‘चौकांचा इतिहास’
प्रत्येक शहराच्या इतिहासात त्या शहरातील चौकांचे महत्व अनन्यसाधारण असते. प्रत्येक चौकातून आणि त्या चौकाच्या नावावरून त्या त्या शहराचा इतिहास, भूगोल, संस्कृती, समाजजीवन व लोकपरंपरा यांची स्पंदने अभिव्यक्त होत असतात. या दृष्टीने विचार करता, नाशिक शहरातील “चौकांचा इतिहास” हे माझे मित्र श्री मधुकरराव झेंडे यांनी लिहिलेले अभ्यासपूर्ण पुस्तक हा महाराष्ट्र राज्यातील शहरांच्या चौकांच्या बाबतीत झालेला बहुधा पहिलाच प्रयत्न असावा.
नाशिक महानगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी असताना, नाशिक च्या अंतरंगाशी जवळून संबंध आलेले श्री मधुकरराव झेंडे यांचे “चौकांचा इतिहास” हे नाशिक शहरातील चौकांसंबंधीचा समग्र इतिहास असलेले, २०१८ मध्ये दुसरी आवृत्ती निघालेले पुस्तक एखाद्या पोथी टाईप आकाराचे पण विविध रेखाचित्रांनी सजलेले, अतिशय आकर्षक, सौंदर्यपूर्ण पुस्तक खूपच वाचनीय, मनोरंजक आणि स्फूर्तिदायी आहे.
नाशिक शहराचा चालताबोलता ज्ञानकोष म्हणून ख्यातनाम असलेले मधुकर झेंडे यांनी नाशिक शहरातील चौकांच्या या पुस्तकात इतिहास, भुगोल,
संस्कृती, सामाजिक, सांस्कृतिक परंपरा, लोकपरंपरा, कला, महान व्यक्तीमत्वाचा अत्यंत ओघवत्या शैलीत रसाळपणे परिचय करून दिला आहे.
आपल्या शहरातील चौकांची स्पंदने अत्यंत संवेदनशीलतेने टिपून त्यांचा इतिहास एका ऐतिहासिक
दस्तावेजच्या स्वरुपात आकर्षकपणे मांडला आहे.
ब्रिटिशांनी१८८३ मध्ये तयार केलेल्या नाशिकच्या हवामान, जमीन, पाऊस, पिके, लोकजीवन, चालीरीती, यांची सविस्तर माहिती असलेलं ‘नाशिक गँझेटियर’ ब्रिटीशांच्या संशोधन व अभ्यासूव्रुत्तीची साक्ष देते. त्याप्रमाणेच शहराच्या चौकांची माहिती ८६ वर्षाचे अजातशत्रू असलेले झेंडे यांच्या तल्लख स्मरणशक्तीची, कुशाग्र बुध्दीमत्तेची, अभ्यासू व्रुत्तीची आणि अफाट लोकसंग्रहाची हे पुस्तक म्हणजे ऐतिहासिक दस्तावेजाची गाथाच आहे. नाशिकचे दुसरे ग्याझेटियर म्हणून ह्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती वर्षदीड वर्षात काढावी लागली आहे ही या पुस्तकाच्या यशाची पावतीच आहे
नाशिकच्या भूतकाळाची गौरवशाली परंपरा गाथा मधुकररावांच्या ओघवत्या, तरलशैलीमुळे नक्कीच स्फूर्तिदायक आहे.
खरं म्हणजे हे पुस्तक केवळ चौकांचा इतिहास च सांगत नाही तर त्या निमित्ताने नाशिक शहराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक इतिहासाचा विस्तृत ग्रंथरुपाने अवतीर्ण झालेला दुर्मिळ ठेवाच आहे.
साडे चारशे वर्षांच्या परंपरेचा पाटीलवाडा चौकापासून तर स्वातंत्र्य लढ्याचे अग्निकुंड पेलणाऱ्यांचा चौकापर्यंत ४४ चौकांचा, त्यांतील उत्तुंग व्यक्तीमत्वांचा, उद्योग व्यापारासह संपूर्ण इतिहास, भूगोल, भौतिक आणि सांस्कृतिक परंपरेचा रसाळपणे केलेला मागोवा आहे.
अगदी शेवटी मधुकरराव झेंडे यांनी आपल्या भावपूर्ण शैलीत लिहिलेलेलं मला अधिक आवडलं ते जसच्या तसे…”कित्ती कित्ती दडलंय या चौकाच्या इतिहासात.. किती उत्तुंग व्यक्तिमत्वे इथे वावरली, त्याचा पदस्पर्श झाला ही माती, त्याच गतगोष्टींना चिकटून आहे. म्हणून तर हा चौकांचा इतिहास जिवंत आहे.. माणसं बदलली, घरंही बदलली, जीर्ण वाडे अस्तंगत होताहेत..उंच इमारती उगवताहेत पण आठवणी आणि त्यांची कर्तृत्वगाथा आजही तिथेच त्या मातीला चिकटून आहे… हा इतिहास- हा शब्दांचा नक्षीदार प्रवास- माझा, माझ्या मनातला,माझ्यानंतर भावी पिढीला.. पूर्वजांच्या आठवणींसह–साठवण”…
..याजसाठी केला हा लेखनप्रपंच”!
या पुस्तकातला प्रत्येक चौक मधुकर झेंडे यांच्या मनात भरभरून राहिला आहे. हे संचित नव्या पिढीने जरूर डोळ्याखालून घालावं ..वाचावं इतकीच अपेक्षा…!

,- परीक्षण : सुधाकर तोरणे
निवृत्त माहिती संचालक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800