संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द या शिर्डी विमानतळापासून अवघ्या 16 किलोमीटरवर असलेल्या ओसाड माळरानाच्या गावात बिजनेस ॲप्लीकेशन अँड प्लॅटफॉर्म अर्थात “बाप” या माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणाऱ्या आणि विविध सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.
केवळ आठ महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या “बाप” मध्ये आज अडीचशे विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. त्यातील शंभर मुले मुली इथेच होस्टेलमध्ये राहतात.
इथे प्रशिक्षण घेत असलेल्या ग्रामीण भागातील बारावी झालेल्या मुलांना कला, साहित्य, समाजसेवा, आरोग्यसेवा, नगर नियोजन, ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचे विचार ऐकावयास मिळावेत आणि तंत्रज्ञाना खेरीज जग काय असतं हे कळावे, समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींची ओळख व्हावी आणि त्यांच्या कार्याचा प्रत्यय परिचय व्हावा यासाठी “आजचा बाप माणूस” हा उपक्रम आयोजित करण्यात येतो.
या उपक्रमात सिद्धहस्त साहित्यिक आणि माहिती तंत्रज्ञानातील “सुवर्णस्पर्श लाभलेला माणूस” डॉक्टर अच्युत गोडबोले यांनी नुकतेच मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना डॉ गोडबोले म्हणाले, आजच्या काळात जी माणसं स्वतःला बदलत्या तंत्रज्ञानाशी
जोडून घेणार नाहीत त्या माणसांचे अस्तित्व निरर्थक होईल. किंबहुना ती माणसं जगत असून देखील त्यांचे आयुष्य संपलेले असेल.
डॉ गोडबोले पुढे म्हणाले की, गेल्या दहा वर्षात तंत्रज्ञान खूप झपाट्याने पुढे गेले आहे. गेल्या शंभर वर्षांत झाली नाही एवढी प्रगती एका दशकात झाली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रारंभामुळे तर अनेकांना धडकी भरली आहे. लोक संभ्रमात पडले आहेत की आपलं पुढे काय होणार ? अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. रोजीरोटीचा मोठा सवाल लोकांपुढे उभा राहिला आहे. म्हणूनच मागच्या आणि आजच्या पिढीने हे तंत्रज्ञान समजून घेण्याची आणि यातील संधी जाणून घेण्याची गरज आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा माणसाच्या इंटेलिजन्सचा शोध आहे. तंत्रज्ञान कुठल्याही प्रकारे माणसाला दूर करू शकत नाही. माणसाच्या बुद्धिमत्तेची जागा घेऊ शकत नाही. मात्र सामान्य माणसालाही या बदलत्या काळाबरोबर त्या वेगाने जाणे गरजेचे आहे. माणसाची कामे तंत्रज्ञानाच्या आधारे संगणकीय यंत्र करू लागली म्हणजे माणसाचे अस्तित्व संपुष्टात आले असे होत नाही, माणसाला आता अधिक सजग होण्याची गरज आहे. संगणकीय तंत्रज्ञान माणसासाठी धोकादायक की लाभदायक अशा प्रकारच्या विषयांवर चर्चा अनेक होऊ शकतात. विचार मंथन तर गरजेचे आहेच परंतु काळाच्या या बदलाला विरोध करून आपण मागे राहणे आता कोणालाही परवडणारे नाही असे परखड विचार अच्युत गोडबोले यांनी यावेळी व्यक्त केले.
संगमनेर, राहता, राहुरी, अकोले या तालुक्यातील दहा-बारा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाकरिता आमंत्रित करण्यात आले होते.
नुकत्याच झालेल्या बारावी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना आपण पुढे काय करावे याचे मार्गदर्शन या कार्यक्रमातून मिळाले.
उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना गोडबोले यांनी सविस्तर उत्तरे दिली. गोडबोले यांच्या 50 पुस्तकातील पुस्तकांपैकी बहुसंख्य पुस्तके या ठिकाणी विक्रीला होती. ही पुस्तके विकत घेऊन गोडबोले यांची स्वाक्षरी घेण्याकरता विद्यार्थ्यांची अक्षरशः झुंबड उडाली होती. मुसाफिर हे गोडबोलेंचे आत्मचरित्र ही अनेक विद्यार्थ्यांची पहिली पसंती होती. या पुस्तकाच्या उपलब्ध प्रति संपल्याने काही मुलांना निराश व्हावे लागले.

– लेखन : सुधीर ब्रह्मे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800