प्रसाद
प्रसाद कशाला म्हणतात, हे आपण पाहिलेच. त्या संदर्भात पुढील लीळा लक्षात घेण्यासारखी आहे.
कलियुगातील पूर्ण परब्रम्ह परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभू यांचे खडकुली येथे वास्तव्य असतांना एके दिवशी पैठणचे सारंगपंडित ब्राह्मण सर्व ज्ञांच्या दर्शनासाठी आले. सर्वज्ञांच्या ठायी त्यांना उपहार करावयाचा होता. त्यांनी येतांना दोन पासवडीची वस्त्रे पण आणली होती. हेतू हा होता की, एक वस्त्र पूजावसाराच्या वेळी सर्वज्ञांना बसण्यासाठी द्यायचे व ते त्यांच्या स्पर्श संबंधाने पवित्र झाल्यावर आपण ‘प्रसाद’ म्हणून घ्यायचे व दुसरे वस्त्र त्यांना अर्पण करायचे.
सारंगपंडितांनी बाईसांना सर्व पदार्थ आणून दिले. बाइसांनी उपहार तयार केला. सारंग पंडितांनी सर्वज्ञांसाठी पासवडीचे आसन तयार केले. सर्वज्ञ आसनावर बसले. त्यांनी सर्वज्ञांची चांगल्या प्रकारे पूजा केली. दुसरी पासवडी अर्पण केली. धूपारती, मंगलाआरती केली. दंडवत घातले, त्यानंतर सर्वज्ञ भोजनाची तयारी किंवा झाली किंवा नाही, हे पाहण्यासाठी आतमध्ये गेले. तेव्हा सारंगपंडितांनी सर्वज्ञांना बसण्यास टाकलेली पासवडी हळूच उचलून घेतली व पांघरली. सर्वज्ञ आतून बाहेर आल्यावर त्यांनी पाहिले की, सारंग पंडितांनी आसनावरील पासवडी घेतली. तो सारंगपंडितांना म्हणाले की, “एथीची पासवडी का घेतली ?” तेव्हा सारंगपंडित म्हणाले, “मी आपला प्रसाद घेतला आहे.” तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभू त्यांना काय म्हणतात ?,” प्रसादु तो काइ ऐसा ? एथौनि प्रसन्न होउन दीजे तो प्रसादु कीं : देवो दे तो प्रसादु कीं : मग सर्वज्ञांनी आपल्या जवळील पासवडीचे वस्त्र बाईसांकडून घेतले व ते सारंग पंडितांना प्रसन्न होऊन दिले.
या व्यतिरिक्तही परमेश्वराच्या असनिधानामध्ये अधिकरण, निमित्य, सुहृद, उपकारक, अनुसरले,
ज्ञानीये, बोधवंत यांनीही प्रसन्न होऊन जो दिला, अथवा धर्मे आला, तथा अदृष्टाने योग करून देवविला, तोहि प्रसादच होय. या व्यतिरिक्त इतर मार्गाने आलेले, त्यांना ईश्वराच्या संबंधित वस्तू म्हणता येईल, पण त्याला प्रसाद मात्र म्हणता येणार नाही. कारण परमेश्वर ज्यांच्या करवी प्रसाद देववितात. त्यांच्याविषयी परमेश्वराचा हेतू असतो. अपूर्व प्रसन्नता असते. प्रथम परमेश्वर आपण प्रसन्न होतात व तो प्रसन्नतेचा मनोधर्म प्रसाद ज्यांच्याकरवी देववितात, त्यांच्या हृदयात संचारतात व मग ही व्यक्ती प्रसन्न होऊन पुढील व्यक्तीस प्रसाद देते. म्हणून प्रसाद मिळावा, अशी इच्छा जरी आपणास झाली, तरी पुढील व्यक्ती जोपर्यंत प्रसन्न होऊन प्रसाद देत नाही, तोपर्यंत मागून अथवा बळजबरीने प्रसाद घेऊ नये.
क्रमशः

– लेखन : प्रा डॉ विजया राऊत. नागपूर
– संपादक : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800