प्रा.विसुभाऊ बापट
देशविदेशातील उच्च पदस्थ, विविध पदाधिकारी, शासकीय अधिकारी, पत्रकार यांच्याशी माहिती खात्याचा प्रसंगपरत्वे संबंध येतच असतो. तसाच तो समाजातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींशीही येत असतो.
तर आज वाचू या, गेली ४० वर्षे अखंडपणे “कुटुंब रंगलंय काव्यात” हा बहारदार कार्यक्रम सादर करणारे थोर कलाकार प्रा. विसुभाऊ बापट यांच्या माहिती खात्याविषयीच्या आठवणी…..
नागपूर पत्रिका व नागपूर टाईम्सचे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मित्र सुरेश देशपांडे यांच्या आग्रहाखातर आलेले जिल्हा माहिती अधिकारी महाजन साहेब आणि त्यांचे सहाय्यक अधिकारी चंद्रकांत क्षिरसागर “सन्मित्र मंडळाने” आयोजित केलेल्या ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या माझ्या एकपात्री कार्यक्रमावर बेहद्द खूष झाले आणि त्यांची माझ्याशी घट्ट मैत्री झाली.
१९८३ मध्ये झालेल्या चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा पत्रकार संघातील माझ्या एकपात्री कार्यक्रमाला दोघेही अधिकारी जातीने हजर होते. त्यांनीच टेलिप्रिंटरवरून ‘यूएनआय, पीटीआयला’ माझ्या कार्यक्रमाच्या बातम्या पाठवल्या आणि त्याद्वारे मी महाराष्ट्रातील सर्वच वर्तमान पत्रांपर्यंत पोहोचलो.
पत्रकार संघातील कार्यक्रमानंतर झालेल्या चर्चेत “मला जिल्ह्यातील सर्व आदिवासी आश्रमशाळां मधील विद्यार्थी व शिक्षकांना माझा ‘ओंकार काव्य दर्शन’ हा शालेय कार्यक्रम विनामूल्य सादर करायची माझी इच्छा असल्याचे” मित्र सुरेशने सांगितले. तेंव्हा महाजन साहेब सर्वांना उद्देशून म्हणाले, “आपला जिल्हा आदिवासी जिल्हा आहेच शिवाय येथे नक्षलवादी कारवाया सुद्धा सातत्याने होत असतात. विसुभाऊ पूर्वी कोल्हापुरच्या दैनिक सत्यवादीत ८ वर्षे सहसंपादक पदावर काम करीत होते. म्हणूनच विसुभाऊंना आपल्या पत्रकार संघाचे सदस्य करून घ्या. एखाद्या साप्ताहिकाचे पत्रकार म्हणून त्यांना
कार्ड द्या आणि नंतरच त्यांना आदिवासी आश्रमशाळांमध्ये कार्यक्रम करायला जावू द्या.”
ही गोष्ट सुरेशने मनावर घेतली. पांढरीपांडे यांच्या साप्ताहिकाचे कार्ड त्याने मला मिळवून दिलेच शिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आदिवासी आश्रमशाळांमधील माझ्या शालेय कार्यक्रमांसाठी तो माझी सावली बनून माझ्याबरोबर राहिला म्हणूनच तेथील ३६ आदिवासी आश्रमशाळांमधील कार्यक्रम मी यशस्वी करू शकलो.
एक दिवस सुरेश आणि मी महाजन साहेबांना भेटायला त्यांच्या कार्यालयात गेलो तेव्हा त्यांची बदली झाल्याचे कळाले. त्यांच्या जागेवर जिल्हा माहिती अधिकारी म्हणून आलेल्या श्री. अविनाश सोनवणे आणि श्री क्षीरसागर यांच्या जागी आलेल्या श्री. रत्नम गोठले यांच्याशी माझा परिचय झाला. ते दोघेही सुरेशचे चांगले मित्र होते. हरबिंदरसिंग वधावन यांच्या साप्ताहिकात काम करीत असताना सुरेशची व त्यांची मैत्री झाली होती. त्याच्याचमुळे सोनावणे व गोठले साहेब यांच्या बरोबर माझी मैत्री झाली.
महाजन साहेबांच्या बदलीनंतर बरेच दिवस त्यांच्याशी संपर्क झाला नाही. पुढे मी मुंबईत स्थिर झाल्यानंतर एक दिवस सुरेश माझ्याकडे आला आणि मला मंत्रालयात घेऊन गेला. तेव्हा महाजन साहेब मंत्रालयात माहिती संचालक पदाचा कार्यभार सांभाळत होते. त्यांच्या अनेक सहकारी अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी माझा परिचय करून दिला व माझ्या कार्यक्रमांबद्दल चांगली माहिती सांगितली. या सर्वच माहिती अधिकाऱ्यांनी माझ्या कार्यक्रमांसाठी सहकार्य केले, हे विशेष !
यथावकाश महाजन साहेब माहिती संचालक पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर मात्र आमची भेट झाली नाही. एकदम त्यांना देवाज्ञा झाल्याचेच समजले. माझ्यावर, मराठी कवितांवर, आणि माझ्या कार्यक्रमांवर नितांत प्रेम करणाऱ्या महाजन साहेबांना विनम्र अभिवादन.!

– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट, मुंबई
(सादरकर्ते – कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
माहितीतील आठवणी वाचनीय.चाळीस वर्ष. कुटुंब रंगलय् काव्यात या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषेतील उत्तमोत्तम
कवितांचा प्रसार करणारे विसुभाऊ खूपच आदरणीय..तळागाळात त्यांनी सुंदर कविता पोहचवल्या. काव्याची गोडी लावली.हे खूप महान आहे…