Home बातम्या मुलांसाठी मोबाइल घातक – डॉ तात्याराव लहाने

मुलांसाठी मोबाइल घातक – डॉ तात्याराव लहाने

1

आजकाल बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांमध्ये तरुणांचे आणि लहान मुलांचे प्रमाण वाढत आहे. चष्म्याचा नंबर,  तिरळेपणा हे बऱ्याचवेळा डोळ्यांची जडणघडण होताना निर्माण झालेल्या दोषांमुळे होतात. आता त्यावर तितकेच चांगले उपायही उपलब्ध आहेत. परंतु हल्ली डोळ्यांची नीट काळजी आणि डोळ्यांवर निष्कारण वाढवलेला ताण यामुळे होणारे आजार वाढत आहेत. 

आज कामे संगणकावर अवलंबून असतात. संगणक, मोबाईल, टॅब, आयपॅड या सर्वांतून प्रकाश डोळ्यामध्ये पडतो. ही सर्व यंत्रे आपण डोळ्यांपासून एक फुटापेक्षा कमी अंतरावर ठेवतो. यातून सततच्या पडणाऱ्या प्रकाशामुळे डोळ्यांच्या बाहुल्या आकुंचन पावतात आणि कालांतराने डोळ्यातील स्नायू स्पासमच्या स्थितीत जातात. त्यामुळे नजर कमी होते. डोळे दुखणे सुरु होते आणि काही वेळ काम केल्यानंतर लगेच डोळ्याचा थकवा जाणवायला सुरुवात होते.

दिवसांतून ८-१० तासांपेक्षा अधिक वेळ संगणकावर काम करताना आपल्या डोळ्यांची उघडझाप बंद असते आणि दृष्टीपटलावरील अश्रू तरंग सुकून जातात. डोळे वारंवार थंड पडतात. त्यामुळे डोळ्यांचे इन्फेक्शन वारंवार होते. यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे ५-१८ या वयोगटातील मुला-मुलींमध्ये या आजाराचे वाढते प्रमाण दिसून येते. 

अपत्य लहान असल्यापासून, अगदी वयाच्या पहिल्या वर्षापासून त्याच्या / तिच्या हातात खेळणी म्हणून टॅब, मोबाईल, आयपॅड अशा वस्तू दिल्या जातात. त्यातून येणाऱ्या प्रकाशामुळे डोळ्यांना लवकर चष्म्याचा नंबर लागतो. मुलांना अगदी लहान वयापासून कोरड्या डोळ्यांसाठी औषधे सुरु करावी लागतात. डोळे हे माणसाच्या जगण्याचेच नव्हे तर आनंदाचे साधन असल्याने, मायबापांनो काळजी घ्या असा तळमळीचा सल्ला नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांनी नुकताच दिला.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा क्रमांक १९३ चे शाखाप्रमुख संजय भगत यांच्या आयोजनातून तसेच विभाग प्रमुख महेश सावंत यांच्या सहकार्याने मुंबईतील प्रभादेवी येथील नागरिकांकरिता डॉ तात्याराव लहाने,  डॉक्टर रागिणी पारिख, डॉक्टर सुमित लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचे नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विविध मान्यवर सहभागी झाले होते.

हे शिबिर आयोजित केल्याबद्दल नागरिकांनी शिवसेनेचे तसेच शाखाप्रमुख संजय भगत यांचे आभार मानले. शिबिर यशस्वी करण्याकरिता कार्यालय प्रमुख सुशांत वायंगणकर, सुजन मंत्री, सुरेश झित्रे व इतर पदाधिकाऱ्यांसह युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व महिला पुरुष शिवसैनिकांनी विशेष परिश्रम घेतले. 

प्रभादेवी व परिसरातील ६२५ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

रवींद्र मालुसरे
  • — लेखन : रवींद्र मालुसरे
    — संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. सोशल मिडीया हे जसे माणसासाठी सोय आहे तसेच मोबाईलचा अतिवापरही माणसांना ,विशेषत : मुलांना घातक ठरतो हे प्रबोधन करण्याचा सुरेख उपक्रम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version