीन प्रयोग करत असतो. अशा शिक्षकांचा ही गौरव अपेक्षित आहे.

शाळेतील शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकाशी कटिबंध नसावे. तर त्यात वैविध्यता असावी. मुलांच्या सुप्त गुणांना वाव द्यावा. चित्रकला, हस्तकला, गायन, शारीरिक शिक्षण या मनोरंजनात्मक तासिकेशिवाय मुलांच्या अंगी असलेले सुप्त गुण ओळखून त्या गुणांना वाढीस लावण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. अशा मुलांचा शोध हुशार शिक्षक घेतच असतो. शिक्षण ही काळाची गरज आहे. त्या शिक्षणाबरोबरच कला कौशल्याचा विकास होणे महत्त्वाचे आहे. पूर्वी शिक्षणासाठी विद्यार्थी केवळ शिक्षकावर अवलंबून असत. आता परिस्थिती बदलली आहे. भ्रमणध्वनी, टॅब लॅपटॉप, टीव्ही अशी विविध माध्यमे शिक्षण देणारी केंद्रे बनली आहेत. घरातील लहान मुले ही भ्रमणध्वनीवर गाणी, गोष्टी ऐकतात, खेळ खेळतात. तंत्रज्ञानाच्या जवळ जाणारी ही पिढी केवळ शिक्षकांवर अवलंबून नाही. या मुलांना समाजात मानाने जगता यावे यासाठी केवळ अध्ययन-अध्यापन न करता तंत्रज्ञानाचा आधार घेणे महत्त्वाचे आहे.
बरेच पालक दोघेही नोकरीला जातात. त्यांची मुले घरात एकटीच असतात. त्यांची तयारी करणे, डबा देणे, त्यांना शिकवणे, घरातील दैनंदिन कामे पालकांना जमत नाहीत. अशावेळी शिक्षकाला पालक व्हावे लागते. तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत शिक्षिका विद्यार्थीनीच्या पालकांशी संपर्क साधून मुलीला नियमित शाळेत पाठवण्याची विनंती करते. यातून आपल्या लक्षात येईल शाळेत केवळ शिकवण्याचे आपले काम नसून बदलत्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत टिकवून ठेवणे गरजेचे आहे. शासकीय नियमानुसार सर्वेक्षण करून शालाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणावे लागते. अशा पालकांशी संपर्क साधून त्यांना शिक्षकांचे महत्त्व पटवून द्यावे लागते. त्यांच्या अडचणी जसे- मुलांची फी, पाठ्यपुस्तके, त्यांना डबा देणे, वेळेवर शाळेत पोहोचवणे. या अडचणी शिक्षकाने त्यांचे पालक होऊन सोडवाव्या लागतात. त्यांची फी माफ करणे, मोफत पाठ्यपुस्तके पुरवणे व डबा नसल्यास तो देणे, शाळेत मध्यान्ह भोजनाची व्यवस्था योग्य प्रकारे पार पाडणे. यात खेड्यापाड्यातील शिक्षकांचे अथक प्रयत्न असतात.

बऱ्याच दुर्गम भागात शाळा व घर यांचे अंतर दूर असल्याने पालक मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दर्शवतात. या शाळांसाठी योग्य मोफत वाहन व्यवस्था असावी. यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. संस्था, मुख्याध्यापक, रहिवासी यांना समजावून देऊन वाहन व्यवस्था करावी. शाळेत कधीकधी परिस्थिती हाताबाहेर होते. एखादा खोडकर विद्यार्थी खोड्या काढतो. त्याला पाहून इतर काही अनुकरण करतात. शिक्षकाला यावेळी समंजसपणे परिस्थिती हाताळावी लागते. रागाच्या भरात शिक्षक मुलांवर ओरडतात. एखादा विद्यार्थी या घटनेला आपला अपमान समजून शाळेत अनुपस्थित राहतो. एक-दोन दिवसात बाब शिक्षकांच्या लक्षात येते. शिक्षकाने याबाबतचे कारण शोधून त्यावर उपाययोजना करावी लागते. किंबहुना करणे फार गरजेचे आहे. शिक्षक पालकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्ककरून पाल्याच्या अनुपस्थितीचे कारण समजू शकतात. तीन-चार दिवसांपेक्षा अधिक कालावधी मूल शाळेत न आल्यास शिक्षकाने त्या मुलांच्या घरी जाणे गरजेचे होते. शिक्षकाच्या या स्नेहपूर्ण व्यवहारातून मूल परत शाळेत येते. मुलांना शिक्षा करताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र लक्षात घेणे काळाची गरज आहे.
अभ्यासात असणारा तोचतोचपणा कधी कधी कंटाळवाणा होतो. अशा वेळेस शिक्षकांना मुलांच्या कलाने घ्यावे लागते. परिपाठात कथा सादर करणाऱ्या मुलांचे व्हिडिओ तयार करून त्या त्या वर्गाच्या व्हाट्सअप ग्रुपला पाठवा. ते युट्यूबवर अपलोड करा. त्यातून विद्यार्थी, पालकांना आनंद मिळून शाळेच्या शिरपेचात तुरा रोवला जाईल. मुलांना शिक्षा करताना त्या शारीरिक असण्यापेक्षा बौद्धिक, मनोरंजनात्मक असाव्यात. त्यामुळे शिक्षकाबद्दल वाटणारी भीती दूर होऊन मोकळ्या, स्वतंत्र वातावरणात मुलांच्या गुणांचा विकास होईल. त्यांना एखादे शैक्षणिक साहित्य बनवणे, गाणे म्हणून दाखवणे, गोष्ट सांगणे, नकला करून दाखवणे, एका शब्दाला अनेक भाषेत बोलणे, विनोद ऐकवणे असे मनोरंजनात्मक उपक्रम देऊन शिक्षेतून शिक्षण ही नवीन संकल्पना अस्तित्वात आणता येईल.
पालक, विद्यार्थी, संस्थाचालक यांच्यातील एक महत्त्वपूर्ण दुवा म्हणजे शिक्षक. याचा अर्थ असा नव्हे की शिक्षकाच्या खांद्यावर जोखड ठेवून पालकांनी, विद्यार्थ्यांनी, शाळेने निश्चिंत रहावे. तर या कामी शिक्षकांना सरकार, पालक, विद्यार्थी, समाज अशा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. शाळा ही एक आनंददायी वास्तू आहे. “मुले ही शाळेतील फुलबाग आहे.” तिला फुलवण्यासाठी सर्वांनी आपापल्यापरीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुले नसतील तर त्या शाळेला महत्त्व राहणार नाही. कोरोना काळात अगदी मोठमोठ्या शाळेमधील विद्यार्थी संख्या कमी झाली आणि जिल्हा परिषदेसारख्या कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली. खरंच एक शिक्षक म्हणून मला वाटतं आपल्या वर्गातील विद्यार्थी शंभर टक्के उपस्थित असणे म्हणजे त्या शिक्षकाची विजयी घोडदौड आहे.

— लेखन : डॉ.सौ.शुभांगी गादेगावकर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800