Wednesday, June 18, 2025
Homeलेखप्रिय मधूभाई...

प्रिय मधूभाई…

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे. दोन लाख रुपये, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी २५ नोव्हेंबर २०२२ रोजी चव्हाण केंद्राचे अध्यक्ष श्री शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. या निमित्ताने त्यांच्या एका सुहृदाने रेखाटलेला ही जीवन प्रवास…
– संपादक

कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, १९९१ साली रत्नागिरी येथे झालेल्या ६४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले व साहित्य क्षेत्रात अनेक मानसन्मान मिळवलेले ज्येष्ठ साहित्यिक श्री मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म २८ एप्रिल १९३१ रोजी करूळ, ता.देवगड, जि. रत्नागिरी (सध्याचा ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण करूळ येथीलच प्राथमिक शाळेत १९३८ ते १९४२ पर्यंत झाले. तर कणकवली येथील शाळेत १९४२ ते १९५१ पर्यंत माध्यमिक शिक्षण झाले. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे व आई – वडिलांचे लहानपणी निधन झाल्यामुळे त्यांना इच्छा असूनही पुढे शिकता आले नाही.

मधू भाईंच्या नोकरीची सुरुवात ९ फेब्रुवारी १९५२, एस.टी. कार्पोरेशन मध्ये कारकून म्हणून झाली. शिक्षण जरी कमी असले तरी अफाट बुध्दिमत्ता, कल्पकता, चिकाटी व मेहनत घेण्याची तयारी असल्यामुळे गोवा सरकारमध्ये “प्रकाशन अधिकारी”, महाराष्ट्र शासनाच्या माहिती खात्यात “सहाय्यक संचालक”, महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे जनरल मॅनेजर पर्यंत कर्णिक यांनी मजल मारली. पण तात्विक मतभेद झाल्याने त्यांनी ३० सप्टेंबर १९८३ रोजी निवृत्ती स्वीकारून पूर्णपणे साहित्य निर्मितीकडे लक्ष दिले.

मधुभाईंचा विवाह १० मे १९५४ रोजी कु.शशिकला शंकर कुलकर्णी यांच्याशी झाला.प्रत्येक यशस्वी पुरुषाच्यामागे एक स्त्री खंबीरपणे उभी असते, तशीच मधुभाईंच्या मागे सौ. शुभदा वहिनी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी स्वतः संसाराची धुरा सांभाळली व मधुभाईंना साहित्याचा संसार करण्यासाठी मोकळीक दिली त्यामुळे मधुभाई साहित्यनिर्मिती करू शकले.

मधुभाईंना वडिलांमुळे वाचनाची आवड बालपणापासूनच लागली व त्यातूनच लेखनाची आवडसुध्दा निर्माण झाली. भाईंनी शालेय जीवनात हस्तलिखिताचे संपादकत्व केले व त्यात कविता व गोष्टीही लिहिल्या.

भाईंची पहिली कविता १९४५ मध्ये “बाल सन्मित्र” मध्ये प्रसिद्ध झाली. यानंतर मौज, साधना, दीपावली, वीणा इत्यादी दिवाळी अंकांतून त्यांच्या अनेक कविता प्रसिध्द झाल्या असल्यातरी त्यांचा पहिला कविता संग्रह “शब्दांनो मागुते या” हा २८ एप्रिल २००१ रोजी प्रसिध्द झाला. त्यात ८५ निवडक कवितांचा समावेश आहे. ज्येष्ठ कवींच्या मते भाईंच्या कवितांत अंतरीचा उमाळा आहे. प्रासादिकता, उस्पुर्तता, उत्कटता हे यातील कवितांचे विशेष आहेत.

मधुभाई लहानपणापासून कथा लिहित असले तरी “कृष्णाची राधा” ही पहिली लघुकथा १९५१ साली रत्नागिरीच्या “रत्नाकर” या मासिकात प्रसिध्द झाली. त्यानंतर अनेक अंकात त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या.

“कोकणी ग वस्ती” नावाचा पहिला कथा संग्रह १९५८ साली प्रसिद्ध झाला. त्यांनी सातशेच्यावर कथा लिहिल्या असून त्यांचे ३६ कथा संग्रह प्रसिध्द झाले आहेत. “तोरण” व “तहान” हया कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनातर्फे पुरस्कार मिळाला आहे. कर्णिक यांच्या अनेक कथा परभाषांत अनुवादित झाल्या आहेत.

कर्णिक यांची पहिली कादंबरी “माहीमची खाडी” १९६९ ला प्रसिद्ध झाली. त्यानंतर देवकी, निरभ्र, जुईली, भाकरी आणि फूल, सनद, वारूळ, सूर्यफूल, कातळ, संधीकाल अशा दहा कादंबऱ्या प्रसिध्द झाल्या.

कर्णिक यांची ललित गद्यात समाविष्ट होणारी सोबत, नैऋत्त्येकडला वारा, जिवा भावाचा गोवा, माझा गांव माझा मुलुख हया पुस्तकांचा समावेश होतो.

कर्णिक यांच्या “स्वप्नपूर्ती” या कथेवर “घुंगरु” हा हिंदी चित्रपट प्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केला. अरुणा राजे यांच्या कथेवरील “पतितपावन” या चित्रपटाची पटकथा, संवाद व गाणी कर्णिक यांनी लिहिली.

कर्णिक यांनी लिहिलेल्या “देवकी” या नाटकाचा पहिला प्रयोग १९६२ साली रंगमंचावर झाला. केला तुका झाला माका हे नाटक प्रकाशित झाले नसले तरी मच्छिंद्र कांबळी यांनी त्याचे ३५० प्रयोग सादर केले.

भाकरी आणि फुल, जुईली, रानमाणूस, सांगाती या दूरदर्शन मालिका कर्णिक यांनी लिहिल्या. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांचे अराजकीय चरित्र कर्णिक यांनी “दूत पर्जन्याचा” हया नावाने १९९४ साली प्रसिद्ध केले.

कर्णिक यांची लागेबांधे, अमीरगुलाल, ही व्यक्तिचित्रे तसेच जगन्नाथ आणि कंपनी, शाळेबाहेरील सवंगडी हे बालवाड्मय प्रसिद्ध झाले आहे.

कर्णिक यांनी अनेक नियतकालिकांत स्तंभ लेखन केले आहे. आकाशवाणीवर अनेक नभोनाट्य, श्रुतिका, भाषणे, मुलाखती, कथावाचन, व्यक्तिचित्रवाचन इत्यादी अनेक कार्यक्रम कर्णिक यांनी सादर केले आहेत.

कर्णिक यांनी फक्त साहित्य निर्मिती केली नाही तर साहित्यिक चळवळीसाठी २४ मार्च १९९१ रोजी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली.
आज कोमसाप अत्यंत दिमाखात उभी राहिली आहे.
त्यांच्याच प्रयत्नाने मालगुंड येथे केशवसुत स्मारक उभारण्यात आले आहे.

मधुभाई नवोदित लेखकास त्याच्या साहित्यातील उणीवा कणाएवढ्या करून तसेच त्यातील गुणवत्ता मणाएवढी करून प्रोत्साहित करत असल्याने १९९१ पासून अनेक नवोदित मान्यवर कवी लेखक म्हणून नावारूपाला आले आहेत.

आकर्षक व्यक्तिमत्व, ऐकत रहावे असे वक्तृत्व व लक्षात राहील असे कर्तुत्व यांचा संगम झाल्यामुळे मधुभाई नवोदित साहित्यिकांचे हृदयसम्राट झाले आहेत. मधुभाईंनी प्रसिध्दीपेक्षा सिध्दीला जास्त महत्व दिले आहे. नवोदित साहित्यिकांचा विकास हाच त्यांचा ध्यास आहे. साहित्य हाच त्यांचा श्वास आहे, ज्ञानदान हेच त्यांचे जीवन आहे. वादापेक्षा संवाद आणि संघर्षापेक्षा समन्वयावर जोर देऊन अर्थपूर्ण जीवन जगणे हाच त्यांच्या जीवनाचा यशस्वितेचा मंत्र आहे.

सामाजिक कार्य
हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक स्मारक समिती , करूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, सह्याद्री ग्लास वर्क्स लिमिटेड, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग सांस्कृतिक केंद्र, कोकण कला अकादमी, नाथ पै वनराई ट्रस्ट, कविवर्य केशवसुत स्मारक समिती, महाराष्ट्र गोमंतक मैत्री संघ, भाऊसाहेब वर्तक फौंडेशन, कवी माधव स्मारक ट्रस्ट, जागतिक मराठी अकादमी इत्यादी संस्थांच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. या सर्व संस्थांमध्ये त्यांनी विविध पदे भुषवली आहेत.

मिळालेले मानसन्मान
२००२ साली मधु मंगेश कर्णिक यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत केले आहे. त्यांच्या साहित्याला महाराष्ट्र सरकारतर्फे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

याव्यतिरिक्त मॅजेस्टिक पुरस्कार, अनंत काणेकर पुरस्कार, दमाणी साहित्य पुरस्कार, रणजित देसाई साहित्य पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून आता यशवंतराव चव्हाण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

वयाच्या ९१ व्या वर्षीही तरुणांना लाजवतील अश्या उत्साहाने काम करणाऱ्या भाईंना दीर्घायुष्य व चांगले आरोग्य लाभो ही परमेश्वरचरणी प्रार्थना.

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

दिलीप गडकरी

– लेखन : दिलीप प्रभाकर गडकरी. कर्जत – रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?