‘ताई, मी कलेक्टर व्हयनू‘
शून्यातून विशाल अवकाशाकडे झेप घेणारा संघर्षमय प्रवास ‘ताई मी कलेक्टर व्हयनू‘ या आत्मकथनातून राजेश पाटील यांनी रेखित केला आहे. या पुस्तकाची सातवी आवृत्ती बरीच उशिरा माझ्या हाती पाचसहा वर्षानंतर आली. हे पुस्तक एका बैठकीत वाचून काढले
राजेश पाटील हा जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पद्मालय डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ‘ताडे’या लहानशा गावच्या कर्जबाजारी शेतकऱ्याच्या कुटुंबातील तरुण आहे. आई वडील शेतातील मजुरीवर
तीन मुली व एक मुलगा, राजेश यांना घेऊन कसाबसा संसार चालवत आहे. आई वडिलांना प्राथमिक शिक्षण घेत हातभार लागावा म्हणून शेतमजूरीचे मिळेल ते काम करणारा, अगदी सकाळी पाव विकणारा, भाजीपाला विकणारा, हा तरुण आहे. इतकेच नव्हे तर विहिरी खोदण्यापासुन ट्रँक्टरवर मजुरी करून त्याने शिक्षण घेतले आहे.
मुळात गावातील उनाडक्या करणाऱ्या मुलगा म्हणून त्याची ख्यातीआहे. आई वडिलापर्यंत त्याच्याविषयी गावातील अनेक पालकांच्या तक्रारी आहेत. पण माध्यमिक शिक्षण घेतांना आत्मचिंतन करून राजेशने या खोडकर पणाचा त्याग केला. धुळे, नाशिक येथे संघर्ष मय स्थितीत बी.एस्सी संख्याशास्त्र पदवी प्रथम श्रेणीत मिळविल्यानंतर एम.एस्सी साठी पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला आणि विद्यापीठात पहिल्या क्रमांकाने यश संपादन केले. या अगोदर एन डी ए ची परीक्षा देऊन त्यातही उज्वल यश मिळवून वायुदलात अधिकारी म्हणून निवड करण्यात आली. परंतु आपणास आय. ए. एस व्हायचे असल्याने तेथे राजीनामा देऊन मोकळा झाला. पुढे तो भारतीय स्तरावरील ISS ची परीक्षा व मुलाखतीत यशस्वी झाला आणि नवीदिल्लीत संख्याशास्त्र विभागात उच्च अधिकारी म्हणून नियुक्त झाला.
दिल्लीत सरकारी उत्तम निवासस्थान मिळाले. तीन चार वर्षे ही नोकरी केली तरीही आय.ए.एस होण्याची मनापासून ची इच्छाशक्ती स्वस्थ बसू देईना. आय.ए.एस परीक्षा दिली पण अपयशी झाला. काही काळानंतर पुन्हा ही परीक्षा दिली अन् उत्तीर्ण झाला. असा संपूर्ण शैक्षणिक प्रवास राजेशने अत्यंत चिकाटीने पूर्ण केला.
राजेशचा हा जीवनप्रवास आयुष्यातल्या कुठच्याही कठीण वळणावर असणाऱ्या तरूणांना उमेद वाटावी असाच आहे. प्रचंड इच्छाशक्ती आणि तितकीच अडचणीवर मात करून आपले ध्येय गाठण्यासाठी केलेली मेहनत, जे आपल्याकडे नाही ते मिळवण्याचा ध्यास आणि त्यासाठीची धडपड आणि मग सगळ्याच प्रकारचा संघर्ष पार करून संपादन केलेले यश हे आत्मकथन राजेशने ओघवत्या भाषेत चित्रीत केले आहे. लेखकाचा हा संघर्ष शून्यातून अवकाशाकडे झेपावणाऱ्या तरूणांना निश्चितच प्रेरणादायक ठरेल. खरे तर हे पुस्तक आजच्या विद्यार्थ्यांना एक दीपस्तंभच आहे.
‘ताई मी कलेक्टर व्हयनू’ यापुस्तकातील ‘ताई’ म्हणजे ‘आई’. या पुस्तकाला प्रस्तावना पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांनी लिहिली आहे. त्यात म्हटले आहे की “राजेश हा या आत्मकथनाचा नायक असला तरी तो असंख्य अभावग्रस्त तरुणांच्या समूहाचा प्रतिनिधी म्हणून समोर येतो. सामान्य वाटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक अंगभूत गुणवत्ता असते. त्या गुणवत्तेचा शोध घेऊन अथकपणे वाटचाल केली तर कर्तृत्वाची शिखरे साद घालतात. आव्हानांना सामोरे जाऊन आपली मुद्रा उमटवता येते हे वास्तव या आत्मकथनातून अधोरेखित झाले आहे.”
केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे तर इतरांनी देखील “ताई मी कलेक्टर व्हयनू” पुस्तक वाचलेच पाहिजे.

– परीक्षण : सुधाकर तोरणे. नासिक.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
पुस्तक खरा मित्र आहे यादृष्टीने केलेले चांगल्या
पुस्तकाचे सुरेख परिक्षण.
सुंदर पुस्तकाचे अतिशय समर्पक असे परिक्षण व विवेचन श्री तोरणे सरांनी केलेलें आहे.
अभिनंदन तोरणे सर.