वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत 348 विमानांद्वारे 49,063 प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यातील मुंबईच्या प्रवाशांची संख्या 16,395 आहे. उर्वरित महाराष्ट्रातील 17,080 आणि इतर राज्यातील 15,588 प्रवाशीही या अभियानांतर्गत मुंबईत दाखल झाले आहेत. दिनांक 31 जुलै 2020 पर्यंत आणखी 78 विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे.
कोरोना विषाणुविरुद्ध शासन निग्रहाने लढत असतांना परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना मुंबईत उतरवून घेऊन त्यांना कॉरंटाईन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनामार्फत पार पाडली जात आहे.
या देशातून आले प्रवासी
अमेरिका,ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, बांगला देश, मलेशिया, कुवेत, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनिशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया,स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशस, ब्राझील, थायलंड, केनिया,मियामी, व्हियतनाम, इटली, स्विडन, इथोपिया, रोम, जर्मनी,दुबई,मालावी,वेस्ट इंडिज,नॉर्वे, कैरो, युक्रेन,रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड , सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व अफ्रिका, फ्रान्स, नैरोबी, जॉर्जिया, कामेरुन, युनायटेड अरब अमिराती, कांगो अशा विविध देशातून प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत.
बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक कॉरंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचे काम जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना कॉरंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.
पर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. तसेच या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे.
वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन पार पाडत आहे.