आचार्य विनोबा भावे यांचे प्रायोपवेशन
‘बातमीदारी करतानाचा’ या लेखमालेच्या हा अकरावा भाग. स्वतः पाहिलेल्या प्रसंगाचे आणि अनुभवाचेच लिखाण करायचे, इतरांच्या अनुभवावर लिहायचे नाही आणि मतप्रदर्शन तर थोडेही करायचे नाही हा स्वतःवर घातलेला निर्बंध आहे.
आतापर्यंत कटाक्षाने हे पाळत आलो आहे. या लेखात मात्र हा निर्बंध मी पाळलेला नाही. संपूर्ण लेखच माझे बातमीदार मित्र, प्रवीण बर्दापूरकर यांनी लिहिलेला आहे. याचा खुलासा आधीच करणे अतिशय आवश्यक आहे .
आचार्य विनोबा भावे प्रायोपवेशन करीत असताना १९८२ च्या दिवाळीच्या या दिवशी त्यांचे महानिर्वाण झाले. त्याची बातमी अख्या जगाला देण्याचे श्रेय मला मिळाले. पत्रकारितेच्या क्षेत्रात याचे खूप कौतिक असते पण, माझ्या आधी नागपूरहून पवनारच्या आश्रमात जाऊन-येऊन दहा पंधरा दिवस रोज कष्ट करणाऱ्या इतर बातमीदारांच्या श्रमाचे मोल काही कमी नाही.
प्रवीण बर्दापूरकर यांनी, खूप नंतर लिहिलेल्या एका लेखात त्या दहा पंधरा दिवसांच्या घटनांचे अत्यंत तटस्थपणे चित्रण केले आहे. ‘डायरी’ या त्यांच्या पुस्तकात (प्रकाशक- देशमुख आणि कंपनी, पुणे) प्रांजळपणे, किरण ठाकूरने निधनाच्या बातमीत इतर बातमीदारांवर कशी बाजी मारली आणि आपली बातमी कशी हुकली हे मोकळेपणाने लिहिले आहे. बातमीसाठी कष्ट कसे घ्यावे लागतात, त्यात कशा अडचणी येतात याचा तपशील त्यांनी दिला आहे. या प्रसंगाआधी आमची ओळख देखील नव्हती पण, पत्रकार सहकाऱ्याला शाब्बास म्हणण्याचा मोठेपणा त्यांनी दाखविला. हे देखील कौतुक करण्याजोगेच ! या पूर्ण लेखाचे श्रेय एकट्या प्रवीणचेच आहे. त्यामुळे मी फक्त त्यांचा लेख पुनर्मुद्रित करीत आहे.
पुढच्या लेखात (क्रमांक १२) मध्ये आचार्य विनोबा भावे यांच्या महानिर्वाणाचे कव्हरेज स्वतंत्रपणे लिहिण्याचा मानस आहे.
बातमी हुकते तेव्हा
मी तेव्हा १९८२ मध्ये ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा मुख्य वार्ताहर होतो आणि नागपुरात येऊन जेमतेम दीड वर्ष तर पत्रकारितेत चार-साडेचार वर्षे झालेली होती. तेव्हा विनोबा भावे यांचा पवनार आश्रम हे एक स्वतंत्र बीटच झालेले होते, कारण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीपासून वसंत साठे, एन.के.पी. साळवे असे अनेक केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते महिना-दोन महिन्यांतून पवनार आश्रमाला भेट देऊन विनोबांशी चर्चा करीत असत. मुख्यमंत्री आणि विदर्भातल्या काँग्रेस मंत्र्यांना तर महिना-पंधरा दिवसांतून सलाम दुवा करण्यासाठी एकदा तरी पवनारला भेट द्यावीच लागे. त्या काळात काँग्रेससाठी पवनार हे जणू मारुतीचे देऊळच झालेले होते. ही इव्हेंट, वार्ताहर म्हणून कव्हर करण्यासाठी आम्हाला पवनारला नियमित जावे लागायचे.

विनोबा भावेंविषयीच्या माझ्या भावना संमिश्र होत्या, आणीबाणी जाहीर होण्यापूर्वी भूदान चळवळीचे प्रणेते, सच्चे गांधीवादी वगैरे असा आदर विनोबांविषयी होता. त्यांनी आणीबाणीचे ‘अनुशासन पर्व’ असे समर्थन केल्यावर आमच्यासारख्या तेव्हाच्या अनेक समाजवादी बालमनातली त्यांची प्रतिमा मलिन झालेली होती तरीही नागपूरला आल्यावर बहुसंख्य वेळा विनोबांचा पवनार आश्रम हे बीट माझ्याकडेच आले.
त्याच काळात एकदा पवनार आश्रमामागेच हातभट्टीची दारु कशी खुलेआम विकली जाते, ही बातमी उत्पादन खात्याचे तत्कालीन अधीक्षक अनिल पोहेकर या मित्राने तेथे धाड मारल्यावर मला एकट्यालाच दिलेली होती. दारुबंदीचे टोकाचे समर्थन करणाऱ्या विनोबांच्या आश्रमामागेच दारु मिळते ही बातमी प्रकाशित झाल्यावर साहजिकच खळबळ माजली. ज्येष्ठ संपादक गोविंद तळवलकर यांनी तर संपादकीयातून या बातमीची नावानिशीवार दखल घेतल्याने जसा अतिशय आनंद झाला तसा विनोबांबर आणीबाणीचं समर्थन केल्याबद्दल सूड उगवल्याचेही समाधान मिळालेले होते. ज्येष्ठ गांधीवादी नेते आणि संपादक दिवंगत अनंतराव शेवडे यांच्या पत्नी यमुनाताई शेवडे ‘नागपूर पत्रिका’ च्या तत्कालीन मुख्य संपादक होत्या . तसेच कार्यकारी संचालक नरेश गद्रे, संपादक शं. बा. बेदरकर ही सर्व मंडळी विनोबांची भक्त होती.
१९८२ च्या नागपूरच्या प्रसिद्ध थंडीत नोव्हेंबरच्या त्या ५-६ तारखेला विनोबा भावेंनी प्रायोपवेशन सुरु केल्याची बातमी आली. प्रायोपवेशन म्हणजे स्वेच्छा मरण. स्वेच्छा मरणाला आपल्या देशात तेव्हाही कायदेशीर मान्यता नव्हती. त्यामुळे विनोबांनी अन्नपाण्याचा त्याग करुन म्हणजेच प्रायोपवेशन सुरू करताना स्वत:चे जीवन संपविण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यांच्या प्रायोपवेशनाला कुणीही हरकत घेतली नाही, इतके त्यांचे राजकीय वर्तुळातले स्थान मोठे होते.
प्रायोपवेशनाची बातमी जाहीर झाली आणि राष्ट्रीय पातळीवर अक्षरश: खळबळ माजली. २४ तास पवनार आश्रमात एक वार्ताहर दोन पाळ्यांत नागपूरच्या जवळजवळ सर्वच दैनिकांनी तैनात केला. सडाफटिंग असल्याने अर्थातच रात्रपाळी माझ्या वाट्याला आली. दिवसभर नागपुरात रिपोर्टिंगचं काम करून संध्याकाळी पाच-साडेपाच वाजता वर्धेकडे कुणाच्या तरी स्कूटरवरुन जायचे आणि सकाळी सात-साडेसात वाजता परतीचा प्रवास सुरु करायचा, असा क्रम पहिले दोन-तीन दिवस सुरू होता.
‘यूएनआय’चे तु.भ. गोल्हर, ‘पीटीआय’चे एस.एन. दत्ता तसेच ‘तरुण भारत’चे सुधीर पाठक, ‘लोकमत’चे दत्ता कवीश्वर, युधिष्ठिर जोशी अशी ज्येष्ठ मंडळी रात्री तेथे असायची.
पवनार आश्रमाचे नियम मोठे कडक होते. आम्हा पत्रकारांना आतमध्ये प्रवेश नव्हता आणि अगदी आश्रमाबाहेरच्या अर्धा-पाऊण किलोमीटर परिसरात धूम्रपान वगैरे तर सोडाच, पण साधा चहाही प्यायला बंदी होती. आश्रमाच्या गेटवर आम्हा पत्रकारांचा घोळका बसलेला असे आणि आळीपाळीने दोघे-तिघे जाऊन पवनार गावच्या एका टपरीवर चहा वगैरे पिऊन येत असत. दर तासाने एकदा पत्रकारांना आश्रमात जाऊन येण्याची परवानगी काँग्रेसचे तत्कालीन खजीनदार सीताराम केसरी यांनी मिळवून दिलेली होती.

विनोबांनी प्रायोपवेशन सुरू केल्यापासून इंदिरा गांधी यांनी केसरींची तेथे नियुक्ती करुन टाकलेली होती आणि दर तासा-दीड तासांने केसरी लाईटनिंग कॉल करुन फोनवरुन श्रीमती गांधीना विनोबांच्या प्रकृतीविषयी माहिती देत असत. दिवसभर आश्रमात एकूणच सन्नाटा असे आणि रात्री तर एकदा प्रार्थना झाली की, हा सन्नाटा आणखीनच गडद होत जात असे. आश्रमातले दिवे अतिशय मंदपणे तेवत या वातावरणाचं गांभीर्य आणखी वाढवत असे. एका कुटीत आणखी मंद दिव्याच्या प्रकाशात विनोबा झोपलेले दिसत. अधूनमधून सीताराम केसरींचा मोठमोठ्याने फोनवरून बोलण्याचा आवाज ही शांतता भंग करीत असे.
पहिल्या दोन-तीन दिवसांतच एस. एन. दत्तांना आम्हाकडून वार्ताहरांची प्रवास आणि खाण्यापिण्याची आबाळ लक्षात आल्यावर, त्यांनी माहिती आणि जनसंपर्क खात्याची एक गाडी उपलब्ध करवून घेण्यात यश मिळवले. आश्रमातल्या लोकांशी भांडून आश्रमापासून थोडया दूर अंतरावर चहा आणि पान-बिडीची एक टपरीही सुरू करवून घेतली. पहिल्या दोन-तीन दिवसानंतर पवनारचा आश्रम एक खूप मोठे न्यूज सेंटर बनला. इंदिरा गांधी येऊन विनोबांना भेटून गेल्या. प्रायोपवेशन सोडावं, अशी विनंती श्रीमती गांधींनी केली. ती अर्थातच विनोबांनी अमान्य केली.
महाराष्ट्राचेच नाही तर अन्य राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्र आणि राज्य सरकारचे डझनावारी मंत्री, वरिष्ठ अधिकारी, जुन्या पिढीतले गांधीवादी, अशा अनेकांचा राबता पवनार आश्रमात सुरु झाला. हळूहळू विनोबांच्या प्रायोपवेशनाच्या बातमीसोबतच त्यांची दररोजची प्रकृती कशी आहे, महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या लोकांच्या भेटी, त्यांनी विनोबांविषयी व्यक्त केलेल्या भावना, अशा अनेक बातम्यांची जोड मिळाली. प्रत्येक वृत्तपत्राने एका पाळीत दोन-तीन वार्ताहर नेमले. प्रशासनानेही आश्रमाच्या बाहेरच्या मोकळ्या मैदानात एक मोठा तंबू टाकून पत्रकारांना बसण्याची तसेच दोन-तीन दूरध्वनी संचही उपलब्ध करून दिले. आश्रमाच्याकडे वळणाऱ्या मुख्य रस्त्यावरच एक पोलीस चौकीही उभारली गेली.
पाच दिवसांनंतर तर हे चित्र आणखी बदलले. आश्रमाचा परिसर गर्दीने अक्षरश: फुलून गेला. नवे-जुने गांधीवादी, आमदार-खासदार, वर्धा जिल्ह्यातले लोक तसेच राज्याच्या आणि देशाच्याही अन्य भागातून येणाऱ्यांची गर्दी वाढू लागली. यात विनोबांचे भक्त जसे होते तसेच हौसे-नवसे-गवसेही होते. या सर्वांच्या खाण्यापिण्याची सोय रस्त्यालगत तात्पुरती हॉटेल उभारुन व्यावसायिकांनी केली. दिवसा तर तेथे पानविडीची दुकाने, फुगे-कंगवे, बिस्किटे वगैरे विकणारे स्टॉलही सुरू झाले. नंतर एक-दोन किरकोळ विक्रेत्यांनी सटरफटर वस्तू विकण्याचे स्टॉल सुरु केले.
आश्रमात कुटीच्या बाहेरुन विनोबांचे दर्शन घेऊन बाहेर पडले की, अशा दुकानांवर खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढू लागली. त्यासोबत अशा दुकानांचीही संख्या पुढच्या एक-दोन दिवसांत ५०-६० वर पोहोचली .
आश्रमाबाहेरच्या या जागत्या वातावरणामुळे रात्र रटाळ होण्याचे पत्रकारांसाठी टळले. कंटाळा आला की यापैकी एखाद्या स्टाँलवाल्याला उठवून खाण्या-पिण्याची सोय होऊ लागली. एव्हाना एका वेळी तेथे असणाऱ्या पत्रकारांची संख्याही ५०-६० पेक्षा जास्त झाली. मुंबई-पुणे, दिल्ली, अशा अनेक ठिकाणांहून पत्रकार मोठ्या संख्येने पवनार आश्रमात डेरेदाखल झाले.
एक आठवडा उलटला आणि पवनार आश्रम दिवसा एखाद्या जत्रेपेक्षाही जास्त फुलू लागला, तर रात्री लांबपर्यंत मिणमिणणारे वेगवेगळे तंबू आणि स्टॉलचे दिवे, हा परिसर जागा असल्याचे दर्शवत असत. एव्हाना विनोबा भावे यांच्या प्रायोपवेशनाचा शेवट काय होणार हे प्रशासनाच्या लक्षात आले होते आणि या परिसरात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊ बॅरिकेड्स उभारणे, रांग नीट राहावी यासाठी लाकडाच्या बल्ल्या रोवून नियोजन करणे, येणाऱ्या गर्दीतील व्यक्तींच्या दर्जानुसार त्याच्या वाहनाच्या पार्किंगची सोय करणे, अशा अनेक सोयी करण्यात आल्या. या सर्व सोयी उपलब्ध करताना या परिसरातील हे स्टॉल्स आणखी लांब गेले आणि याच काळात आश्रमातले वातावरणही अधिकाधिक गंभीर होत गेले. तत्कालीन केंद्रीय मंत्री वसंत साठेही मग आश्रमातच मुक्कामाला आले. वसंत साठे आल्यावर मात्र पत्रकारांच्या खाण्यापिण्याच्या, बातम्या पाठवण्याच्या, विश्रांतीच्या, अशा अनेक गैरसोयी दूर झाल्या. कारण वसंत साठेंनी त्यात जातीने लक्ष घातले होते.
असेच दिवस घाईगर्दीने उलटत होते. पत्रकारांना श्वास घ्यायलाही फुरसत मिळू नये, इतका प्रायोपवेशन आणि प्रायोपवेशननाशी संबंधित बातम्यांचा मोठा ओघ सुरु झालेला होता. त्यातच दिवाळी आली. नरकचतुर्थीच्या दिवशी सकाळी सात-साडेसात वाजता विनोबा भावेंच्या प्रकृतीची माहिती आपापल्या वरिष्ठांना देऊन रात्रपाळीचे पत्रकार नागपूरकडे परतले. आम्ही परतीच्या प्रवासासाठी गाडीत बसणार नेमक्या त्याच वेळी युएनआय या वृत्तसंस्थेचे किरण ठाकूर तेथे आले. प्रायोपवेशनाच्या काळात पहिल्यांदाच ते वर्धेला आलेले होते. आमची ओळख झाली. जुजबी बोलणे झाले आणि आम्ही परतीचा प्रवास सुरु केला.
नागपूरला घरी पोहोचलो तर दूरध्वनी नुसता ठणठणत होता. तो घेतला तेव्हा नरेश गद्रे बोलत होते आणि त्यांनी सांगितले, विनोबा भावे गेले. आम्ही सर्व पत्रकारांच्या ९-१० दिवसांच्या अविश्रांत श्रमावर अक्षरश: पाणी फेरले गेले. कारण ती बातमी देणारा एकमेव पत्रकार युनएनआयचे किरण ठाकूर होते . विनोबा भावेंनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा तेथे किरणशिवाय अन्य कुणीही पत्रकार उपस्थितच नव्हता. एका अर्थाने ही इव्हेंट कव्हर करणाऱ्या पत्रकारांना अपयशच आलेले होते आणि किरण ठाकूर बाजी मारुन गेलेले होते . विनोबा गेल्याची बातमी ऐकल्यावर काही काळ सुन्नपणे बसून राहिलो आणि नंतर त्यांच्या अंत्यक्रियेची बातमी रवाना करण्यासाठी जसा आलो तसा लगेच वर्धेला रवानाही झालो….

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकुर
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
किरण एका जागतिक महत्त्वाच्या विनोबा भावे यांच्या मायघरी जाण्याची तुमची बातमी अनेक पत्रकारांची त्यावेळी जवळपास उपस्थिती असतानाही एक्स्लूझिव्ह ठरली ही बाब आपल्या पत्रकारितेतील भूषण आहेच;पण त्यापेक्षाही आताच्या पत्रकारांच्या पिढीला मार्गदर्शकही आहे.या संदर्भातले आपले लेखन वाचण्याची उत्कंठा वाढली आहे.बर्दापूरकरांचेही योग्यते श्रेय देण्याचेभानही कौतुकास्पदच म्हणावे लागेल.हे कौतुक आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवावे अशी विनंती करून थांबतो.