दहावी बारावी चे निकाल लागून गेले आहेत. मुलांनी कुठे प्रवेश घ्यायचा हे पालकच ठरवीत आहेत. खरं म्हणजे, मुलांची आवड ओळखून त्यांना करिअर निवडू देणे आवश्यक आहे. या विषयीचे विचार व्यक्त करीत आहेत, श्री किरण दशमुखे. बी एस सी, बी एड (गणित) एम ए (मराठी) एम फिल (शिषणशास्त्र) डी एस एम इतक्या पदव्या संपादन केलेले दशमुखे सर गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून त्यांची गणित आणि अन्य विषयांवरील पुस्तके प्रसिद्ध आहेत. ते वृत्तपत्रातून सातत्याने लेखन करीत असतात. विविध साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. न्यूज स्टोरी टुडे परिवारात दशमुखे सरांचे हार्दिक स्वागत आहे.
— संपादक
स्वातंत्र्योत्तर काळापासून भारतात विविध टप्प्यांवर शिक्षणामध्ये अमूलाग्र बदल घडून यावा, यासाठी विविध आयोग नेमण्यात आले.
सर्वप्रथम १९४८ मध्ये राधाकृष्ण आयोग, १९५२ मध्ये मुदलीयार आयोग, १९६२ मध्ये डॉ. लक्ष्मण शास्त्री कोठारी आयोग आणि १९८६ चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि आता २०२३ चे डॉ.कस्तुरीरंगन समितीचे नवीन शैक्षणिक धोरण. या सर्व आयोगांनी त्या त्या काळाची मागणी विचारात घेता काही सूचना व बदल सुचविले आहेत. यामुळे कोणता आयोग चांगला- वाईट असे म्हणता येत नाही. त्या त्या काळाची गरज ओळखून उपाय व बदल सुचलेले आहेत.
मुळात शिक्षण क्षेत्र हे प्रवाही आहे; त्यामुळे या क्षेत्रात सतत बदल होत राहणे साहजिकच आहे. या बदलाचे आपण सर्वांनी काळानुसार स्वागतच केले पाहिजे. जवळपास सर्वात शिक्षण तज्ञांनी आणि वेळोवेळी नेमण्यात आलेल्या आयोगाने शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावी यावर भर दिलेला आहे. कोठारी आयोगाने त्रिभाषा सूत्र सांगितले आहे. स्वभाषेबरोबर इतर दोन भाषा शिकाव्यात हे नमूद केले आहे, मात्र ज्ञानभाषा मातृभाषा असावी यावर भर देण्यात आला आहे.
मात्र याकडे कोणीही फारसे लक्ष दिले नाही. पालक, शिक्षक, शिक्षणतज्ञ याबाबत गप्पच होते.यामुळे मागील दोन दशकांमध्ये इंग्रजी माध्यमाचे भरमसाठ पेव फुटले. इंग्रजी जगाची भाषा आहे. ती ज्ञानभाषा आहे. इंग्रजी बोलताच आलेच पाहिजे. त्याशिवाय शिक्षण कूचकामी ठरते. असा गैरसमज सर्वत्र पसरवण्यात काही व्यवस्था यशस्वी ठरल्या. यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळा खेड्यापाड्यापर्यंत पोहोचल्या. समाजातल्या सामान्य कुटुंबातील मुलाला इंग्रजी शिक्षण मिळू लागले.
इंग्रजी वाघिणीचे दूध आहे असे म्हणताना, प्रश्न पडतो यातील किती मुलांना या शिक्षणाने जीवन जगायला शिकवले ? स्वतःच्या पायावर उभे केले ? नवीन विचार, नवे शोध मांडण्याची संधी त्यांना मिळाली ? खेड्यापाड्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळा पोहोचल्या. मात्र तशी वातावरण निर्माण होऊ शकली नाही. यामुळे आपला पाल्य इंग्रजी माध्यमात टाकताना पालकांना जो आशावाद वाटत होता, तो दुर्दैवाने पुढे खरा होऊ शकला नाही. याला काही अपवाद जरूर आहेत. त्यांनी चांगली तयारी केली आणि ते आपापल्या क्षेत्रात पुढे जाऊ शकले. इंग्रजी शाळांचा विद्यार्थ्यांना कितपत उपयोग झाला, हे ही निश्चित सांगता आले नाही तरी, एक गोष्ट मात्र नक्की खरी आहे आणि ती म्हणजे इंग्रजी माध्यमांमुळे पालक वर्गामध्ये शिक्षणाकडे बघण्याचा अवेअरनेस वाढला आहे. पालक शिक्षणाप्रती जागरूक बनले आहेत. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष पुरवू लागले आहेत. मात्र ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे की या सर्व गोष्टींचा मुलांना कितपत फायदा झाला आहे ?
पालक मुलांचा कल, आवडीनिवडी या गोष्टी विचारात न घेता सरसकट आपल्या पाल्याकडून मोठ्या अपेक्षा करतायेत. प्रत्येक मूल हे स्वतंत्र असते. Every child is different. याचा विचार न करता पालक आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू पाहत आहेत. यामुळे क्लासेसचे मार्केटिंग वाढले. मागणी तसा पुरवठा झाला. आज बारावीनंतर सर्वजण JEE सारख्या परीक्षांना बसत आहेत. अभियांत्रिकी प्रवेशासाठीची ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा आहे. यामध्ये पात्र होण्यासाठी फार मोठी स्पर्धा असते. जवळपास देशभरातून दहा लाख मुले या परीक्षेला बसतात. त्यातील एक लाख निवडले जातात. त्यातून दहा हजार मुलांची प्रत्यक्ष शिक्षणासाठी निवड होणार असते. मुलांना आपल्या क्षमता कळतात. मुले सांगतील तसे पालकांनी ऐकले तर त्यांची पैशाची बचत होईलच, त्याबरोबरच मुलांवरील ताण देखील कमी होईल.
आज सर्वच जण डॉक्टर व इंजिनियर या क्षेत्राकडे वळतो आहे. मात्र याशिवाय शिक्षणाची दुसरी क्षेत्रच नाही की काय ? एवढे दोनच करिअर आहेत ? मूलतः कोणताही व्यवसाय हा वाईट नाही. आपण त्या व्यवसायाला नोकरीला कशी प्रतिष्ठा मिळवून देतो यावर त्याचे यश अपयश अवलंबून असते. अमुक व्यवसायात, नोकरीत खूप पैसा आहे म्हणून मुलाला तो व्यवसाय, नोकरी मिळण्यासाठी पालक दबाव टाकतात हे योग्य नाही. मूल खरेच ज्या क्षेत्रात निष्णात असेल त्या क्षेत्रातील नक्कीच यशस्वी होणार आहे. तेव्हा आवडीचे क्षेत्र निवडणे. त्यासाठी मुलाला स्वातंत्र्य देणे. खूप महत्त्वाचे आहे. खोट्या प्रतिष्ठेसाठी मुलांना रॅट रेस मध्ये ढकलू नका. मुले निराश होतात, हताश होतात. जीवनाविषयीचा विश्वास गमावून बसतात. त्यासाठी सुरुवातीपासूनच त्यांना मोकळे आकाश द्यायला हवे. तरच आपला उद्याचा हा भारत बलवान,सशक्त भारत म्हणून नावारूपास येईल.

— लेखन : किरण दशमुखे. सटाणा, नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800