अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश अंतर्गत विक्रोळी शहर विभागातर्फे तीन दिवसाचा बाल मेळावा, स्पर्धा उपक्रम फेसबुक वरून नुकताच राबवण्यात आला.
या स्पर्धा उपक्रमाला फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून व परदेशातून सुद्धा जवळपास साडेचारशे मुलांनी सहभाग नोंदवला.
आरती गायन, संवादातून शिकवण आणि आपले मदतनीस यांची वेशभूषा अशा विविध गुणदर्शन व बालमनावर उत्तम संस्कार करणाऱ्या विविध विषय स्पर्धा यांचा अंतर्भाव होता.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे या संस्थेद्वारे विविध सामाजिक व साहित्यिक उपक्रम दर्जेदाररित्या योग्य नियोजनाने घेण्यात येतात. त्यामुळेच संपूर्ण मराठी समाज माणसात ही संस्था लोकप्रिय ठरली आहे. समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून समाजमनाची अष्टपैलू उकल करण्याचा प्रयत्न साहित्य परिषदेतर्फे नेहमीच करण्यात येतो. त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे नुकतीच संपन्न झालेली अतिशय लोकप्रिय ठरलेली अशी ही बालमेळा स्पर्धा.
विक्रोळी विभागातर्फे येणाऱ्या काळामध्ये अनेक विषयांवरील साहित्यिक उपक्रम व स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे विक्रोळी अध्यक्षा सौ. प्रणाली म्हात्रे यांनी सांगितले .
अशाच प्रचंड उत्साहाने साहित्यिकांनी या उपक्रमांना सुद्धा प्रतिसाद द्यावा असे आवाहन मुंबई प्रदेशाध्यक्षा हिरकणी राजश्री बोहरा यांनी केले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरद गोरे, मुंबई प्रदेशाध्यक्षा हिरकणी राजश्री बोहरा यांच्या मार्गदर्शनातून विक्रोळी विभाग अध्यक्षा सौ. प्रणाली म्हात्रे, उपाध्यक्षा सौ. सविता काळे, सभासद हिरामण सोनवणे, व ठाणे जिल्हा अध्यक्षा सौ अनिता गुजर, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश ठाकूर, तसेच सर्व कार्यकारणीनी या स्पर्धेला मोलाचे योगदान दिले आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला व नीती मूल्यांची रुजवण करण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला. त्यामुळे भारतभरातून व परदेशातूनही पालक वर्गाच्या अतिशय सुंदर प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.
– देवेंद्र भुजबळ, 9869484800
👍👌सुंदर उपक्रम 🙏