प्रिय मधुभाई,
स.न.वि.वि.
प्रिय भाई ,
२८ एप्रिल १९३१ रोजी आपला जन्म झाला. आज आपण ९२ व्या वर्षात पदार्पण करत आहात, त्याबद्दल आपणांस हार्दिक शुभेच्छा.
‘कोकणी गं वस्ती’ हा आपला पहिला कथासंग्रह १९५८ साली प्रकाशित झाला आणि त्यानंतर आपल्या साहित्य निर्मितीला वेग आला. आपणांस अनेक मानसन्मान मिळू लागले.
आपण निर्माण केलेल्या साहित्याचा व मिळालेल्या मानसन्मानाचा आढावा….
२८ एप्रिल २००१ रोजी कणकवली येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सत्तरावा वाढदिवस साजरा झाला त्यावेळेस चाहत्यांच्या वतीने प्रकाशित झालेल्या
“मधुघट” या गौरवग्रंथात घेण्यात आला आहे. याच कार्यक्रमात मला राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्ध्येत दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.
आणि आपल्याला सांगायला मला आनंद होतो की, तेव्हापासून माझी अकरा पुस्तके प्रकाशित झाली
विविध दिवाळी अंक व दैनिकांत तीनशे पन्नास लेख, सहा हजार पत्रे प्रसिद्ध झाली. याशिवाय काव्य लेखन, कथा लेखन, कथा कथन, निबंध लेखन, एकांकिका लेखन, वक्तृत्व स्पर्धा यामध्ये अडीचशे पुरस्कार लाभले.
माझ्या सारखाच अनुभव अनेकांचा आहे. आपण नवोदितांसाठी परीस आहात. लोखंडाला परीसाचा स्पर्श झाला की त्याचे सोने होते, असे म्हणतात. तसेच तुमचे आशिर्वाद ज्यांना ज्यांना लाभले त्यांना साहित्य क्षेत्रांत चांगले स्थान लाभले आहे. “कोकण मराठी साहित्य परिषद” स्थापन करून अनेक “साहित्यिक” निर्माण केले आहेत. “कोमसाप” च्या स्थापनेपूर्वी जे नवोदित होते ते मान्यवर साहित्यिक झाले आहेत. त्याचे सर्व श्रेय आपणांस आहे.
आकर्षक व्यक्तिमत्व, ऐकत रहावे असे वक्तृत्व, लक्षांत राहील असे कर्तुत्व यांचा संगम झाल्यामुळे आपण नवोदितांचे हृदयसम्राट आहात. आपण प्रसिध्दीपेक्षा सिध्दीला जास्त महत्व देत आला आहात. नवोदित साहित्यिकांचा विकास हाच आपला ध्यास आहे. साहित्य हाच आपला श्वास आहे. समाजसेवा हेच आपले जीवन आहे. वादापेक्षा संवाद आणि संघर्षापेक्षा समन्वयावर जोर देऊन अर्थपूर्ण जीवन जगणे हाच आपल्या जीवनाच्या यशस्वितेचा मंत्र आहे.
भाई, आपण खुप साहित्य निर्माण केले आहे आणि अजूनही करीत आहात.
त्याचप्रमाणे आपणांस मोठमोठे मानसन्मानही मिळत आहेत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासारख्या अत्युच्च स्थानी गेल्यावरही आपण साहित्य व समाजसेवा सारख्याच निष्ठेने पार पाडत आहात.
अनेक ज्येष्ठ साहित्यिकांच्या चाहत्यांना आपल्या आवडत्या साहित्यिकाने शेवटपर्यंत नवीन साहित्य निर्माण करावे असे वाटत असते. ज्येष्ठ कवी भा.रा.तांबे यांच्या चाहत्याने त्यांच्या जवळ अशीच मागणी केली तेव्हा म्हणजे जवळ जवळ शंभर वर्षांपूर्वी १९२३ साली त्यांनी “रिकामे मधुघट” ही कविता लिहिली. त्या कवितेत ते म्हणतात,
“मधु मागशि माझ्या सख्या परि
मधुघटचि रिकामे पडति घरी !”
भा. रा. तांबे यांच्या मताशी अनेक ज्येष्ठ साहित्यिक सहमत असले तरी आपण याला अपवाद आहात. कारण आपल्या नावातच “मधु” आहे. सर्व चाहत्यांच्या वतीने आपणांस दीर्घायुष्य व चांगले आरोग्य लाभो तसेच आपला “मधुघट” शेवटपर्यंत भरलेला राहो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
आपला नम्र,

– दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800