Wednesday, December 3, 2025
Homeलेखमाध्यमभूषण नीला बर्वे

माध्यमभूषण नीला बर्वे

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या सिंगापूर येथील नीला बर्वे यांच्या “कोवळं ऊन” या कथा संग्रहाचे प्रकाशन उद्या होत आहे. त्यानिमित्ताने “माध्यमभूषण” या पुस्तकातील त्यांची जीवन कहाणी पुढे देत आहे.

नीलाजी यांना पुस्तक प्रकाशनासाठी हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

मुंबईचे सांस्कृतिक केंद्र समजल्या जाणाऱ्या विलेपार्ले येथे नीला बर्वे यांचा जन्म झाला. घरात सर्वांना वाचनाची अत्यंत आवड. आजीसुद्धा खूप पुस्तके वाचायची, त्याबद्दल सांगायचीही! पार्ले टिळक शाळा आणि टिळक मंदिर या दोन संस्थांनी त्यांचं बालपण समृद्ध केलं. शाळेत अभ्यास आणि खेळ, सूर्यनमस्कार या सर्वांना सारखाच न्याय असे. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक जडणघडण उत्तम झाली. तिथेच बी.एससी. पर्यंत शिक्षण झाले. पदवीनंतर आवड म्हणून भारतीय विद्याभवन येथे पत्रकारितेचा कोर्स केला. तेथे द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेखी आणि तोंडी परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरीसाठी पत्र आले पण त्याचवेळी लग्न ठरल्याने, बॉण्ड लिहून देता आला नाही आणि आत्यंतिक आवड असलेली नोकरी मुकली ही खंत त्यांना कायम राहिली.

त्यानंतर नीलाजी पार्ले टिळक विद्यालय येथे शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. लग्न होऊन ठाण्याला गेल्या आणि तेथून रोज सकाळी येत होत्या त्यामुळे शाळेतर्फे बी.एड. करून कायमची शिक्षिका म्हणून तेथे रुजू होण्याची संधी नाकारावी लागली. कारण रोज ठाणे येथून, पहाटे साडेतीन वाजता उठून, सकाळी साडेसहाला पार्त्याला येणे कायम जमेल असे वाटले नाही. बँकेच्या परीक्षा दिल्या होत्या आणि सर्वच परीक्षा उत्तीर्ण होऊन जेव्हा नियुक्तीपत्रे आली तेव्हा सर्वांच्या सल्ल्यानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाची नोकरी स्वीकारली. तीही तशी दूर म्हणजे फोर्ट विभागात होती.

नोकरी आणि घरचे काम सांभाळून लेखनाची आवड जपत नीलाजी ठाणे येथील ठाणे वैभव, दैनिक सागर, सन्मित्र या दैनिकांमध्ये लिहीत होत्या.

संध्याकाळी घेत असलेल्या शिकवण्या, मुलांच्या पालकांनी चालू ठेवण्याची विनंती केल्यामुळे सुमारे ४-५ वर्षे, ती मुले दहावी परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत सर्वांच्या सोयीने सुरू होत्याच. त्याचवेळी विविध संस्थांमध्ये वेळ मिळेल तसे काम करायला त्यांनी सुरुवात केली होती. हरियालीचे संस्थापक, पर्यावरणमित्र श्री. पूनम सिंघवी, एक अफलातून व्यक्तिमत्त्व ! हरियालीच्या पर्यावरण-विषयीच्या सर्व उपक्रमांमध्ये त्या सक्रिय भाग घेत होत्या. तसेच ग्रंथालीचे उपक्रम, व्यायाम शाळेचे, शुभंकरोति संस्थेच्या रक्तदान, आरोग्य तपासणी, दिवाळी बाजार… विविध उपक्रमांमध्ये कायम सक्रिय मदत करीत होत्या. फोटोग्राफीचा कोर्स करून छंदाचे रूपांतर व्यवसायात करण्याचा त्यांचा विचार चालला होता. त्याचवेळी मोठ्या दिरांकडून (विजयकुमार) अत्तर बनवण्याची माहिती घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाने अत्तर बनवित होत्या. त्यानंतर अगरबत्ती, अत्तरे बनविणे सुरू केले. यासाठी उत्तम बाजारपेठ होती. त्याचा अभ्यास करून फोटोग्राफी आणि सुगंध व्यवसायामध्ये उतरण्याचे ठरवत असतानाच अचानक वडिलांचे निधन झाले. लहानपणापासून त्यांच्याशी अतिशय अटॅचमेंट होती त्यामुळे काही काळ त्या कोसळल्याच, शिवाय वडिलांचा या व्यवसायाला खंबीर पाठिंबा असणार होता. त्यामुळे व्यवसाय काही सुरू केला नाही, नोकरीच सुरू ठेवावी लागली.

कर्तृत्ववान परंतु समाजापुढे न आलेल्या ठाण्यातील महिलांचा शोध घेऊन त्यांच्यावर नीलाजींनी दै. सागरमध्ये साप्ताहिक लेखमाला लिहिली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. शेवटचा लेख त्यांच्या आईवर (जी एम.ए. होतीच पण मुख्याध्यापिकेचे पद सांभाळत अनेक समाजोपयोगी उपक्रम करीत होती) लिहून पुस्तक प्रकाशन करायचे असे दैनिक सागरचे संस्थापक, संपादक निशिकांत जोशी यांनी सांगितले पण अचानक दुर्दैवाचा घाला पडून मोठ्या भावाचे अकस्मात निधन झाले. या अरिष्ट्याने सारी परिस्थिती बदलून गेली.

बँकेची नोकरी म्हणजे सतत आकड्यांची जुळवाजुळव, पण नीलाजींनी आयुष्यभर आकड्यांची यशस्वीपणे जुळवाजुळव करीत असतानाच आपलं अक्षरप्रेम कधीच कमी होऊ दिलं नाही. बँकेमध्ये बदली होणाऱ्या व सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येकासाठी कवितेमधून निरोप देण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. आजही प्रत्येकाकडे आपापली कविता आहे. त्यावेळी बँकेमध्ये कौटुंबिक वातावरण असायचे. एकमेकांच्या सुखदुःखात सर्वजण सहभागी असायचे, त्यामुळे दुसऱ्या शाखेत जाताना अथवा सेवानिवृत्त होताना भावनाविवश व्हायला व्हायचेच. त्यामुळे त्यांच्यावर, त्यांच्या गुणांवर कविता लिहून पुढेही आपले ऋणानुबंध कायम असतील हे कवितेत सांगून अशाप्रकारे निरोप देण्याची पद्धत सुरू केली. नंतर तर आजूबाजूच्या शाखेतूनही त्यासाठी बोलावणी येऊ लागली. त्यांचे टोपणनावच कविता सुगंधे असे पडले.

लहानपणी काकांनी कॅरम आणि पतंग उडवणे शिकविले होते, तर दादाने बुद्धिबळ. बँकेत नोकरीला असताना सरावाशिवाय कॅरम स्पर्धांमध्ये भाग घेऊन इंटरबँक कॅरम स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसे मिळाली तर झंडुतर्फे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्रात नीलाजी पाचव्या क्रमांकावर आल्या परंतु घरच्या जबाबदाऱ्यांमुळे नॅशनल खेळायला जाता आले नाही. घरी वडिलधारी कोणी नसल्यामुळे, घरच्या सर्व जबाबदाऱ्या, मुलगा लहान यामुळे ठाण्याबाहेर कोणत्याही स्पर्धांसाठी जाता आले नाही. मात्र ठाणे येथे श्री. नवरंगे यांच्याकडे आणि त्यानंतर डोंबिवलीला डॉक्टर आचार्य यांच्याकडे नीलाजींनी अॅक्युप्रेशरचे प्रशिक्षण घेतले. अनेकांना अॅक्युप्रेशरद्वारे वेदनामुक्त करण्याचे समाधान मिळाले, आजही मिळत आहे. तसेच रेकी ग्रँडमास्टर सर्वश्री प्रमोद कुलकर्णी यांच्याकडे रेकीचे प्रशिक्षण घेऊन आज त्या रेकी ग्रैंडमास्टर आहे आणि त्याद्वारे अनेकांना त्यांच्या समस्यांवर उपचारासाठी, अनेकांना त्यांच्या विवंचनेमधून मुक्त होण्यासाठी सहाय्य करीत आहे. अॅक्युप्रेशर, रेकी याद्वारे गेली ३५ वर्षे त्या विनामूल्य सेवा देत आहेत. ठाण्यात असताना त्यांनी अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले. तसेच वेषभूषा, बादविवादस्पर्धा, घरगुती गौरीसजावट स्पर्धा इ. साठी परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच ठाण्यात अनेक वर्षे त्यांनी मुलांसाठी संस्कारवर्गांचे आयोजन केले.

मुले मोठी झाल्यावरच नीलाजींनी प्रमोशन घेतले. बँकेत अनेक महत्त्वाची कामे सांभाळली. त्यात गृहकर्जे आणि त्यानंतर बँकेच्या सुवर्ण व्यवसायाची जबाबदारी आणि विविध योजना.

त्यानंतर नीलजींची गोव्यात बदली झाल्यावर व्यवस्थापकाच्या पदाबरोबरच येणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमरीतीने निभावल्या. शिवाय वेळ काढून दैनिक लोकमत, गोमंतक या वृत्तपत्रातही लिखाण केले. पणजी आकाशवाणीवरून कविता, नाट्यछटा, लेख सादर झालेच पण बँकेविषयी माहिती आणि जागृतता यावरही काही भाषणे झाली.

गोवा दूरदर्शनवरूनही नीलाजींचे काही कार्यक्रम झाले. गोव्यातील लोक अतिशय रसिक आणि साहित्याचे पुजारी! त्यामुळे तिथे ठिकठिकाणी झालेल्या काव्य संमेलनामध्ये आमंत्रणे , अध्यक्षीय भाषणेही झाली . पद्मश्री प्रसाद सावकार (त्यांचे पहिलीत पाहिलेले नाटक आठवले व तसे प्रथम भेटीत सांगूनही टाकले. त्यांच्याशी इतके ऋणानुबंध जुळले की ते नीलाजींना मुलगी मानू लागले. आता त्यांचे वय ९६ वर्षे आहे. भारतात आल्या की नीलाजी त्यांना भेटल्याशिवाय परत जात नाहीत) यांच्या शुभहस्ते गोव्यातील समस्त लोकांचे आदरणीय व्यक्तिमत्त्व, सुप्रसिद्ध लेखक, प्रकाशक सर्वश्री दिलीप बोरकर यांनी नीलाजींचा रानफुले हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. घरी आई आणि वडील वेगवेगळ्या शाळांमध्ये मुख्याध्यापक आणि उत्तम लेखक. दादाही प्रथितयश इंजिनिअर पण उत्तम विनोदी लेखक पण पुस्तक मात्र आपले प्रकाशित होत आहे या विचाराने त्या हळव्या झाल्या होत्या. पुढारीचे संपादक प्रभाकर ढगे यांच्यामुळे त्यांच्या पुढारीच्या दिवाळी अंकात कथाही प्रकाशित झाल्या ज्याला वाचकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला.

बँकेत अधिकारी होईपर्यंत नीलाजी घर आणि नोकरी सांभाळूनविविध उपक्रमांमध्ये सहभाग घ्यायच्या. एकपात्री प्रयोग, बँकेतर्फे होणाऱ्या राज्यस्तरीय एम. एस. पटेल एकांकिका स्पर्धेत भाग, ठाणे जिल्हा एकांकिका स्पर्धेत त्या भाग घेत असत. अधिकारी झाल्यावर मात्र इतक्या जबाबदाऱ्या वाढल्या की हे सर्व उपक्रम थांबलेच.

नीलाजींच्या सेवानिवृत्तीला काही वर्षे असताना एका दुर्घटनेत त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यावेळी त्या गोवा येथे ग्रामीण भागांत शाखाप्रमुख होत्या.पुढे नीलाजी सेवानिवृत्त झाल्यावर गोव्यातील काही सहकारी बँकांनी त्यांच्याकडे रुजू होण्याविषयी विचारणा केली. तसेच काही वृत्तपत्रांनीही विचारले. पण मुलगा राहुल ,जो मद्रास आयआयटी मधून एम टेक झाला आहे,त्यास हे कळताच त्याने त्यांना सिंगापूरला बोलावून घेतले आणि यापुढे तू नोकरी करायची नाही, खूप केलेस आत्तापर्यंत ,आता तुझे राहून गेलेले छंद पुरे करायचे असे सांगितले. नंतरही स्टेट बँकेतर्फेही काही पदांसाठी पुन्हा जॉईन होण्यासाठी ऑफर्स आल्या, त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्या स्वीकारल्या आणि आजही ते तेथे कार्यरत आहेत पण मुलाच्या ठाम सांगण्यामुळे त्यांनी आपल्या छंदांसाठी वेळ देण्यास सुरुवात केली. मात्र सिंगापूरला असूनही गोव्यातील स्टाफशी, ग्राहकांशी जोडले गेलेले ऋणानुबंध आजही कायम आहेत.

नीलाजींचे प्रांजळ मत आहे की, जर दुसऱ्या देशात कायमचे रहायला जायचे असेल तर तरुण वयात जावे. नोकरी, वाढता संसार, नव्या जागीं सेटल होण्यास धडपड होते, पण १०-१५ वर्षांत तिथलेच होऊन जातो. सारे आयुष्य एका देशात गेल्यावर, अनेक वर्षांचे स्नेहबंध सोडून दुसरीकडे जुळवून घेणे कठीण जातेच . सारा वेळ मोकळा पण बाकी कोणी नाहीत मोकळे आपल्याबरोबर संवाद साधण्यास. काही मित्रपरिवाराच्या कथा ऐकल्या होत्या. त्यांचे म्हणणे… थोडे दिवस ठीक आहे, जातो वेळ इकडेतिकडे फिरण्यात पण नंतर बोअर होते. त्यांची आपली संस्कृती, खाणे-पिणे, सारेच वेगळे. कसे जुळवून घेणार या वयात? आणि परत आले भारतात. पण त्यामुळे मुलांना काळजीच.नीलाजींनी मात्र ठरविले, मुलाला असल्या टेन्शनमध्ये अडकवायचे नाही. त्याची अपेक्षा किती माफक होती की, आईने निव्वळ आनंदात रहावे! त्याप्रमाणे त्यांनी सिंगापूर महाराष्ट्र मंडळातील उपक्रमांत भाग घेण्यास सुरुवात केली. तसेच या देशाने आधार दिला म्हणून तेथील लोकांसाठी काम करणे हे कर्तव्यच आहे असे मानून विविध संस्थांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आरएसव्हीपी सिंगापूर (ज्येष्ठ स्वयंसेवकांची संस्था) या संस्थेत सहभागी होऊन त्यांच्यातर्फे नॅशनल हार्ट हॉस्पिटल, स्त्रिया आणि मुलांसाठी असलेले के. के. हॉस्पिटल, वृद्धाश्रम, इंडियन हेरिटेज अशा निरनिराळ्या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून जाऊ लागल्या. तसेच खेळांची आवड असल्याने अॅक्टिव्ह एसजी या सिंगापूरच्या क्रीडा संस्थेमध्ये सभासद होऊन निरनिराळ्या खेळांच्या स्पर्धेसाठी स्वयंसेवक म्हणून सेवा देऊ लागल्या. आंतरराष्ट्रीय रग्बीसाठी स्वयंसेवक म्हणून काम करताना विदेशातील ८ टॉपमोस्ट टीम्सच्या खेळाडूंच्या स्पर्धा त्यांना बघण्यास मिळाल्या. शिवाय हा खेळ त्या पहिल्यांदाच लाईव्ह बघत असल्याने त्याचे नियम, स्किल इ. सर्व समजावून घेण्याची संधी त्यांना मिळाली. नॅशनल व्हॉलीबॉल चॅम्पिअनशिप, बून ले येथील अॅक्टिव्ह एसजी हॉकी व्हिलेजचा उद्घाटन समारंभ (१७ ऑगस्ट २०१९) येथे फोटोग्राफर म्हणून त्या स्वयंसेवक होत्या.

सिंगापूरला आल्याआल्याच आरएसव्हीपी सिंगापूर या संस्थेला २० वर्षे झाल्याबद्दल त्यांनी लोगो स्पर्धा जाहीर केली होती. एकमेव बक्षिस होते आणि ते २०० डॉलर्स आणि गाला डिनर विथ सिंगापूर प्रेसिडेंट असे होते. नीलाजींची चित्रकलेची आवड उफाळून आली.अथक परिश्रम करून नीलाजी या स्पर्धेत सहभागी झाल्या आणि विशेष म्हणजे प्रथम क्रमांक मिळाला. त्यामुळे त्यांना मुलासह तेथील राष्ट्रपतींना भेटायची संधी मिळाली. या लोगोमुळे संस्थेतही चांगली ओळख झाली.

नीलाजींना कॅरम लहानपणापासून अतिप्रिय. शिवाय त्या ऑल इंडिया कॅरम फेडरेशनच्या पंच. त्यामुळे सिंगापूर सरकारच्या क्रीडा अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी हा खेळ सिंगापूरमध्ये लोकप्रिय करायचा आहे, इथल्या मुलांना शिकवायचा आहे म्हणून सांगितले. काही बैठकीनंतर त्यांनी नीलाजींना कॅरमचे २ संच मंजूर केले त्याचप्रमाणे क्लेमेंटी स्पोर्ट्स हॉलमध्ये जागाही दिली. येणाऱ्या मुलांना (वयोगट ८ ते १४ वर्षे ठेवला होता) कॅरम म्हणजे काय खेळ आहे, सोंगट्या, स्ट्रायकर म्हणजे काय इ. पासून शिकविण्यास सुरुवात केली. मुले खेळांत रस घेऊ लागली, काही बऱ्यापैकी खेळू लागले पण हाय रे दैवा ! कोरोनाच्या आक्रमणामुळे त्यांचा हा उपक्रम बंद पडला. काही काळाने असोसिएशन ऑफ कॅरम, सिंगापूर या नव्याने सुरू झालेल्या संस्थेतील एकाने संपर्क साधला. येथे नीलाजींच्या कॅरमसंबंधी सांगायचे तर लग्नानंतर कधी खेळायला वेळ नाही मिळाला पण तरीही त्यांनी आंतरबैंक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन पारितोषिके मिळविली होती. परंतु १९९० च्या सुमारास उजव्या हाताच्या अंगठ्याला लागले, खरंतर त्याचे बरेच तुकडे झाले. त्यानंतर तो अधूच राहिला आणि २००० मध्ये उजव्या कोपराला फॅक्चर झाले. बहुतांश संपलेला खेळ पूर्ण संपला पण खेळावरील प्रेमामुळे परीक्षा देऊन त्या अम्पायर झाल्या. तर २०१९ मध्ये एसीएसमध्ये सामील झाल्या आणि तिथे भारतातील विविध राज्ये, श्रीलंका येथील टॉपमोस्ट खेळाडूंची ओळख झाली. नोकरीनिमित्त सिंगापूर येथे आलेले पण कॅरमचे प्रचंड भोक्ते अशी मंडळी एकत्र आली. त्यांच्यासाठी अम्पायर म्हणून राहताना त्यांच्या खेळांचा आनंद घेतला. त्यातीलच दोघांनी त्यांना पुन्हां खेळायचा आग्रह केला. स्ट्रायकर नीट पकडताही येत नव्हता. मी नाहीच खेळू शकणार यावर त्या ठाम होत्या. पण बालाजी आणि लिनस या दोन आंतरराष्ट्रीय विजेते आणि असोसिएशनचे पदाधिकारी आणि घरी त्यांचा मुलगा, राहुल, “यू कॅन प्ले”, असे सतत मनावर बिंबवत राहिले. त्यांचा अंगठा काही वेळात सुजायचा, खूप वेदना होत, अगदी डोळ्यांत पाणी येईपर्यंत. पण ते थोडे सहन कर, यू कॅन प्ले असेच सतत म्हणत राहिले. घरी आल्यावर मुलगाही, ‘या वेदना तात्पुरत्या आहेत, काही काळाने तुझा अंगठा, हात तयार होईल, खेळत रहा’, असेच म्हणायचा. या तिघांच्या उत्तेजनेमुळे त्या प्रयत्न करायच्या. हा सिलसिला ३ वर्षे चालला. त्यांत २०२२ मध्ये मलेशिया येथे आंतरराष्ट्रीय कॅरम वर्ल्ड चॅम्पिअनशिप आयोजित केली गेली. एसीएसने सिंगापूरतर्फे सहभाग घेतला (१६ खेळाडू) आणि नीलाजींना तिथे अम्पायर म्हणून बोलावले गेले. २८ देशांच्या टॉपर्ससाठी अंपायर म्हणून एक आव्हानच ! पण त्यांनी ते एन्जॉय केले आणि तेथेच इंटरनॅशनल रेफ्रीसाठी परीक्षा दिली. ४ प्रकारात होणाऱ्या या परीक्षेत त्या पहिल्या आल्या.

परत आल्यावर – नीलाजी २०२३ मध्ये परत आल्यावर नॅशनल रैंकिंगच्या स्पर्धेसाठी चीफ रेफ्री होत्या. खेळण्याचे वैयक्तिक प्रयत्न सुरूच होते. पूर्वीचे नैपुण्य नाही पण मग २०२४ मध्ये नॅशनल रैंकिंगमध्ये सहभाग घेतला. त्यात मालदीव येथे झालेल्या आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली. ही संधी त्याचवेळी त्या भारतात गेल्यामुळे नाही स्वीकारता आली पण त्यांनतर अमेरिका येथे सहाव्या कॅरम विश्वचषक स्पर्धेसाठी पुन्हां निवड होऊन त्या टीमबरोबर गेल्या. खूप चांगले अनुभव मिळाले आणि नुकतीच मे महिन्यात झालेल्या एसीएस नॅशनल स्पर्धेत भाग घेऊन २०२५ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांची निवड झाली आहे. आठवड्यातून दोन दिवस एके ठिकाणी नवीन मुलांना मार्गदर्शन करण्यासाठीही त्या जातात.

नीलाजी सिंगापूर महाराष्ट्र मंडळाच्या द्वैमासिकात लिहितात आणि मंडळातील सर्व साहित्यप्रेमी जमून दर महिन्याला कविता सादर करतात. त्यामुळे कितीही व्यस्त असले तरी कविता लिहिल्या गेल्या, असे त्या आवर्जून सांगतात. या मंडळाच्या सर्व उपक्रमांत स्वयंसेवक म्हणून सक्रिय सहभाग घेतातच पण गणपती उत्सवात एकपात्री अभिनयात भाग घेऊन अभिनयाची हौस आणि गणपतीला निरोप देतेसमयी दीड-दोन तास लेझीम खेळून तीही हौस भागवून घेतात.

नीलार्जीच्या आईवडिलांचे देशावर अफाट प्रेम होते. त्यामुळे त्यांनी ना नफा ना तोटा या तत्त्वावर बहुसंख्य लोकांना भारतदर्शन घडविले. अशी समाजसेवा त्या करू शकत नाहीत पण त्यांच्यामुळे लहानपणापासून त्यांना प्रवास खूप आवडू लागला. त्यामुळे त्या वर्षातून एक-दोन सहली एकटीनेच करतात. विविध अनुभव घेत, विविध जीवनपद्धती अनुभवत लोकांना जाणून घेत भ्रमण करतात. अर्थात यासाठी अचानक उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड देऊन त्यातून बाहेर पडण्याची मनाची तयारी असते.

नीलाजी कथा, कविता, नाटुकलं, अलक, ललितलेखन, प्रवासवर्णन नियमितपणे लिहीत असतात. विशेष म्हणजे पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या अद्वितीय व्यक्तींचे ऋण म्हणून, त्यांचे कार्य सर्वांना समजावे म्हणून त्या आपल्या न्यूज स्टोरी टुडे या प्रख्यात पोर्टलवर त्यांची साप्ताहिक लेखमाला सुरू आहे. न्यूज स्टोरी टुडे हे एक उत्कृष्ट व्यासपीठ असून त्यात संधी दिल्याबद्दल त्या आम्हां दोघांचेही ऋण व्यक्त करतात. आम्ही आता त्यांचे कुटुंबमित्र झालो आहोत.

आम्हाला भेटण्यासाठी नीलाजी आवर्जून घरी आल्या होत्या…

नीलाजी व्हिडीओद्वारे कविता सादरीकरण, स्वलिखित आणि इतरांच्या कथा, लेख आदींचे अभिवाचन करतात. ऑनलाइन उपक्रमांना परीक्षक म्हणूनही असतात. त्यांना बागकामाची आवड असून त्यांनी सुमारे ६० झाडे बाल्कनी व लिफ्टच्या बाजूच्या जागेत लावली आहेत. तसेच एका ग्रुपला त्या मार्गदर्शनही करतात.

सिंगापूरमध्ये भारतीय सण साजरे करताना त्या शेजाऱ्यांना त्या सणांमागील वैज्ञानिक दृष्टिकोन सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी काढलेल्या रांगोळ्या इमारतीतील लोक आवर्जून बघतात. त्यांची सून सिंगापूर येथील असल्याने, त्यांच्या पद्धती, परंपरा, सण समजावून घेऊन त्यांच्यात सामावून गेल्या आहेत. यांच्याकडे दिवाळीसाठी ज्या माळा लागतात, त्या ख्रिसमस, न्यू इयर, चायनीज न्यू इयर साजरे करीत गुढीपाडव्यापर्यंत लखलखत असतात. सुनेचे माहेर खूप मनमिळावू आहे, त्यांच्या आणि आपल्या संस्कृतीची देवाणघेवाण होत असते. त्यामुळे इथेही स्नेहबंध जुळले. दोन्ही परिवार अनेक ठिकाणी एकत्र जातात, विविध ठिकाणी एकत्र भ्रमण करीत असतात.

प्राण्यांच्या हितरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रोटेक्शन ऑफ ॲनिमल्स वेल्फेअर सोसायटी या संघटनेबरोबर त्या पहिल्या दिवसापासून काम करीत आहेत. ठाण्याला असताना त्यांचे व्हॅक्सिनेशन, निर्बिजीकरण अशा उपक्रमांमध्ये भाग घेत जखमी पक्ष्यांना कसे हाताळायचे, उपचार करायचे याचे प्रशिक्षणही त्यांनी घेतले, त्याचा उपयोग गोवा येथे झाला. आताही त्या या संस्थेबरोबर आहेत. तसेच सोहम ट्रस्टच्या डॉक्टर्स फॉर बेगर्स या स्वयंसेवी संस्थेमध्येही त्या सहभाग घेत असतात.

अनेक ऑनलाइन कार्यक्रमांचे नीलाजींनी यशस्वी आयोजन केले आहे. आळंदी येथील फुलोरा साहित्य संमेलनात त्या प्रमुख अतिथी होत्या. भारतीय स्त्रीशक्ती, ठाणेतर्फे आयोजित स्वलिखित कथाकथन स्पर्धेत तर ‘आभाळाखालची शाळा’तर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय कला महोत्सवमध्ये नाट्य विभागात तसेच शॉपीझन आयोजित कथास्पर्धेत त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
अशा या नीलाजीना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. झुंजार व्यक्तिमत्त्वाच्या नीला बर्वे,
    देवेंद्रजी आणि अलकाताई यांच्या समावेत पाहून आनंद वाटला. परिस्थितीने अडचणी आणून नकार मिळत असताना आज त्या ज्या उच्च स्थानावर जीवनानंद घेत आहेत. आपल्याला पुढील जीवनातील आनंद मिळत राहो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments