नमस्कार, मंडळी.
“माहिती”तील आठवणी” या सदरात आपण यापूर्वी माहिती खात्यात प्रत्यक्ष नोकरी केलेल्यांच्या आठवणी वाचल्या. आज मात्र, पूर्वी स्ट्रिंजर राहिलेले आणि आताचे जेष्ठ पत्रकार, लेखक नागपूर येथील श्री अविनाश पाठक यांच्या आठवणी वाचू या…
– संपादक
महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क खात्याशी माझा सर्वप्रथम संबंध 1976 साली आला. त्यावेळी मी जेमतेम 21 वर्षाचा होतो. शिक्षण आटोपून मी नागपुरात फोटोग्रॉफीचा स्टुडिओ सुरु केला होता आणि वडिलांजवळ असलेल्या एका 16 एमएम मुव्ही कॅमेर्यावर एक दोनदा गंमत म्हणून फिल्म शुटिंग करून पाहिले होते.
अचानक एक दिवस मुंबई दूरदर्शनसाठी यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर परसोपंत या गावी जाऊन वृत्तचित्रण करण्याची संधी चालून आली. ज्या कार्यक्रमाचे वृत्तचित्रण करायचे तो राज्य शासनाच्या मंत्र्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे यवतमाळहून कार्यक्रमस्थळी नेण्याची व्यवस्था माहिती खात्याच्या अंतर्गत असलेले जिल्हा माहिती अधिकारी करायचे. त्यावेळी यवतमाळला प्रभाकर शांडिल्य हे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होते. ठरल्याप्रमाणे मी यवतमाळला पोहोचलो. तिथून शांडिल्यांनी शासकीय वाहनाने मला नेर परसोपंतला नेले. तिथे तत्कालिन राज्यमंत्री अली हसन ममदानी यांची पदयात्रा सुरू होणार होती. त्या पदयात्रेचे चित्रीकरण करुन मी दूरदर्शनला पाठवले. ते प्रसारीतही झाले.
माहिती आणि जनसंपर्क खात्यातील एखाद्या अधिकार्याशी माझा हा पहिलाच संपर्क होता. योगायोगाने पुढल्या चार महिन्यातच दूरदर्शनसाठी नियमित स्तरावर कंत्राटी पद्धतीचा वृत्तछायाचित्रकार म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. तेव्हापासून सतत माहिती खात्याशी संबंध येणे सुरु झाले. तो संबंध आजतागायत कायम राहिलेला आहे.
1990 नंतर मी दूरदर्शनचे काम बंद केले. त्यानंतर मी पूर्णवेळ मुद्रित माध्यमांचा पत्रकार म्हणून कार्यरत झालो. त्यामुळे सांधा बदलला तरी माहिती खात्याशी संबंध कायम राहिले. सुरुवातीच्या काळात हे खाते प्रसिद्धी खाते म्हणून ओळखले जायचे. 1974-75 च्या दरम्यान या खात्याचे नव्याने बारसे होऊन हे खाते माहिती आणि जनसंपर्क संचालनालय म्हणून ओळखले जाऊ लागले. आधीचा जिल्हा प्रसिद्धी अधिकारी हा जिल्हा माहिती अधिकारी बनला. तर विभागीय प्रसिद्धी अधिकारी हा सहायक संचालक, माहिती व जनसंपर्क म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे जाऊन सहायक संचालकाचा विभागीय उपसंचालक म्हणून बदल झाला.
मी काम सुरु केले. त्या काळात नागपूरला बबनराव हुद्दार नावाचे विभागीय माहिती वरिष्ठ सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्यानंतर राम पाथरकर, प्रभाकर भुसारी, मिरजगावकर, चंद्रकांत व्याघ्र असे अनेक सहाय्यक संचालक, उपसंचालक कार्यरत राहिले. 1998 पासून नागपुरात उपसंचालकाचे पद पदोन्नत होऊन पूर्ण विदर्भासाठी “माहिती संचालक” हे पद तयार झाले.
नागपूरचे पहिले माहिती संचालक शरद चौधरी हे होते. त्यांच्यानंतर सुरेश फडणवीस, भि.म. कौसल हे संचालक झाले. आता हेमराज बागूल आहेत.
माझ्या पत्रकारितेच्या जवळजवळ 47 वर्षांच्या कालखंडात फक्त नागपुरातल्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक माहिती अधिकार्यांशी माझे संबंध आले. त्यात वयोवृद्ध असलेले श्रीपाद सहस्त्रभोजने हे सध्या नागपूर मुक्कामी आहेत. त्यांचा माझा आजही नियमित संपर्क आहे. श्रीपाद सहस्त्रभोजने हे नागपुरात जिल्हा प्रसिद्धी अधिकारी म्हणून पहिले नियुक्त झाले. नंतर ते वाढत वाढत महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य संचालक, माहिती जनसंपर्क म्हणून निवृत्त झाले.
माहिती खात्यातल्या विविध पदांवर कार्यरत राहिलेल्या श्रीपाद सहस्त्रभोजनें यांना महाराष्ट्राच्या वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, बॅ. अंतुले आणि बाबासाहेब भोसले या चार मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
सर्व पत्रकारांचे चांगले मित्र असलेले श्रीपाद सहस्त्रभोजने हे एक तडफदार पण तितकेच संवेदनशील अधिकारी म्हणून ओळखले जात होते. ते मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी असताना मुख्यमंत्र्यांचा विदर्भात दौरा असला की मला त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या दौर्यात ते घेऊन जायचे. नंतर ते संचालक म्हणून कार्यरत असतानाही अनेकदा त्यांचा माझा संपर्क यायचा. निवृत्तीनंतर ते नागपुरातच स्थाईक झाले आहेत. सध्या त्यांचा माझा नियमित संपर्क असतो.
असे अनेक अधिकारी संपर्कात आले आहेत. प्रभाकर शांडिल्य यांच्यानंतर प्रभाकर गोसावी, चंद्रकांत व्याघ्र, चंद्रकांत क्षीरसागर, सुधाकर धारव, बळवंत घुसे, नरेश मेश्राम, अशी कितीतरी नावे सांगता येतील. या अनेकांशी आजही नियमित संपर्क आहे. त्यांच्या असंख्य आठवणी आहेत. या आठवणी यथावकाश वाचकांशी मी शेअर करीनच.

– लेखन : अविनाश पाठक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
You must be having lot of memories.Req to share as it will serve as guide to new generation.