हे जगणे सुंदर करणे “ही गोष्ट आपल्याच हातात असते, मनात ही असते”.
“आपल्या मनाला आपण जसे वळण लावू, तसे ते कार्य करेल “.
पण नेमकी ही बाबच मोठी अवघड आहे. कारण आहे, आपल्या मनाचे “चंचल” असणे ! या पाऱ्यासारख्या चंचलमनास काबूत ठेवणे, तसे जमणे हे भल्या-भल्या माणसांना जमत नाही तिथे सामान्य माणसाचे काय सांगावे ?
त्यामुळे होते काय की, “आपल्या जगण्याचेच एक ओझे होऊन जाते” आणि मग “हे असे बोझील आयुष्य मनावर एक “बोझ” बनते. असे जगणे म्हणजे मनाचा कोंडमारा करून जगणे असते.
त्यामुळे उभारी घेण्याचे सोडाच, मन हे दुबळे होऊनी जाते. अशा दुबळ्या मनाला धीर देणारे एक गाणे आहे पहा…
“झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा
फुलला पहा सभोती आनंद या मनाचा”👌 ||
आपल्या प्रत्येकाच्या जीवनात “सुखाची बाग फुलत असते, तसेच “चोरपावलाने येणारे दु:ख वेदना देऊन जाणारे असते. ते सुद्धा जीवनातला एक अनुभवच शिकवून देत असते.
म्हणून सुख असो वा दु:ख, त्याचे मनावर ओझे न बाळगता जो पुढे पुढे जात असतो तो खरा आयुष्य जगणारा समजावा.
शायर मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेले दोस्ती “सिनेमातील हे गाणे हेच सांगणारे आहे..
“राही मनवा दुख की चिंता क्यू सताती है ?
दुख तो अपना साथी है ….
सुख है एक छांव ढलती, आती है जाती है…
दुख तो अपना साथी है !
मनावर ओझी बाळगणे, तसे जगत रहाणे म्हणजे स्वतःवरच अन्याय करण्या सारखे असते. हे ओझे कधी एखाद्या अपराधी भावनेचे असते. ही भावना मनमोकळे करून सांगता येते.
त्यासाठी धीर आणि धैर्य असावे लागते. त्या अभावी सांगण्याचे राहून गेले तर ?
मग मात्र आयुष्यभर हे ओझे मनावर तसेच घेऊन जगावे लागते.
कधी कधी कुणाच्या मदतीने आपले अवघड असे कार्य सफल होते. पण या उपकाराची परतफेड करू शकणार नाही, ही जाणीव ओझे बनून आपल्या मनावरचा ताण वाढवीत असते.
वास्तविक, जो आपले काम करतो त्याने अपेक्षा केलेली ही नसते, बदल्यात काही मिळावे याची. पण आपले मन ते स्वतःलाच कुरतडत बसते मी काही करू शकलो नाही या जाणिवेने !
खरं म्हणजे निर्मल मनाने आपण या सर्वांचा स्वीकार करू शकलो तर “देणारा आनंदी आणि घेणाराही आनंदी होतो”.
पण मनाचे व्यवहार इतके साधे आणि सरळ होऊ लागले तर, आपले जगणेच किती सोपे होऊन जाईल !
असे होत नाही आणि उपकाराच्या ओझ्याखाली दबून जाऊन, मिंधेपणाच्या भावना सोबत घेतच आयुष्य जगणारे आपल्या भोवताली दिसून येतात.
“स्वत:च्या क्षमतेबद्दलचा न्यूनगंड बाळगणे”, तो झुगारून देण्याची वृत्ती नसणे. हा दोष आपल्या व्यक्तिमत्वातील “एक दुर्दैवी दोष” आहे असे म्हणावे लागेल.
झुगारून देत, नव्या उमेदिने पुढे सरसावणे या कृतीतच “मनावरचे ओझे” फेकून देणे अभिप्रेत असते. पण अशी माणसे स्वतःच्या कोशातून बाहेर पडत नाहीत, 👌आणि मनावरचे ओझे अगदी असह्य होऊन जाते . पण म्हणून काही जगणे सोडायचे का ? नाही, मुळीच नाही.
अशा वेळी मदतीसाठी हात पुढे करावा. कुणीतरी “जिंदादिल आदमी” नक्कीच धावून येईल. तेव्हा नक्कीच म्हणता येईल,
एक अकेला थक जाये तो..
मिल कर बोझ उठाना ….!
आणि मनावरचे ओझे बाजूस सारून आयुष्याचा “नया दौर” सुरु करता येईल.
चला तर, मनावरचे ओझे देऊ फेकुनी
जगण्यास नव्याने सज्ज होऊ…… !
– लेखन : अरुण वि.देशपांडे. पुणे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800