ज़िन्दगी का साथ ……
“मैं ज़िन्दगी का साथ निभाता चला गया
हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया
हर फ़िक्र को धुएँ में उड़ा”
काय आला ना समोर आपला चॉकलेट हिरो, देव आनंद? त्या जमान्यातला बहुसंख्य स्त्रीवर्ग देव आनंदच्या प्रेमात आकंठ बुडाला होता, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्या जमान्यातल्याच कशाला, मलाही तरुणपणीचा देव आनंद “प्रs चंs डs” आवडतो ! देव आनंद, त्याचे चालणे, त्याची हातांची व मानेची लकब, त्याचे ते गोड रुसणे, तितकेच गोड हसणे, गालावर पडणारी किंचितशी खळी, आणि सगळ्यात माझा आवडता, तो केसांचा कोंबडा! (त्याला दुसरे काही म्हणत असतील तर सांगा बरं का. मला लहानपणी जे आई, आजी म्हणायच्या तेच माहीत! मी बापडी अजून कोणाला विचारणार?!) तर मुद्दा हा होता की मी ना त्याच्या सगळ्या सगळ्या गोष्टींवर एकदम फिदा होते.
या गाण्याचे तर सुरवातीचे संगीत अतिशय मंजुळ आणि मोहक, पण तितकेच गुणगुणायला सोपे, ठेका धरायला सोपे असे आहे. जयदेवजींनी या चित्रपटात अगदी कमाल केली आहे. सगळी गाणी एकसे बढ़कर एक! या गाण्याचे बोल साहिर लुधियानवी यांचे आहेत आणि गायक आपले लाडके, मोहम्मद रफी.
१९६१चा हम दोनो हा चित्रपट नवकेतनच्या गाजलेल्या सिनेमांपैकी एक होता. नवकेतन फिल्म्स हे चित्रपट निर्मिती गृह देव आनंद आणि त्यांचे बंधू, चेतन आनंद यांनी सुरू केले होते. हम दोनो या चित्रपटात डबल रोल केला होता देव आनंदने आणि त्याला साधना आणि नंदा यांनी उत्तम साथ दिली होती. लष्करातला कॅप्टन आनंद आणि मेजर वर्मा अशी दुहेरी भूमिका देव आनंदने साकारली. त्या मिशांमध्ये काय रुबाबदार दिसायचा मेजर वर्मा! साधनाने मीताची तर नंदाने रुमा, म्हणजे मेजर वर्माच्या बायकोची भूमिका साकारली आहे.
या गाण्याच्या सुरवातीला आपल्याला दिसतो तो कॅप्टन आनंद. सिगरेट शिलगावतना, गाणे वाजवणारा लायटर पेटवल्यावर त्याला त्याच्या प्रिय मीताची आठवण येते आणि समोर पाण्याच्या प्रतिबिंबात तिच्यासोबत आहोत असा भास होऊन जातो. पण तिच्या वडिलांना आपण काहीतरी करून दाखवू हे दिलेले वाचन आठवते आणि तो आहे ती परिस्थिती स्वीकारून, मी आता सगळ्या चिंता या सिगरेटच्या धुरासारख्या हवेत विरून जाऊ देणार आहे, असे तारुण्याच्या धुंदीत गायला लागतो …
मैं ज़िन्दगी का साथ निभाता चला गया
हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया
हर फ़िक्र को धुएँ में उड़ा
जीवनात सगळ्यांनाच खूप त्रास सहन करावे लागतात. तरीही जमिनीवर पडलेल्या त्या असंख्य सुकलेल्या पानांमध्ये पडलेले एक ताजेतवाने फूल जसे आपल्याला आनंद देऊन जाते, तसेच आपला आनंदी चेहरा पाहून इतरांना त्यांचे दुःख विसरायला मदत होत असते. आणि समोरचा माणूस हसला की आपोआप आपल्याही मनात आनंद पसरतो. देव आनंदचे हे पात्र त्या फुलासारखे भासले मला.
अशी आनंदी माणसे आजकाल खूप कमी बघायला मिळतात. जो तो पैसा, परिवार, इत्यादी विवंचनांमध्ये इतका त्रासून गेलेला असतो की आपण नकळत सारखे त्याच त्या समस्यांबद्दल बोलत राहतो. त्रास झाला तरी तसे न दाखवता चेहऱ्यावर खोटे हसू आणणारे खूप असतात. पण त्रास झालेला मागे टाकून आत्ताचा क्षण आनंदात घालवणारे खूप थोडे असतात. निर्लज्ज, असंवेदनशील, बेफिकीर लोकांबद्दल बोलत नाहीये मी. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांबद्दल बोलतेय. बाकीच्यांच्या बोलण्या वागण्याने त्रास होणाऱ्या, परिस्थितीपुढे हतबल होणाऱ्या, समस्यांमधून मार्ग कसा काढावा याबाबत न कळणाऱ्या, थोडक्यात काय तर आयुष्याच्या थपडांचा पुरेपूर मार सहन करणाऱ्या सामान्य माणसाबद्दल बोलतेय.
विशीमध्ये माणूस अगदी बिनधास्त असतो. तारुण्याचे सळसळते रक्त, पुढच्या आयुष्याची रंगीत स्वप्ने उरात बाळगून ती पूर्ण करण्यासाठी धडपड करण्याची हिम्मत असते तेव्हा माणसात. पण चाळिशी ओलांडल्यावर निम्मे आयुष्य सरलेले असते आणि मग या गाण्याचा एक वेगळाच अर्थ उमजायला लागतो. माझेही तसेच झाले.
बरबादियों का सोग मनाना फ़जूल था
बरबादियों का सोग मनाना फ़जूल था
मनाना फ़जूल था मनाना फ़जूल था
बरबादियों का जश्न मनाता चला गया
बरबादियों का जश्न मनाता चला गया
हर फ़िक्र को धुएँ में उड़ा
एक क्षण असा आला आयुष्यात जेव्हा कळले की काळजी घेणे आणि काळजी करणे यात काय फरक आहे. इतकी वर्षे आपण करत होतो, ती निव्वळ काळजी करणे होते. या व्यापात जगण्यातला आनंद कुठेतरी हरवत होता, हे तेव्हा लक्षात आले. जे झाले त्यावर शोक करत बसणे हे निष्फळ आहे ही उपरती झाली. यातला तरुण देव आनंद मात्र हे समजून चुकला आहे. म्हणूनच तो या सगळ्या आयुष्याच्या विखुरलेल्या तुकड्यांना घेऊनसुद्धा त्याचा सोहळा साजरा करू शकतोय.
जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया
जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया
मुकद्दर समझ लिया मुकद्दर समझ लिया
जो खो गया मैं उसको भुलाता चला गया
जो खो गया मैं उसको भुलाता चला गया
हर फ़िक्र को धुएँ में उड़ा
जे काही समोर आले, ते आपले प्राक्तन होते हे स्वीकारणे ही फार मोठी अवघड गोष्ट आहे बरं का. आपण नेहमी दुसऱ्यांना दोष देत राहतो, पण आपण सगळेच कर्माच्या बंधनात अडकलो आहोत, हे विसरून जातो. तिथूनच जे काही होतंय त्याचा दोष दुसऱ्यांवर देता देता, आपण देखील त्या परिस्थितीला काही अंशी तरी कारणीभूत आहोत, त्याची जबाबदारी सोडून देतो आणि यथावकाश आपल्या आनंदाची दोर इतरांच्या हातात सोपवून देतो. म्हणूनच जे झाले ते आपले प्राक्तन होते हे स्वीकारून, जे हातातून निसटले ते मनातून सोडवून पुढे जाता आले पाहिजे. अन्यथा आठवणींचा आणि भावनांचा गुंता कधी आनंदाने जगूच देणार नाही आपल्याला.
ग़म और ख़ुशी में फ़र्क़ न महसूस हो जहाँ
ग़म और ख़ुशी में फ़र्क़ न महसूस हो जहाँ
न महसूस हो जहाँ न महसूस हो जहाँ
मैं दिल को उस मुक़ाम पे लाता चला गया
मैं दिल को उस मुक़ाम पे लाता चला गया
मैं ज़िन्दगी का साथ निभाता चला गया
हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया
या गाण्यातून जयदेव चित्रपटाची कथा केवळ पुढे नेत नसून ते सामान्यांच्या मनावर आयुष्याच्या तत्त्वज्ञानाचे मोठे धडे गिरवत आहेत. या कडव्यात जे त्यांनी वर्णन केले आहे ना, तेच तत्त्वज्ञान आपल्याला गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे. आनंद आणि दुःख या दोन्ही अवस्था ज्याला शांतपणे तटस्थपणे अनुभवता येतील तो खरा योगी. आपल्या संपूर्ण वैदिक तत्त्वज्ञानाचा मोठा भाग आहे. भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, योग मार्ग, ध्यान मार्ग कोणत्याही मार्गाने परमेश्वराची आराधना करताना शेवटी जेव्हा आत्म्याला या पायरीवर असल्याची जाणीव होते, तेव्हा जिवंतपणी त्याला मोक्षत्व प्राप्त होते. हीच ती झेन अवस्था जी बौद्ध संस्कृतीत सांगितली आहे. त्या अवस्थेला इतक्या तरुणपणी तो कॅप्टन आनंद जाऊ इच्छितो ही त्या पात्राची उंची आणि सखोलता, स्पष्टपणे दर्शवते. याच अवस्थेला त्या हृदयाला नेऊन पोचवायचे आहे, जिथे आनंद, दुःख यांच्या हिंदोळ्यात न अडकता तो फक्त स्थायी भावाने जीवनाकडे बघत असतो.
तुकोबा म्हणतात तसे,
याजसाठी केला होता अट्टहास ।
शेवटचा दिस गोड व्हावा ॥
तो शेवटचा दिवस कधी येईल हे माहीत नाही, पण प्रत्येक दिवस शेवटचा आहे, असे समजून भरभरून जगलो, तर आयुष्य किती आनंदी होईल. या गाण्यातून एक खूप मोठा संदेश आपल्याला मिळतो. वरवर पाहता असे वाटते की हे गाणे आपल्याला जे नशिबात आले त्याचा स्वीकार करून, जे नाही मिळाले त्याला मोकळे करून, आनंद दुःख सगळ्यात निर्विकारपणे जगा, असे सांगत आहे. परंतु तेवढ्यावरच हे गाणे थांबत नाही. त्याच्या पुढे जाऊन ते सांगते की इथे हताशपणा नाही, नमते घेणे नाही, फक्त त्याची जबाबदारी स्वीकारणे आहे. जे हातातून निसटले त्याला मनाच्या जाळ्यात उगाच अडकवण्याचा फोल प्रयत्न नाही, तर ती जाळी जळमटं काढून स्वच्छ पाण्यासारखे पुढे वाहणे आहे. तटस्थपणे बघणे म्हणजे निष्क्रियता नव्हे तर आयुष्यातले सगळे अनुभव भरभरून घेऊनसुद्धा पाय जमिनीवर घट्ट रोवून अविचलित राहणे आहे. याला जीवन ऐसे नाव!

– लेखन : तनुजा प्रधान, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप खूप धन्यवाद!🙏🌷🌿
खूप सुंदर लिखाण…