कामिल पारखे
राजीव गांधी पंतप्रधान असताना आपल्या शेवटच्या टप्प्यात पुण्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळचा अनुभव ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे यांनी आपल्या “गोवा आणि महाराष्ट्रातील पत्रकारितेतल्या कथा” या नव्या पुस्तकात दिले आहेत. (चेतक बुक्स, ISBN ९७८-९३-९०४६९-४०-६, प्रथम प्रकाशन १० सप्टेबर २०२१)
पणजी आणि पुणे येथे नवभारत टाइम्स, सकाळ टाइम्स, महाराष्ट्र हेराल्ड इंडियन एक्सप्रेस आणि टाइम्स ऑफ इंडिया अशा वर्तमानपत्रातून कामिल पारखे यांनी बातमीदारी केली. मराठी आणि इंग्रजीतून उदंड लेखन केले. त्यांची अर्धा एक डझन पुस्तके प्रसिद्ध झाली. ते माझे देखील पुण्यात सहकारी होते. पण आमची कार्यक्षेत्रे आणि कामाचे स्वरूप भिन्न असल्यामुळे रोजच्या भेटीगाठी होत नसत.
अलीकडेच प्रकाशित झालेल्या या १८३ पानी पुस्तकात पान क्र ३५ वर एक अनुभव माझ्याशी संबंधित आहे. घटना सुमारे ३१ वर्षानी त्यांनी लिहिली आहे. माझ्याशी या प्रसंगात आलेला संबंध मी पूर्णपणे विसरून गेलो होतो. या पुस्तकात उल्लेख केल्यामुळे त्याची आठवण झाली. त्यांच्याच शब्दात तो पुण्यात घडलेला प्रसंग पुढे देत आहे :-
रात्री साडेसात- आठ च्या दरम्यान राजीव गांधींचे भाषण सुरू झाले होते. त्यांच्या भाषणाची मुख्य बातमी इंडियन एक्सप्रेस मधील माझा सहकारी नरेन करुणाकरण देणार होता. सभेचे साईडलाइट्स मी देणार होतो. राजीव गांधी बोलताना अधून मधून आपल्या गळ्या भोवतीच्या उपरण्याने चेहऱ्यावरचा घाम पुसत होते. समोर ठेवलेल्या पाण्याच्या भांडया मधून अधून-मधून घुटके घेत होते.
दुसऱ्या दिवशी इंडियन एक्सप्रेस मध्ये राजीव गांधी चे भाषण पान एक वर प्रसिद्ध झाले. क्षणचित्रे मध्ये मी पंतप्रधानाचे चिरंजीव राहुल गांधीं यांच्या उपस्थितीचा उल्लेख केला होता. देशातील तापलेल्या राजकीय वातावरणाचा संदर्भ देत पंतप्रधान गांधी यांना घाम फुटला होता आणि ते सारखे घाम पुसत होते. पाणी पीत होते असे मी बातमी त लिहिले होते. तो एक परिच्छेद इंडियन एक्सप्रेसने आतील पानावर पण चौकटीत ठळकपणे छापला होता.
या नंतर दोन तीन दिवसांनी आम्ही काही पत्रकार कुठल्याशा कार्यक्रमासाठी कारने निघालो होतो. गाडीत बसल्यावर काही क्षणातच (आता बंद पडलेल्या) इंडियन पोस्ट चे वार्ताहर किरण ठाकूर यांनी “इंडियन एक्सप्रेस मधील चौकटीतील ती बातमी कोणी लिहिली” असे विचारले. ती मीच लिहिली होती असे मी सांगताच ते म्हणाले, “कुठलाही वक्ता अर्धा-पाऊण तास बोलत असताना चेहऱ्यावर रुमाल फिरवणार, समोरच्या फुलपात्रातील पाणी पिणार, हे नैसर्गिकच आहे. त्यांना राजकीय कारणांमुळे घाम फुटला असे म्हणणे ठीक नाही ..कामिल, लेट मी टेल यु. That was not right. It is not journalism.
पुढच्या काळात विद्यापीठात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचे प्रमुख झालेल्या किरण ठाकूर यांचे हे म्हणणे मान्य करण्या खेरीज मला पर्यायच नव्हता. त्या बातमी बद्दल त्यावेळी मला वाटलेली शरम अजूनही गेलेली नाही.”
या छोट्या प्रसंगाचे महत्त्व असे की इतक्या वर्षानंतर कामिल ला हा तपशील इतक्या बारकाईने आठवला. आणि त्याला तो पुस्तकात लिहावासा वाटला. त्याने हे लिहिले नसते तर त्याला कोणी जाब विचारणार नव्हते. आपल्याला थोडा कमीपणा येणारा प्रसंग सुद्धा त्याने प्रांजळपणे लिहिणे यात कामिल चे मोठेपणच अधोरेखित होते.
“वास्तविक, तुम्ही कोण मला हे शिकवणारे” असे म्हणत त्यावेळी त्याने मला उडवून लावले असते तर मी काय केले असते ? त्यावेळच्या आणि आत्ता देखील वर्तमानपत्रात अशा प्रकारच्या चटपटीत मजकूर लिहिण्याचा मोह अनेक पत्रकारांना होतो ही वस्तुस्थिती आहे. असा मजकूर ठळकपणे चौकटीत आकर्षक पद्धतीने प्रकाशित करणे असा मोह उपसंपादकाला होणे यातही नवीन काही नाही.
कदाचित माझं म्हणणं पटल्यामुळे त्याने मला उडवून लावले नसावे. किंवा, माझ्या वयाच्या मोठेपणाला मान देणे, उलट उत्तर न देणे त्याच्या सौजन्याचा आणि कुटुंबातील संस्काराचा भाग असेल! काहीही असले तरी त्याच्या या मोठेपणाचा उल्लेख करणे हे मला आवश्यक वाटते.
माझ्या वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी अशी आठवण हीच तर आता माझी पुंजी आहे !

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
-संपादन : देवेंद्र भुजबळ. -☎️ 9869484800
वाह किरण साहेब..! एवढं सडेतोड उत्तर तुम्ही दिलंत, हे वाचून बरं वाटलं…
… प्रशांत थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
9921447007
9850573747