हम को मन की शक्ति देना मन विजय करे
दूसरों की जय से पहले खुद को जय करे
आपल्यापैकी कित्येक जणांनी शाळेत ही प्रार्थना म्हणली असेल. शिकण्याचे माध्यम कोणतेही असो, ही प्रार्थना शाळेत केव्हा ना केव्हा तरी म्हटली जायचीच. आम्हाला ही प्रार्थना हिंदीच्या तासाला शिकवली गेली होती. बाईंनी त्याचा अर्थ सांगितला असेल तर तो तेव्हा नक्कीच समजला नव्हता. कारण कित्येक वर्षे माझा हा गोड गैरसमज होता की दुसऱ्यांचा विजय होण्याआधी माझा विजय होवो, म्हणजे माझाच पहिला नंबर आला पाहिजे !
आता खूप हसू येते या गोष्टीचे. बालबुद्धीच ती ! स्वतःचे काहीतरी डोके लढवून काहीतरी समज करून घेतला होता. पण यातून एक चांगले झाले होते की पहिला नंबर मिळवण्याच्या नादात भरपूर अभ्यास करून खूप वेळा नंबर पटकावला होता !
खरंच एखाद्या गाण्याचा आपल्यावर किती परिणाम होतो ना ? हे गाणे सुरू होताच आपोआप डोळे मिटून, हात जोडून, मनापासून देवाला प्रार्थना करण्याची इच्छा होते. शाळेतच थोडे मोठे झाल्यावर, साधारण आठवी नंतर या गाण्याचा खरा अर्थ समजायला लागला आणि माझे जगच पालटून गेले. दुसऱ्यांना हरवण्यापेक्षा आपण ठरवलेले ध्येय गाठणे आणि ते पार करणे जास्त महत्त्वाचे असते हे कळले आणि मग माझी स्वतःशीच स्पर्धा सुरू झाली. आता इतक्या वर्षांनी जेव्हा मी पुन्हा स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली तेव्हासुद्धा ती इतर कोणाबरोबरही नव्हती, ती केवळ स्वतःचे सामर्थ्य जाणून घेण्याबद्दल आणि स्वतःला स्वतःच्या नजरेत सिध्द करण्याबद्दल होती. इतकी वर्षे गृहिणी म्हणून घरकाम करताना आपल्या बुद्धीला गंज तर चढला नाही ना, हे जाणण्याची उत्सुकता होती. आपल्यात आजपर्यंत न समजलेली कोणती प्रतिभा आहे का हे पाहण्यासाठी होती. त्यामुळे माझ्यासाठी हे गाणे अत्यंत जवळचे आहे. चुकूनसुद्धा जर कधी कोणाबद्दल इर्षा वाटलीच तर हे गाणे ऐकते. पहिल्या दोन ओळीतच आलीच असली इर्षा तर पळून जाते!
आ आ आ आ आ आ आ
हम को मन की शक्ति देना मन विजय करे
दूसरों की जय से पहले खुद को जय करे
हम को मन की शक्ति देना मन विजय करे
दूसरों की जय से पहले खुद को जय करे
हम को मन की शक्ति देना
या गाण्याचा सुरुवातीचा आकार जेव्हा सुरू होतो तेव्हा शाळेला उशीर झालेली जया बच्चन म्हणजेच कुसुम उर्फ गुड्डी धावतच शाळेत येत असते. शाळेतली अल्लड, अवखळ, स्वप्नाळू मुलगी तेव्हाच्या जया भादुरीने अगदी चपखलपणे साकारली आहे. हृषिकेश मुखर्जी यांच्यासारखा प्रतिभावान दिग्दर्शक आणि गुलजार यांच्यासारखा लेखक लाभलेला हा सिनेमा १९७१ मध्ये प्रदर्शित झाला.
या गाण्याशी संबंधित नसलेली परंतु या चित्रपटाबद्दल थोडी मनोरंजक माहिती तुम्हाला सांगावीशी वाटतेय. गुड्डी मधल्या भूमिकेसाठी जया भादुरीला सर्वोत्तम अभिनेत्रीचे फिल्म फेअर अवॉर्डस् साठी नामांकन मिळाले होते, जे या चित्रपटाचे एकमेव नामांकन होते.
गुड्डी धर्मेंद्रच्याच प्रेमात असते आणि त्याच्याशीच लग्न करायचे ठरवून बसते. जेव्हा तिला तिच्या वहिनी (सुमिता सन्याल) चा भाऊ (समीत भांजा) लग्नासाठी विचारतो तेव्हा ती नकार देते. तिला वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी दस्तुरखुद्द धर्मेंद्रचीच मदत तिचे मामा (उत्पल दत्त) घेतात. त्याचप्रमाणे ए.के. हंगल, केश्तो मुखर्जी, असरानी यांच्याही भूमिका आहेत. या निमित्ताने १९६० ते १९७० च्या दशकातल्या बॉलिवूड सिनेसृष्टीचे पडद्यामागचे दर्शन घडते. त्याचप्रमाणे पाहुणे कलाकार म्हणून अशोक कुमार, दिलीप कुमार, अमिताभ, प्राण, राजेश खन्ना, विम्मी, शशिकला, विनोद खन्ना, नवीन निश्चल, नंदा, अशा अनेक तारांकित अभिनेते आणि अभिनेत्रींनीही या चित्रपटात हजेरी लावली आहे.
या चित्रपटात आधी अमिताभ बच्चनचीही भूमिका होती. मात्र त्याच वेळेला आनंद चित्रपटाचे देखील चित्रीकरण सुरू होते. त्या दरम्यान अमिताभ आणि जया यांचे वास्तव जीवनात सूर जुळले. मात्र अमिताभची प्रतिभा बघून हृषिकेश मुखर्जी यांनी त्याला या चित्रपटातल्या दुय्यम भूमिकेतून काढले. या चित्रपटाने भाषेचाही अडथळा पार केला आणि त्याचा तमिळमध्ये “सिनेमा पैथियम” या नावाने रिमेक झाला.
या चित्रपटाचे गीतकार गुलजार होते आणि संगीतकार वसंत देसाई हे होते. वाणी जयराम यांनी हे गाणे इतक्या तन्मयतेने गायले आहे की नक्कीच ही प्रार्थना त्या देवापर्यंत पोचत असावी असे वाटते.

वाणी जयराम यांनी पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत सुमारे वीस हजारांहून अधिक गाण्यांमध्ये पार्श्वगायन केले आहे. प्रामुख्याने दक्षिण भारतीय चित्रपटात तेलुगू, तमिळ, मलयाळम, कन्नड, त्याचप्रमाणे हिंदी, मराठी, ओडिया, गुजराती आणि बंगाली भाषेतसुध्दा गाणी गायली आहेत. मीरा चित्रपटातील गाण्यांसाठी त्यांना “आधुनिक भारताची मीरा” असे नावाजले गेले. गुड्डी या चित्रपटातील “बोले रे पपीहरा” या गाण्यामुळे त्यांचे नाव घराघरात पोचले. वाणी जयराम यांची गाणी आणि त्यांचा आवाज मला खूप आवडत असल्याने त्यांचा उल्लेख पुन्हा नक्की येईलच.
मला भावलेल्या गाण्याकडे पुन्हा
वळू यात. आपले पूर्वज जे सांगत आलेले आहेत, तेच या प्रार्थनेत नमूद केले आहे.
भेदभाव अपने दिल से साफ़ कर सके
भेदभाव अपने दिल से साफ़ कर सके
दोस्तों से भूल हो तो माफ़ कर सके
दोस्तों से भूल हो तो माफ़ कर सके
झूठ से बचे रहे सच का दम भरे
झूठ से बचे रहे सच का दम भरे
दूसरों की जय से पहले खुद को जय करे
हम को मन की शक्ति देना मन विजय करे
दूसरों की जय से पहले खुद को जय करे
हम को मन की शक्ति देना
या गाण्याचे बोल हे केवळ शाळकरी मुलांपर्यंत मर्यादित नसून ते आजन्म आपल्या वागणुकीत अवलंबून घेण्यासारखे आहेत. आपल्या मनातून सर्व प्रकारचे भेदभाव दूर व्हावेत, मित्रांकडून झालेली चूकभूल माफ करता यावी आणि कायम खोट्यापासून दूर राहता यावे आणि कायम सत्याची साथ द्यावी यासाठी देवा तू आम्हाला शक्ती दे. या वरवर पाहता छोट्या दिसणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात अमलात आणणे खूप अवघड आहे. दुसऱ्यांवर विजय मिळवणे एकवेळ सोपे, पण आपल्या मनावर विजय मिळवणे फार अवघड. म्हणून हे देवा, दुसऱ्यांवर विजय मिळवण्याचा आधी मला स्वतःच्याच मनावर आधी विजय मिळवू दे, अशी ही प्रार्थना आहे.
मुश्किलें पड़े तो हम पे इतना करम कर
मुश्किलें पड़े तो हम पे इतना करम कर
साथ दे तो धरम का चले तो धरम कर
साथ दे तो धरम का चले तो धरम कर
खुद पे हौसला रहे बदी से ना डरे
खुद पे हौसला रहे बदी से ना डरे
दूसरों की जय से पहले खुद को जय करे
हम को मन की शक्ति देना मन विजय करे
दूसरों की जय से पहले खुद को जय करे
हम को मन की शक्ति देना
कितीही संकटे आली, तरी देवाला एकच मागणे आहे की मी धर्माची कास कधीही न सोडावी; धर्माची साथ द्यावी, धर्मासोबत चालावे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवरचा विश्वास कधीही न ढळो. संकटांची कधीही भीती न वाटो. संकटांचा सामना धैर्याने करण्याची मनःशक्ती मिळो.
दुसऱ्यांवर विजय मिळवायच्या आधी आपल्यावर विजय मिळवून आपण स्वतःला पूर्णपणे सशक्त करणे गरजेचे आहे. त्याने खऱ्या अर्थाने आत्मिक समाधान आणि आनंद मिळतो. हे सर्व सांगणारी अतिशय सकारात्मक अशी ही प्रार्थना आहे. आजच्या जगात मानसिक आरोग्य राखण्यासाठी अनेक सकारात्मक पुष्टीकरण देणारे व्हिडिओज आहेत. त्यांच्यासोबत रोज एकदा ही प्रार्थना म्हणली तर आपल्यात किती सकारात्मक बदल होतात हे तुमचे तुम्हालाच जाणवेल.

– लेखन : तनुजा प्रधान, अमेरिका.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खुपचं सुंदर 👌👌👌
खूप छान मॅडम.
👌💐🤝💐👍