‘जर्नालिझम‘ म्हणजे काय हे ही सर्वसाधारण लोकांना समजत नव्हते, त्या काळात म्हणजे १९७० – ७१ च्या सुमारास नागपूर विद्यापीठाने ‘बॅचलर ऑफ जर्नालिझम’ चा डिग्री कोर्स काढला. शिक्षणाचे माध्यम अर्थातच इंग्रजी होते.
हा एक वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स होता. नागपूर विद्यापिठाच्या ग्रंथालयात वर्ग होत असत. सकाळी सात ते साडे दहा पर्यंत वर्ग चालत. त्यामुळे नोकरी करून शिकणाऱ्यांची चांगली सोय झाली. पहिल्या बँचला माहिती व जनसंपर्क, पत्र सूचना कार्यालय, आकाशवाणी आणि स्थानिक वृत्तपत्रातील वार्ताहर अशा चाळीस विद्यार्थ्यांचा वर्ग होता. त्यात दहा मुली होत्या. हेड ऑफ द डिपार्टमेंट होते, एस.टी.पुराणिक. इतर व्याख्यांत्यात अनंत गोपाळ शेवडे (नागपूर टाइम्स) मा. गो.वैद्य (तरुण भारत) जी.टी. परांडे (हितवाद) यांचा समावेश होता. शासकीय मुद्रणालयाचे अधिक्षक हॅरीस अल्वा एक तास घेत असत. तो हँड कंम्पोजिंग चा जमाना होता.
विद्यार्थ्यात नागपूरच्या माहिती खात्यातील वसंत चौधरी (माजी संचालक, मुंबई) राम घुगुसकर, ब.ल.घुसे यांना प्रवेश मिळाला. प्रवेशासाठी ‘अँपटीट्युड टेस्ट’ घेण्यात येत असे. त्याच वर्गात भारती गोखले (मुंबई आकाशवाणीच्या माजी संचालक) पण होत्या. परीक्षा झाल्यावर वसंत चौधरींना नागपूर टाइम्स चे गोल्ड मेडल मिळाले. घुसे व घुगुसकर पहिल्या पाच मध्ये, मेरिटमध्ये पास झाले.
१९७१ – ७२ च्या सत्रात मी व भगतराम कौशल अशा दोघांना जर्नालिझम ला प्रवेश मिळाला. आमच्या वर्गात सात आठ विद्यार्थीनी होत्या. त्यात शीला धनवटे, सुषमा मुळे (आकाशवाणी, मुंबई) इला पारसनीस, कुमारी थिऑपीलीस इत्यादींचा समावेश होता. वर्गात सुरेश देशपांडे पत्र सूचना कार्यालय, एलआयसीचे शिंगने, नागपूर टाईम्सचे विजय लापालीकर, नवभारत (हिन्दी) चे किशोर तिवारी, असित सिन्हा, तरुण भारतचे दिलीप देवधर होते. त्यात सर्व जण सरकारी, निमसरकारी कार्यालयातील अधिकारी असल्यामुळे वर्गात नियमीत हजर रहाता येत नसे. वार्षिक परिक्षा झाल्यावर कळले की, अनुपस्थितीमुळे आमचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे !
त्यानंतर माझी बदली जिल्हा माहिती अधिकारी (वर्ग २) चंद्रपूरला झाली. तेथेच कळले की बहुतेक विद्यार्थी सेकंड क्लास मध्ये पास झाले. वृत्तपत्रात काम करणाऱ्या एकाला त्यावेळी गोल्ड मेडल मिळाले.
जर्नालिझमला आता आपण पत्रकारिता म्हणतो. पण हा शब्द योग्य वाटत नाही. जर्नालिस्ट हा खूप मानाचा अन कर्तृत्वाचा शब्द आहे. त्या काळात तर जर्नालिस्ट त्यांची नावे गुप्त ठेवून वृत्तपत्रात लिखाण करीत असत. प्रेस कॉन्फरन्स क्वचितच होत असे. कारण संपूर्ण व्यवस्थेला जर्नालिस्टची भिती वाटत असे. आपल्या संस्थेच्या किंवा अधिकाऱ्यांच्या विरोधात काय उत्तर द्यावे असा प्रश्न होता. म्हणून बहुतेक सरकारी अधिकारी जिल्हा माहिती कार्यालय तर्फेच आपापल्या विभागाची माहिती देत. पत्रकारांनी प्रसिद्ध केलेल्या आक्षेपार्ह बातमीवर खुलास करण्याची तरतूद होती आणि वृत्तपत्रे खुलासा जसाच्या तसा अधिकाऱ्याच्या नावासह प्रसिद्ध करीत असत. विशेषतः इंग्रजी फारच प्रामाणिक होते. “काँट्राडिकशन” हा पॉवर फुल शब्द होता.
परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. आता पत्रकारितेच्या व्यवस्थेत आमूलाग्र बदल झाला आहे. माध्यमे चोविस तास बातम्या देत असतात. त्या काळात चार ओळीची बातमी जर टाईम्स ऑफ़ इंडिया मध्ये आली तर संचालक स्वतः त्या अधिकाऱ्याचे अभिनंदन करीत असत. विशेषतः विनोद राव संचालक असताना आपल्या खात्याचा ‘सुवर्णकाळ’ होता. हा कालावधी मुख्य संचालक एस.जी. सहस्यभोजनी पर्यंत चालू होता. आज त्यांचे वय ९६/९७ वर्षाचे असावे. ते नागपूरला दिनदयाळ नगर मध्ये रहातात. जुने अधिकारी भेटले की त्यांना प्रसन्न वाटते. ते म्हणतात “जर्नालिस्ट इज बॉर्न अँड नॉट मेड”

– लेखन : सुधाकर धारव
निवृत्त माहिती उपसंचालक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
व्वा सर अप्रतिम आठवणी. घुगुसकर साहेब तेव्हा 17 व्या मजल्यावर यायचे तेव्हा आस्थापना अधीक्षक पद्माकर आक्रे साहेबांपुढे मागे हात ठेवून नेहमी म्हणायचे की माझे भांडण तत्त्वासाठी आहे. हे धर्मयुद्ध आहे. वसंत चौधरी साहेबांच्या हाताखाली पण काम करण्याची संधी मिळाली.