Tuesday, June 17, 2025
Homeसाहित्य'महानुभावांचे मराठी योगदान' ( ३ )

‘महानुभावांचे मराठी योगदान’ ( ३ )

आद्य कवयित्री : महदंबा
‘ स्मृतीस्थळामध्ये’ , महदाइसेच्या पहिल्याच स्मृतीत स्वामींनी भटोबासांना ‘घडिले:मढिले: आचार्य करूनि महादाईसे निरोविले ‘ असा उल्लेख आहे. वस्तुतः स्वामी सर्वच पंथानुयायांना असन्निधान अवस्थेत सोडून निघून गेले पण महदाईसेचा हा विशेष उल्लेख लक्षात घेण्याजोगा आहे. ‘स्मृतीस्थळात ‘ तिच्या भाववृत्तींचा जो आविष्कार झाला आहे . त्यातून तिच्या हळुवार मनाचे दर्शन घडते. ‘धवळ्याची’ ही निर्मिती किती संवेदनक्षम मनाची होती, याची पार्श्वभूमीच ‘स्मृतिस्थळातील’ काही स्मृती निर्माण करतात आणि त्यामुळे ‘धवळ्याच्या ‘ या निर्मितीच्या मनाच्या आकलनास उपयुक्त वाटतात.

स्वामींनी महदाइसेस भटोबासांकडे निरोविलेले असते. पण स्वामींच्या प्रयाणानंतर भटोबासच स्वामींच्या विरहाने रान डोंगरात मूर्च्छित होऊन पडतात . त्यांना महदाइसा शोधते व त्यांना वेळेवर ‘बोळेवरी दूध ‘ पाजून सावध करते . ‘माझा देवो तो श्रीचक्रधर ओ’ असे म्हणून भटोबास विव्हळ होतात. तेव्हा महदाइसा म्हणते, ‘नागदेया मज तुज निरोविल असे की !’ स्वतःच्या दुःखावर पालव घालून दुसऱ्याला तेच दुःख विसरायचा उपदेश करणारे स्त्रीमन किती आगळे असावे, याची कल्पनाच केलेली बरी .

एकदा भिक्षा मागत असतांना एका बालकाने केलेल्या स्वामींच्या नामोच्चाराने देखील ‘महदाईसा थोर सुख जाले’ आणि त्या बालकास तिने झाडूनि पुसौनि कडीए घेऊनि आलेंगिले!’आढावातच अशा या महदाइसेने स्मरणभक्तीचा एक आदर्शच निर्माण केला आहे.

‘धवळ्याची’ निर्मिती ही अशी संवेदनक्षम होती. भावूक होती, आणि म्हणूनच तिच्या ‘धवळ्यात’ भावभावनांचे नाट्य अविष्कृत झाले . श्रीकृष्णकथेतून महदाईसेने केलेली रुक्मिणीहरण कथेची निवड त्यासाठी योजिलेले, लोक जीवनात रुळलेले मुक्त ओवीचे वाहन व यादवकालीन बोली भाषेचे माध्यम सांकेतिकतेच्या आहारी न जाता केलेले रुक्मिणीचे व श्रीकृष्णाचे चित्रण, कुशल प्रसंग — योजना विविध व्यक्तिमनांच्या संमिश्र रंगाकृतींनी सिद्ध झालेले या कथाकाव्याचे मनोहर रूप या सर्वच वैशिष्ट्यांचे दर्शन महदंबेच्या धवळ्यात घडते.

महादाईसेच्या धवळ्यांसारखी रचना मराठीत झालेली नाही पण ‘आद्य मराठी धवळेकार म्हणून महदाईसेचे स्थान अबाधित राहिले . “धवळे म्हणजे महदाईसा आणि महदाईसा म्हणजे धवळे”. असे समीकरण शतकानुशतके मांडले जावे यातच महदाईसेचे आणि धवळ्याचे अनन्यसाधारणत्व दडलेले आहे. यात मुळीच शंका नाही.

प्रा डॉ विजया राऊत

– लेखन : प्रा डॉ विजया राऊत
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?