काही दिवसांपूर्वी एका हिंदी काव्य संमेलनात, “मेरे शहर की बारिश” ही माझी कविता सादर करताना छत्रीची प्रकर्षाने आठवण झाली. त्या वेळी सूर्यदेव उगवतच होता, सकाळ होत होती. मस्त ऊन पडले आहे असे वाटत होते तोवर धुवांधार पाऊस पडायला लागला. मी घरातच होते, पण पावसात जोर धरून वाहणारे वारे बघून एक हिंदी गाणे आठवले.
प्यार हुआ इकरार हुआ हैं,
प्यार से फिर क्यूँ डरता है दिल
असा पाऊस पडायला लागल्यावर नेहमी राज कपूर आणि नर्गिस दत्तच्या या गाण्याची आठवण होते. या गाण्याला हिंदी सिनेमा सृष्टी अर्थात बॉलिवूडमध्ये अगदी आयकॉनिक स्टेटस प्राप्त झाले आहे. जसे गणपती वंदना केल्याशिवाय कोणत्याही पूजेची सुरुवात होत नाही, तसेच काहीसे पावसाच्या हिंदी गाण्यांबद्दल आहे. पाऊस, बारिश, बरसात, असे शब्दही निघाले तर हेच गाणे सगळ्यात आधी आठवते!
भारतातही आता पावसाळा सुरू झालाय आणि माझी खात्री आहे की तुम्हालाही हमखास या गाण्याची आठवण झाली असणार !
प्यार हुआ, इक़रार हुआ है
प्यार से फिर क्यूँ डरता है दिल?
प्यार हुआ, इक़रार हुआ है
प्यार से फिर क्यूँ डरता है दिल?
कहता है दिल, “रस्ता मुश्किल
मालूम नहीं है कहाँ मंज़िल”
कहता है दिल, “रस्ता मुश्किल
मालूम नहीं है कहाँ मंज़िल”
प्यार हुआ, इक़रार हुआ है
प्यार से फिर क्यूँ डरता है दिल?
कहता है दिल, “रस्ता मुश्किल
मालूम नहीं है कहाँ मंज़िल”
प्यार हुआ, इक़रार हुआ है
प्यार से फिर क्यूँ डरता है दिल?
इतके गाणे तरी सगळ्यांना नक्की पाठ असणार, हो ना ? १९५५च्या “श्री ४२०” या चित्रपटाचे संगीतकार शंकर-जयकिशन ही जोडी. या संगीतकार जोडीचे खरे नाव काय होते ते तुम्हाला माहिती आहे का ? शंकर सिंघ रघुवंशी आणि जयकिशन दयाभाई पांचाल. या दोघांना एस्.जे. असेही संबोधले जायचे. त्यांनी १९४९ ते १९७१ पर्यंत एकत्र संगीत दिले. जयकिशन यांच्या स्वर्गवासानंतर मात्र शंकर यांनी एकट्याने शंकर – जयकिशन या बॅनर खाली संगीत दिले ते १९८७ पर्यंत.
हे अविस्मरणीय गीत शैलेंद्र यांनी लिहिले आहे. हे गाणे गायले आहे भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर आणि थोर गायक, मन्ना डे यांनी. मन्ना डे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मानित, प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायक, संगीत दिग्दर्शक आणि संगीतकार होते. हिंदी चित्रपसृष्टीतील शास्त्रीय गायकांमध्ये अव्वल दर्जाचे ते गायक होते.
श्री ४२० हा १९५५ चा सर्वात जास्त बॉक्स ऑफिसवर कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला. अलाहाबाद मधून मुंबईत आलेल्या राज (राज कपूर) ला लुबाडले जाते. तो विद्या (नर्गिस दत्त) च्या प्रेमात पडतो. पण सेठ नेमचंद धरमचंद आणि माया (नादिरा) त्याला फसवून वाईट मार्गाला लागतात आणि तो चारसो बीस बनतो. पण लवकरच त्याला आपली चूक कळते आणि तो सुधारतो.
हा चित्रपट त्या काळच्या सोव्हिएत युनियनमध्ये १९५६ साली रिलिज झाला होता. तिथल्या बॉक्स ऑफिस चार्ट्सवर दुसरा क्रमांक मिळाला होता. खूप किंमत मोजून आयात केलेल्या या चित्रपटाला रशियन लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. असे म्हणतात की ३५ दशलक्ष दर्शक आले होते हा चित्रपट बघायला. या चित्रपटाने राज कपूरला रशियामध्ये अगदी दैवत्व प्राप्त करून दिले. आज पासष्ठ वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी राज कपूरच्या गाण्यांची अजूनही तितकीच लोकप्रियता आहे.
राज कपूर हा एक अतिशय कसलेला अभिनेता आणि निर्माता होता. त्याने आर.के. स्टुडिओज् ला उंच पातळीवर नेला. अभिनयाच्या बाबतीत तर त्या काळी तो जनतेच्या मनातला अनभिषिक्त राजा होता, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. बघा ना, या एकाच छत्रीच्या भोवती हे गाणे आहे, पण तसे जाणवतच नाही. मधेच त्याचे माउथ ऑर्गन वाजवणे, मधेच नाचणे, टोपी काढण्याची ती लकब, एकुणात काय प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात तो माहीर होता.
नर्गिसच्या अभिनयाबद्दल तर वादच नाही. मेहबूब खान यांच्या मदर इंडिया या चित्रपटातील तिची भूमिका या गाण्यासारखीच अगदी आयकॉनिक होती. इथेही बघा ना, नुकतीच प्रेमात पडलेली, आपल्या प्रियकराच्या संगतीत थोडीशी घाबरलेली, प्रेम स्वीकारायला धाजवत असलेली, प्रेमात असली तरी पाय जमिनीवर असलेली, नव यौवना तिने खूप सहजरित्या साकारली आहे. विशेष काही मेकप नाही, साधी वेणी, त्याकाळी असायचे तसे एका साध्या साडीवर काळा ब्लाऊज आणि सोबत सहज सुंदर अभिनय! एक यशवी अभिनेत्री ठरायला अंगभूत कला गुणांची फक्त तिला गरज होती, कोणताही बाह्य पांगुळगाड्यांची नाही.
कहो कि अपनी प्रीत का गीत ना बदलेगा कभी
तुम भी कहो, “इस राह का मीत ना बदलेगा कभी”
प्यार जो टूटा, साथ जो टूटा, चाँद ना चमकेगा कभी
प्यार हुआ, इक़रार हुआ है
प्यार से फिर क्यूँ डरता है दिल?
कहता है दिल, “रस्ता मुश्किल
मालूम नहीं है कहाँ मंज़िल”
प्यार हुआ, इक़रार हुआ है
प्यार से फिर क्यूँ डरता है दिल?
एकमेकांना प्रेमाची वचने देताना मात्र अगदी फिल्मी झाले आहेत बरं का दोघे. पण ही वचनेच तर प्रत्येक प्रेम कहाणीचा पाया असतात. पुढे काय होईल हे कोणाला ठाऊक असते ? एकमेकांवरचा विश्वास त्या प्रेमाला ताकद देत असतो. तुझ्याखेरीज इतर कोणीही माझ्या आयुष्यात येणार नाही हेच तर आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीकडून हवे असते. आताच्या पिढीला या संकल्पना कालबाह्य वाटतील कदाचित. पण माझी खात्री आहे की आजसुद्धा अशी वचने देणारी आणि निभवणारी अनेक जोडपी नक्की असणार.
मात्र “प्यार जो टूटा, साथ जो टूटा, चाँद ना चमकेगा कभी” असे म्हणून डिप्रेस होऊन जीवन जगायचे सोडून देणे हे त्याकाळी ही सगळे करत नव्हते. मला वाटतं की सिनेसृष्टीत मजनूसारख्या व्यक्तींना अधिक ग्लॅमरस बनवून त्यातून नाट्यमयता वाढवण्याचा जास्त प्रयत्न असावा. प्रत्यक्षात डोळे पुसून पुन्हा नव्याने उमेदीने जगणारी ती पिढीही होती आणि आताची पिढीही आहे.
रातें दसों दिशाओं से कहेंगी अपनी कहानियाँ
गीत हमारे प्यार के दोहराएँगी जवानियाँ
मैं ना रहूँगी, तुम ना रहोगे, फिर भी रहेंगी निशानियाँ
प्यार हुआ, इक़रार हुआ है
प्यार से फिर क्यूँ डरता है दिल?
कहता है दिल, “रस्ता मुश्किल
मालूम नहीं है कहाँ मंज़िल”
कहता है दिल, “रस्ता मुश्किल
मालूम नहीं है कहाँ मंज़िल”
प्यार हुआ, इक़रार हुआ है
प्यार से फिर क्यूँ डरता है दिल?
प्रेम कसे असावे ते देखील सांगितले आहे. जीवनाच्या अंधारमय काळात आपली ही प्रेमकथा मार्ग दाखवणारी असावी. प्रेम इतके सशक्त असावे की आपल्या प्रीतीचे गोडवे इतर लोकांनी सांगावे. आपले गीत सगळ्यांच्या ओठांवर तरळून त्यांच्यासाठी एक उदाहरण बनावे. प्रेम नश्वर असते. आपण नाहीसे झालो तरी आपल्या प्रेमाचे प्रतीक, आपली मुले मागे ठेवून जावू. हाच तर मानवाच्या लग्न संस्थेचा उद्देश आहे.
“मैं ना रहूँगी, तुम ना रहोगे, फिर भी रहेंगी निशानियाँ” हे गाताना नर्गिस छोट्या छोट्या तिथून चालत जाणाऱ्या तीन मुलांकडे बोट दर्शवते. तुम्हाला माहितीये का की ही तीन मुले कोण होती? ती राज कपूर यांची मुले, रणधीर, रितू आणि ऋषी कपूर होती!
त्यावेळी घडलेली एक गंमत सांगते. या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी ऋषी कपूर खूपच लहान होता. रेनकोट घालूनसुद्धा पाणी अंगावर पडले की खूप रडायला लागायचा. त्यामुळे चित्रीकरण काही धड होईना. मग नर्गिसने एक शक्कल लढवली. तिने ऋषीला सांगितले की जर तू रडला नाहीस तर मी तुला चॉकलेट देईन. बस, मग काय चॉकलेटसाठी छोटा ऋषी पटकन तयार झाला आणि शॉट ओके झाला!
या गाण्यात इतकी तुरळक माणसे आहेत. हल्लीच्या गाण्यांमध्ये बरेच मागे प्रशिक्षित नर्तक असतात. त्याच्या तुलनेत या गाण्यात नायक – नायिकेवर लक्ष केंद्रित करण्यात आले. एक गोष्ट मात्र मला थोडेसे दुःख देऊन गेली. यात एक सायकलवर जाणारा माणूस दिसला ज्याच्याकडे रेनकोट नसल्यामुळे तो छत्रीच घेऊन जात असतो. ही गरिबीची परिस्थिती आजही भारतातच नव्हे तर जगात इतरही देशात दिसून येते याचे मला फार वाईट वाटले. सुमारे सत्तर वर्षांच्या काळात जग फक्त खरेच सुधारले आहे का, हा प्रश्न मनाला सतावून गेला !
मला ना सगळ्यात गंमत वाटली ती रस्त्यावर पावसात भिजत चहा विकणाऱ्या त्या माणसाची. बिचारा फक्त एक रुमाल डोक्यावर घालून भिजत फुटपाथवर, पावसात गारठून चहा पित बसलेला असतो. गिऱ्हाईक नाही, भिजतोय, गारठतोय, पण सगळे लक्ष या प्रेमी युगुलावर ! कसा मिश्कीलपणे हसत असतो तो ! का कोणास ठाऊक पण मला तो सगळ्यात जास्त भावला! त्याच्यासारखे आनंदी राहणे जमेल का बुआ आपल्याला ? असेही वाटून गेले. पाऊस आला की लगेच छत्री उघडणारे नाहीतर धावत जाऊन आडोशाला उभे राहणारे आपण शहरी लोक, काहीही नसताना असे मस्त आनंदात जगता येईल आपल्याला?
खरे सांगायचे तर रेनकोट मधली ती छोटी मुलं आणि हा चहावाला माणूस बघून मला हे गाणे जास्त भावले. असे जगायला शिकता आले पाहिजे. बाकी जोडप्यांमध्ये प्रेम कहाणीचा प्रवास सिनेसृष्टीत भरपूर बघायला मिळतोच! पण कधी कधी दिग्दर्शक बारीक बारीक गोष्टीतून जीवनाच्या पाटीवरल्या खूप मोठ्या गोष्टी अभावितपणे सांगून जातो, नाही का ?

– लेखन : तनुजा प्रधान, अमेरिका.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800