माझ्यामते ७५ ही सात आणि पाचची जोडी नगर येथील आमचे स्नेही, मित्र फिरोजभाई तांबटकर यांच्यासाठी फक्त एक आकडा आहे.
इतके ते आजही अॕक्टीव्ह असून आपल्या कामात मग्न आहे
फिरोज भाई कसे आहात ? असे विचारले की, उत्तर येणार या घडीला तरी ठिक आहे.
बोला !
ही वाक्ये ऐकली की खूप छान वाटते.
आपल्या जीवनाचा इतका चांगला समंजसपणा सांगणारे फिरोजभाई एक दिलखुलास व्यक्तीमत्व आहे.
नगरची ओळख अतिशय बहुरंगी, बहुढंगी आणि वैविध्यपूर्वक आहे. त्यात नगरचा इतिहास, समाज, संस्कृती, विविध भाषा, विचार, खाद्य संस्कृती, रुढी परंपरा, नगरची लोकं, नगरचा व्यापार, मंदिर, मशिद, चर्च इत्यादीचा समावेश होतो. आपल्या गावात एवढी मोठी विविधता आहे हे आपल्याला माहित सुद्धा नसते.
पण थांबा !
हा तुमचा समज चुकीचा आहे. नगरचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आपल्या कडे अनेक मार्ग आहेत. त्यामध्ये अतिशय जवळचा व हक्काचा मार्ग म्हणजे आमचे फिरोजभाई तांबटकर.
डोक्यावर बांधलेला पांढरा पटका, छान ठेवलेली पांढरी दाढी, दोन पाॕकेटचा पांढरा ढगळ सदरा, घोळदार पंजाबी पायजमा, अनुभवाने रापलेला चेहरा, खर्जातील आवाज, गप्पीष्ठ असे फिरोजभाई पाहता क्षणिक आपल्या मनात भरतात.
डोक्यापासून पायापर्यंत त्यांच्या पेहरावात सफेद रंग !हा सफेद रंग म्हणजे त्यांचे निर्मळ मन. ही भावना फिरोजभाईंकडे बघितल्यावर आपल्या मनात येते. अत्यंत उत्साही व्यक्तीमत्व, बोलका स्वभाव, तब्येत एकदम ठणठणीत, दिलदारपणा, वाचनाची आवड, व्यायामाची आवड, कायम सकारात्मक विचार, दुसऱ्यास मदत करण्याची आवड, असे विविध पैलू आपणास फिरोजभाईं मध्ये दिसुन येतात.
आपण जर दाणेडब-यात गेलो तर “बाॕम्बे फर्निचर” हे नाव सर्व नगरकरांना परिचित आहे. याच फर्मचे मालक फिरोजभाई तांबटकर यांचा जेव्हा माझा परिचय झाला तेव्हापासून त्यांच्या व्यक्तीमत्वाची अनेक वैशिष्ट्ये मला दिसायला लागली. पिठाची गिरणी ते बाॕम्बे फर्निचर नंतर न्यु बाॕम्बे किचन हा त्यांचा प्रवास त्यांच्या चर्चेतून अनुभवता आला आणि मी खूप प्रभावित झालो.
साध्या पिठाच्या चक्की पासुन सुरु झालेला हा प्रवास खरेच थक्क करणारा आहे. आज हा व्यवसाय नगर व पुणे येथे यशस्वीपणे पुढे जात आहे.
फिरोजभाई म्हणजे अतिशय खटपट्या माणूस. तांत्रिक ज्ञानाची उपजत जाण असल्यामुळे त्यांच्या व्यवसायाच्या प्रगतीमधे त्यांना कधीही अडचण आली नाही. शिटमेटलच्या कामाचा तांत्रिक अनुभव असल्यामुळे सुरूवातीला त्यांनी आपल्या व्यवसायासाठी कमी खर्चातील मशिनरी बनवली. हा त्यांच्या जीवनातील एक आनंदाचा ठेवा आहे असे ते अभिमानाने सांगतात.
एखादा माणूस आपला व्यवसाय सांभाळून किती चतुरस्त्र असु शकतो हे त्यांच्या बरोबर संवाद साधल्यावर समजते.
त्याचाच एक अनुभव सांगतो. नगरच्या विविध भागात अनेक पुतळे आहेत. परंतु या पुतळ्यांची सखोल माहिती कोणालाही नव्हती ही गोष्ट फिरोजभाईना नेहमी खटकत असे. यावर उपाय म्हणून या पठ्ठ्याने आपल्या मित्रांच्या मदतीने नगरमधील प्रत्येक पुतळ्यास भेट देऊन त्याची सुंदर माहिती तयार केली
व ख-या अर्थाने नगरमधील या पुतळ्यांना सन्मान मिळवून दिला.याला म्हणतात समाज सेवा !
मी फिरोजभाईंना नगरचा चालता बोलता इतिहास म्हणून संबोधतो. त्याचे कारण म्हणजे या माणसास नगरची असलेली खडा नं खडा माहिती. नगरच्या गल्ली बोळात हा माणूस फिरला आहे. प्रत्येक समाजाची तपशिलवार माहिती या माणसाकडे आहे. नगरमधे घडलेल्या प्रत्येक घटनांचा भाई साक्षीदार आहेत.
साठ सत्तर वर्षापूर्वीची कुठलीही माहिती फिरोजभाईंना विचारा, ती माहिती त्यांना अगदी तोंडपाठ असते !काही दिवसांपुर्वी मी त्यांना नगरच्या एका भागाचा एक खूप पुरातन फोटो पाठवला. हा भाग कुठला ? असे विचारले तर, फिरोजभाईंनी पटकन त्या भागाची सविस्तर माहिती सांगितली.
क्या बात हैं !!
मी तर आश्चर्य चकीतच झालो. म्हणूनच फिरोजभाई हे नगरचा चालता बोलता इतिहास आहे.
मी काही महिन्यापूर्वी नगरच्या सिंधी समाजावर लेख लिहीत होतो. त्या वेळेस फिरोजभाईंनी मला एक तास फोन वर सिंधी समाजाचा इतिहास सांगितला. सिंधी भाषेतील काही महत्त्वाचे संदेश त्यांनी सांगितले की जे सिंधी समाजालाही माहीत नव्हते. त्यामुळे तो लेख सर्वांग सुंदर झाला होता.
भाई नगरमधे घडलेल्या घटना, प्रसंग, कुस्तीचे सामने, गणपती, मोहरम, दिवाळी, राजकारण, समाजकारण, व्यापार कारखानदारी, दुकानदारी, नगरची संस्कृती यांचा आँखो देखा हाल अगदी तपशीलवारपणे सांगतात. त्यामुळे ते प्रसंग आपल्या डोळ्यासमोर जसे च्या तसे उभे राहतात.
फिरोजभाईनी ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे असे मला वाटत नाही. इतका त्यांचा उत्साह, फिटनेस आजही कायम आहे.
आपण फिट कसे रहाता ? असे मी त्यांना सहज विचारले. त्यांनी जे सांगितले त्याने तर मी उडालोच ! ते म्हणाले, “खर सांगू का ? माझ्या घरात टिव्ही नाही. खरे वाटत नसेल तर येऊन बघा. परंतु माझ्याकडे माझी स्वतंत्र लायब्ररी आहे. मी माझा वेळ वाचनात घालवतो. त्यातच मला आनंद मिळतो”.
भाई आता मुडमधे आले होते.
“अजुन एक, माझ्या घरात माझी स्वतःची जीम व टेबल टेनीसचा टेबल आहे. तिथे मी जमेल तसा व्यायाम व खेळत असतो.
मी बारा ही महिने नगर क्लब मधील स्विमिंग चुकवत नाही”, हे ते अभिमानाने सांगत होते.
हे सर्व ऐकून मी अचंबितच झालो.
“सकाळी न चुकता सायकलवर फिरायला जाणे, पोहणे, मित्रांबरोबर भरपूर गप्पा मारणे, स्वतःच्या व्यवसायात रमणे, हे माझे छंद आहेत. अजुन काय पाहिजे आयुष्यात ?” असे त्यांनी मलाच विचारले. हे ऐकल्यावर मी स्वतःच माझ्या मनात बघायला लागलो.
फिरोजभाई म्हणजे अष्टभाषा जाणणारा माणूस. भाई कोणकोणत्या भाषा येतात तुम्हाला ?
असे विचारले तर ते सहज सांगतात, “मराठी, संस्कृत, हिंदी इंग्रजी, उर्दू, मारवाडी, पंजाबी, सिंधी, गुरुमुखी अशा विविध भाषां मी बोलू शकतो”. या भाषांचा अभ्यास भाईंनी केला आहे, असे त्यांनी अभिमानाने सांगितले. त्याची प्रचिती त्यांच्याशी बोलताना मला येत होती. अगदी सहजपणे संस्कृत मधील विविध श्लोक त्यांनी छान म्हणून दाखवले.
भाई बोलत होते व मी नुसते ऐकत होतो.
“सोहोनी साहेब, माझ्या नातीने संस्कृत मध्ये १०० पैकी ९९ मार्क मिळवले आहेत”. हे ऐकून शिक्षणाला कुठल्याही भिंती नसतात हे मी समजून चुकलो.
दोन मुलं व तीन मुली असलेले फिरोज भाई, स्वतः सोसायटी हायस्कुल व नगर काॕलेज मधून बीकाॕम पर्यंत शिकले आहेत. त्यांनी आपल्या मुलांना इंजिनियरींग पर्यंत शिक्षण दिले आहे.
आज त्यांची मुले न्यु बाॕम्बे किचनचा मोड्युलर किचन तयार करण्याचा व्यवसाय पुणे व नगर येथे यशस्वीपणे सांभाळत आहेत.
आमच्या गप्पा चालू असताना वेळ कसा गेला हे समजले पण नाही. इतका हा माणूस सखोल व माहितीरूप आहे.
आमच्या गप्पा अशाच पुढे चालू होत्या. फिरोजभाई आपल्यावर कोणाचा प्रभाव आहे ?
असे विचारल्यावर ते म्हणाले, “अहो, आमचे खोपकर सर, शिंदे सर यांनी माझ्यावर खूप चांगले संस्कार केले. त्यांचा माझ्यावर प्रभाव आहे. त्यांना मी विसरू शकत नाही” असे त्यांनी प्रांजलपणे सांगितले..
“तसेच माझा जैन व ब्राम्हण मित्रांबरोबरचा सहवास माझ्यासाठी खुप महत्त्वाचा आहे. या समाजाचे संस्कार माझ्यावर आहेत”. हे ते अभिमानाने सांगतात. त्यांनी जैन समाजाच्या एका कार्यक्रमात मारवाडी भाषेत संभाषण साधून सुर्यास्ता अगोदरच्या जेवणाचे महत्त्व लोकांना पटवून दिले होते ! हे फक्त फिरोजभाईच करु शकतात.
भाईंनी आपला व्यवसाय प्रगतीपथावर नेत असताना सर्व समाजात आपले संबंध निर्माण केले.
त्यातूनच नगरमधे त्यांचे अनेक जीवाभावाचे मित्र जोडले गेले. दिवंगत खासदार दिलीप गांधी हे त्यांचे सुरवातीपासून जिवाभावाचे मित्र होते.
नगराच्या कुठल्याही विषयावर त्यांच्याशी गप्पा मारा, त्यात ते बोलायला लागले की आपण त्या काळात गेलो आहोत असेच वाटते. इतकी तपशिलवार माहिती फिरोजभाई अगदी सहज सांगतात.
खेळ, पैलवानकी, कुस्ती, धर्म, शिक्षण भाषा, वाचन, आचार विचार, इतिहास, डाॕक्टर कलावंत, कलाकार नगरच्या चांगल्या वाईट घटना, असा कुठलाही प्रसंग असो, विषय असो फिरोजभाई अगदी डिटेल माहिती देणारच. म्हणून ते नगरचा चालता बोलता इतिहासच आहे.
फिरोजभाई आपणास नगरमधील कुठली गोष्ट आवडते ?
“अरे बाबा, सगळे नगरच मला आवडते !
पण पौर्णिमेच्या दिवशी आपला चांदबिबीचा महाल पहायला मला खूप आवडतो”. याला म्हणतात छंद !असे छंद आपल्याला समाजात फार कमी बघायला मिळतात. म्हणून फिरोजभाई आपणास वेगळे वाटतात
भाई, नगर आपल्याला का आवडते हे सांगताना म्हणतात, “अरे, स्वस्त आणि मस्त असं आपले नगर आहे. असे शहर दुसरीकडे मिळणे दुर्मिळ आहे. नगरची हवा वातावरण एकदम मस्त आहे”. हे त्याचे बोलणे ऐकल्यावर मी नगरचा आहे यांचा मला अभिमान वाटायला लागला.
या माणसाला मंदिर, मशिदी पेक्षा नगरच्या स्नेहालय या संस्थेचे महत्त्व जास्त वाटते. फिरोजभाई सांगतात,
“मंदिर, मशिदीत जाण्यापेक्षा स्नेहालयात जा. तिथे खरा देव आहे”. त्याच वेळी ही व्यक्ती सर्वाथाने किती वेगळी आहे याची लगेच जाणीव होते.
भाईंनी स्नेहालयाच्या माध्यमातून आपले सामाजिक भान जपले आहे. ही बाब मला खूप महत्त्वाची वाटली.
त्यामुळेच स्नेहालयाच्या गिरीष कुलकर्णींनी अशा वेगळ्या व्यक्तीमत्वाची ट्रस्टी म्हणून आपल्या संस्थेवर नेमणूक केली आहे ही बाब आम्हां नगरकरांना अभिमानाची आहे.
या सर्व व्यापातून फिरोजभाई वेळ काढून वेगवेगळ्या मोठया प्रदर्शनांना भेट देत असतात. अशा भेटीमुळे आपले ज्ञान वाढते असे त्यांचे मत आहे.
मी रोज नवीन काहीतरी शिकत असतो असे ते अभिमानाने सांगतात.
“या सर्व प्रवासात माझ्या पत्नीची साथ व मुलांमुलींचा पाठींबा मला खूप महत्त्वाचा वाटतो” असे भाई नम्रपणे सांगतात.
फिरोजभाईंशी सहज गप्पागोष्टी चालू होत्या. त्यात कुठलाही मी पणा नव्हता. भरभरुन बोलत रहाणे व लोकांना आनंद देत रहाणे असा अनोखा छंद भाईंनी जपला आहे. त्यामुळे त्यांचे बोलणे संपूच नये असे वाटते.
पंचाहत्तरीमधे असा जीवाभावाचा मित्र मला मिळणे या सारखा दुसरा आनंद नाही. याची फिरोजभाईंशी बोलल्यावर माझी मनोमन खात्री पटली.
मी सहज विचारले, “फिरोजभाई, काय दिले तुम्हाला या जीवनाने” ?
ते म्हणाले, “आनंद, नम्रता, आत्म विश्वास, बंधूभाव,
समाजसेवेची गोडी, जिवाभावाचे मित्र, कष्ट करण्यासाठी उर्मी, स्वप्न बघायला शिकवणे, जीवन जगण्याचा मार्ग, घेण्यापेक्षा देण्यावर जास्त भर, त्यागाची भावना, आत्मिक सुख, निरपेक्ष भावना,
सकारात्मक दृष्टिकोन अजून काय पाहिजे” ?
साधी राहणी व जीवनाचा आनंद अनुभवायचा असेल तर फिरोजभाई सारखा माणूस नाही.
लवकरच परत भेटू या,
हे कबूल केल्यावर त्यांनी मला प्रेमाचा निरोप दिला.
अशा आगळ्यावेगळ्या फिरोजभाईंना माझा मानाचा मुजरा. फिरोजभाईंना उत्तम आरोग्य व दिर्घ आयुष्य लाभो, हीच महागणपतीकडे प्रार्थना.
माहिती सहकार्य : बाळासाहेब पंतगे

– लेखन : विश्वास सोहोनी.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800