संकल्प फाउंडेशन ही सेवाभावी संस्था गेली १० वर्षे ग्राम विकास, मानवता, पर्यावरण, आरोग्य, दिव्यांग प्रेरणा, या क्षेत्रात काम करत आहे.
या संस्थेची व्याख्यान माला दिव्यांगांचे जीवन चरित्र जाणून घेणारी आहे. कवी, लेखक एडवोकेट रुपेश सुधा भैरवनाथ पवार यांचे नुकतेच झालेले व्याख्यान अंधारलेल्या वाटेवर प्रेरणेचा आणि सकारात्मकतेचा किरण आहे, असंच मला प्रत्येक क्षणी जाणवलं.
जीवनाच्या संघर्षात, संकटाच्या सागरात बुडायचं नाही, तर धैर्याने चरित्र निर्माण करायचं हा संदेश या ऑफलाईन व्याख्यानातून मिळाला.
वर्तमानपत्र उघडलं की सामान्य माणसं, विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक नोकरदार, बेरोजगार या सर्व लोकांच्या आत्महत्येच्या अंगावर येतात, मनावर प्रहार करतात. जागतिक मंदी, अवकाळी पाऊस, कोरोना अशा सर्व संकटमय परिस्थितीत माणसाचं मन खचण हे अगदी सामान्य आहे, पण अशावेळी अपंग व्यक्तींचे जीवन बघावं, असं रुपेश सरांनी सांगितलं.
“जमाने मे बहुत गम है ! मेरा दुख तो बहुत कम है !” हेच मला हा कार्यक्रम ऐकताना वाटत होते.
जीवनधारेला यथार्थपणे समजून घेणे हा रुपेश यांचा जीवन प्रवाह आहे असे वाटते. म्हणून ती एक अनोखी कहानी आहे. सेरेब्रल पाल्सी या आजारपणामुळे बालपणापासूनच रुपेश यांचा एक पाय आखूड व डोळ्यात मोतिबिंदू दोष अशाप्रकारची दिव्यांगता असताना, अनेक शारीरिक प्रश्नांना त्यानी तोंड दिलं आहे. मुंबई येथील हाजी अली अपंग पुनर्वसन इस्पितळात त्यांनी अनेक वर्ष औषधोपचार घेतले. दोन ऑपरेशन झाली, त्यातून अनेक शारीरिक प्रश्न निर्माण झाले, पण ते सर्व प्रश्न त्यांनी सकारात्मकतेने घेतले. त्यांचे आजार हे वारंवार उद्भवत होते, परत परत डोकं वर काढत होते, पण अशा परिस्थितीत सरांनी पदवीची परीक्षा दिली. त्याचप्रमाणे लॉ चा अभ्यासक्रम पूर्ण केला. पत्रकारिता अभ्यासक्रम देखील पूर्ण केला. आपल्या अथक मेहनतीने त्यांनी यश मिळवलं, तरीही डॉक्टर परेरा ज्यांनी रुपेश सराना वॉकर, काठी वापरुन उभे करताना सामान्यपणे आपण चालत आहोत, अशीच मानसिकता ठेऊन पुढे गेले पहिजे असा विश्वास दिला. मग स्वतःच्या पावल्यावर उभे राह्यला शिकवलं. त्या परेरा डॉक्टरचे ते आभार मानतात.
मातीच्या गोळ्याला आकार देऊन कुंभार मडकं घडवतो, पण माणसाने स्वतःच्या जीवनाला स्वतः कष्ट करून घडवायचं असतं असा संदेश रुपेश सरांनी दिला आहे.
रुपेश पवार हे श्री गणेशाचे मोठे भक्त आहेत. जीवन विद्या मिशन, कर्जत येथील सद्गुरु श्री वामनराव पै यांचे देखील ते साधक आहेत. ठाण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी जीवनविद्या मिशनचा अनुग्रह आणि आशीर्वाद घेतला. त्यामुळे त्यांची विचारांची दिशा बदलली. विचार बदलला की नशीबाची दशाही बदलते. म्हणून “तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार” ह्या सदगुरुंच्या विचार भावनेतून रुपेश यांनी आपल्या विचारांना अध्यात्माची सोनेरी किनार जोडली.
विद्यार्थ्यांना संदेश देताना पवारांनी संगितले, महागडा मोबाईल फोन घेणं, पार्टी करण, फिरणं यापेक्षा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. मोबाईलचा सदुपयोग केला पाहिजे. आपलं ध्येय डोळ्यासमोर पक्क असावे, असे त्यांनी सांगितले. म्हणून विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार वर्ग याकरता अशी दिव्यांग बांधवांची व्याख्याने ठेवली, तर ती प्रेरणादायी ठरू शकतात हे त्यांचे मत मलाही पटले.
रुपेश सरांच्या आई-वडिलांनी शारीरिक आणि मानसिक कष्ट करून मुलाला घडवलं. आव्हानात्मक परिस्थितीत, धीराने मनापासून सांभाळलं. रुपेश यांना प्रेरणादायी भावनांची अभिव्यक्ती आई-वडिलांच्या आशीर्वादामुळेच मिळाली.
फिनिक्स पक्षासारखे उध्वस्ततेतून देखील प्रत्येक माणूस उभा राहू शकतो. कवी मंगेश पाडगांवकर यांच्या फिलॉसॉफीनुसार, जीवनाचा पेला अर्धा भरला आहे, अर्धा रिकामा आहे ही काव्य कथा आपण शाळेपासूनच ऐकत असतो, पण जीवनाचा पेला अर्धा भरला आहे म्हणजे रिकामा नाही, तो मी पूर्णपणे भरू शकतो. असा सकारात्मक विचार ही एक मोठी गोष्ट आहे. ती रुपेश यांच्या वक्तव्यातून आली. दोन वेळा अतिशय मन खचल्यावर जीवन संपवावं असा विचार बाजूला सारून रुपेश पवार यांनी आपली पावलं स्थिर ठेवली.
अत्यन्त संघर्षमय प्रवासात रुपेश सरांनी आत्तापर्यंत खूप लेखन केले आहे. त्यांची अनेक पुस्तक प्रकाशित झाली आहेत. सरस्वती मातेच्या कृपेने ते विचार करून मनातल्या मनात लेखाचा पूर्ण आराखडा तयार करून ठेवतात. जसे पूर्वीच्या काळी एका कलाकाराने ताजमहाल डोळ्यासमोर कल्पनेत आधी उभा केला होता आणि नंतर कलाकारांनी त्याच्यावर काम सुरू केलं, तसंच रुपेश आपले लिखाण मनातून तयार करून ठेवतात. आपल्या लेखनावर कॉलेजमधील प्राध्यापकांचा प्रभाव आहे असं रुपेश पवार आदराने म्हणतात. साहित्य जीवनात त्यांना स्पर्धा करायची नाही फक्त लोकांसाठी लिहायचं आहे, असं त्यांचे म्हणणे आहे.
रुपेश पवार यांनी 2006 पासून आपल्या स्तंभलेखन कार्याला, ठाणे वैभव मधून सुरुवात केली.
कै. नारायण तांबे, ज्येष्ठ कवी अशोक बागवे, प्रकाशक संतोष राणे, प्रबोधक प्रल्हाद वामनराव पै यांनी रुपेश यांना उत्तेजन दिले. अंतरंग हा कविता संग्रह, वलयांकित हा श्रध्दांजली पर लेखसंग्रह, या साहित्य कलाकृतीतून रुपेश यांना यश व ओळख मिळत गेली.
बातमीदारी, सूत्रसंचालन, नियोजन, मुलाखतकार या आदी क्षेत्रातही त्यांची घोडदौड चालु आहे. हे लेखन करण्यासाठी त्यांना कधी कधी मदतनीस घेऊन लिखाण करावे लागायचं. तसं लिखाण करण्यापासून ते आता ॲपच्या मदतीने लिखाण, ई बुक प्रकाशन इथपर्यंत त्यांनी मजल मारली आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी त्यांच्या अंतरंग या संग्रहातील एक कविता त्यांनी वाचून दाखवली.
“यश असेच
मिळत नाही,
त्यास खेचून
आणावे लागते !!धृ!!
त्याला द्यावी लागले.
परिश्रमाची जोड !!धृ!!
यश मिळवण्यासाठी
लागते
हिम्मत आणि आत्मविश्वास
आत्मविश्वास हीच यशाची
पहिली पायरी असते !!1!!
यश मिळण्यासाठी
प्रयत्नांची कळी उमलावी लागते !
मगच यशाचे फुल
आपल्याकडे झुकते !!2!!
हे व्याख्यान पूर्ण झाल्यावर निरोपाच्या वेळी रुपेश पवार सरांनी सर्वांनाच एक संदेश दिला. ते म्हणाले, “सकारात्मकतेने जगा, परिश्रम करा, यश जरूर मिळेल.” सकारात्मकतेची प्रेरणा देणाऱ्या या रुपेश पवार यांना मनःपूर्वक शुभेच्छा.

– लेखन : शुभांगी पासेबंद
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 98694848000