छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखे नुसार उद्या, १९ फेब्रुवारी रोजी जयंती साजरी होत आहे. खरं म्हणजे, किती ही ग्रंथ वाचले तरी महाराजांचे जीवन, कार्य, विचार, धोरण समजले असे म्हणता येणार नाही. पण निदान त्यांच्या जीवन कार्याची थोडक्यात ओळख व्हावी म्हणून इतिहास संशोधक, प्राध्यापक डॉ ज्योती रामोड यांचा लेख पुढे देत आहे.
महाराजांना आपल्या पोर्टल तर्फे विनम्र अभिवादन.
– संपादक
“देव्हाऱ्यात असणारे देव कुठे जन्माला येतात ते ठाऊक नाही. पण देव्हाऱ्यातल्या देवांना सुरक्षित ठेवणारा माझा देव शिवराय येथे जन्मला ”
एक व्यक्ती स्वतःच्या आत्मविश्वासातून किती असामान्य आणि परिवर्तनवादी कार्य करू शकते याची अनेक उदाहरणे इतिहास आहेत. त्यातील एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय.
आजही शिवाजी महाराजांच्या केवळ स्मरणाने प्रत्येकाच्या शरीरात आणि मनात नवचेतना निर्माण होते. तर त्या काळात महाराजांच्या एका शब्दावर बलिदान देणारे हजारो मावळे किती एकनिष्ठ आणि ध्येयप्रेरित होते हे उमजते.
आज शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन जीवनापर्यंत वेगवेगळ्या स्तरावर महाराजांच्या जीवनाचा आणि कार्याचा परामर्श घेतला आहे. त्या पाठीमागचे कारण म्हणजे येणारी प्रत्येक पिढी अधिक कार्यक्षम, कर्तृत्ववान आणि एकनिष्ठ व्हावी हे आहे.
जीवन परिचय
क्षत्रिय कुलवंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी येथे झाला. भीमाशंकराच्या जटात आणि नाणेघाटाच्या ओठात बसलेला किल्ला म्हणजे शिवनेरी होय असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणतात.
शिवरायांना अन्यायाविरुद्ध लढण्याचा वारसा माता पित्याकडून व वंशपरंपरेनेच मिळाला होता. लहानपणापासून आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव मातोश्री जिजाबाई यांनी शिवरायांना वेळोवेळी करून दिली होती. त्यामुळे या परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची जडणघडण झाली. वडिलांकडून मिळालेली शिकवण आणि कौशल्य याचा परिपूर्ण वापर शिवरायांनी स्वराज्य स्थापनेच्या मातृस्वप्नपूर्तीसाठी केला.
कौटुंबिक जीवनामध्ये माता जिजाऊ यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन शिवरायांच्या जीवनाला वेगळी कलाटणी देणारे होते. शिवाजी महाराजांनी मोठ मोठ्या राजघराण्यांशी वैवाहिक संबंध निर्माण केले. ज्याद्वारे राजकीय सुरक्षितता व एकात्मिक संघटन निर्माण होईल.
छत्रपती शिवरायांना तत्कालीन समाजाची परिस्थिती पाहता एक गोष्ट लक्षात आली होती की, साम्राज्य निर्माण करायचे असेल तर सिमेलगतचे गड किल्ले हस्तगत करणे खूप महत्त्वाचे आहे. या कारणास्तव त्यांनी जवळपास 400 गड, किल्ले वेगवेगळ्या युद्धनीतीच्या माध्यमातून हस्तगत केले.
छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 साली रायगडावर संपन्न झाला. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी केलेले अभुतपूर्वक कार्य संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे आणि उद्दिष्ट पूर्तीसाठी नवचेतना देणारे आहे. मध्ययुगीन राजवटीत सुलतानाच्या विरोधात बंड करणे म्हणजे प्राणाशी गाठच. परंतु शिवाजी महाराजांनी या सुलतानशाहीला न जुमानता हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने मूठभर मावळ्यांच्या मदतीने महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा फडकवला. याचे कारण म्हणजे स्वराज्याबद्दल असणारे प्रेम म्हणूनच छत्रपतींचे कार्य, पराक्रम आणि विचार आजच्या तरुण पिढीच्या मनात, मेंदूत आणि वर्तनात रुजवणे काळाची गरज आहे.
शिवाजी महाराजांनी जाती-पातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला. प्रत्येक मोहिमेनंतर शिवाजी महाराज तलवारी मिरवणाऱ्या धारकऱ्यांना ‘मानकरी’, भाला फेकणाऱ्या निष्णात सैनिकाचा ‘भालेराव’ अशी उपाधी देऊन गौरव करायचे. जीवावर उदार होवून चढाई करणाऱ्या सैनिकांना सोन्याचे कडे द्यायचे.
भय हा शब्द महाराजांच्या ध्यानी-मनीही नव्हता. नियोजन करणे, माहिती गोळा करणे, जबाबदाऱ्या निश्चित करणे, यामुळे शिवाजी महाराजांना मोठे यश मिळाले. जिद्दीने, चातुर्याने आणि बुद्धी वापरून शिवाजी महाराजांनी समस्यांवर मात करत त्यांनी प्रचंड यश संपादन केले.
शिवाजी महाराजांचे गनिमी कावा हे प्रमुख युद्धतंत्र होते. अनेक मोहिमा, लढाया शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने जिंकल्या.
रयतेवर जीवापाड प्रेम, निर्भिडपणा आणि जिद्द, दूरदृष्टी, गनिमी कावा, व्यवस्थापन, न्याय आणि सर्वधर्मसमभाव, समानता, एकात्मता, स्त्रीसन्मान, आदर, रयतेच्या सुख व समाधानासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे राजे म्हणून छत्रपती शिवराय यांचे जीवन येणाऱ्या प्रत्येक पिढीला आपल्या कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणिव करून देणारे आहे.
कुशल नेतृत्व, कर्तुत्व, संघटन, सावधानता हे गुण महाराजांच्या अंगी होते. प्रजाहितदक्ष, एक प्रखर योद्धा, कुशल राज्यकर्ता, उदार व लोककल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगाला सकारात्मक दिशा देणारे आहे.
छत्रपती शिवरायांच्या या गुणांचे अनुकरण करण्याचे जर सर्वांनी ठरवले तर आजही समाजातील अनेक चुकीच्या घटनांना आळा बसेल आणि सर्व समाज सुख, समाधान व आनंदाने जीवन जगू शकेल.
शिवविचार कायम मनात ठेवून समाजाप्रती कार्य करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करणे होय.
दुर्दैवाने महाराजांना अल्प आयुष्य लाभले. वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी, ३ एप्रिल १६८० रोजी काळाने त्यांना हिरावून घेतले. अन्यथा आज आपल्याला भारताचा इतिहास वेगळा दिसला असता.
“इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय”

– लेखन : डॉ.ज्योती रामोड. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
जगातील सर्वश्रेष्ठ राजा छत्रपति शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा उचित गौरव.