दिनांक ३ फेब्रुवारी रोजी उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर उशीरा विनोबा भावे मुख्य सभामंडपात विविध विषयावर पुढील कार्यक्रम झाले.
पहिला परिसंवाद
“कर्मयोगी गाडगे महाराज व राष्ट्र संत तुकडोजी महाराज आणि महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा” या विषयावर झाला.
मा. श्रीकांत तिडके,
मा. रेखा नार्वेकर
मा. वासुदेव बले, डॉक्टर हनुमंत भोपाळे व डॉक्टर रमेश जलतारे यांचा सहभाग होता.
दुसरा कार्यक्रम
“आम्हा लेखकांना काही बोलायचे आहे” या विषयावर झाला.
यात प्राध्यापक प्रवीण दवणे, मा. रवींद्र शोभणे, मा. राजन खान, मा. गणेश मतकरी व मा. पी विठ्ठल यांनी आपले विचार मांडले.
तिसरा परिसंवाद
“ललितेतर साहित्याची वाढती लोकप्रियता” हा रात्री साडेआठ वाजता सुरू झाला .त्यात मा. राम जगताप, मा. शंकर विभुते, मा. श्रीपाद अपराजित, डॉक्टर स्मिता वानखेडे व डॉक्टर स्वाती शिंदे पवार यांनी भाग घेतला.
या सर्व परिसंवादात सर्व वक्त्यांनी उत्तम विचार मांडले परंतू मंडपात श्रोत्यांची अत्यल्प उपस्थिती होती. वर्धेकरांनी तसेच प्रतिनिधींनी याचा लाभ घेतला नाही.
निमंत्रितांचे कवी संमेलन हे रात्री साडेदहा वाजता सुरू झाले ते रात्री बारानंतर संपले. यात कल्याणच्या डॉ. ऋता खापर्डे, ठाण्याच्या वृंदा टिळक, निकिता भागवत व बसव कल्याणचे मा. भानुदास पाटील या परिचितांचा सहभाग होता. त्यांनी उत्कृष्ट कविता सादर केल्या.
रात्री सेवाग्राम यात्री निवासात जाण्यासाठी बसची व्यवस्था होती त्यामुळे सुविधा झाली.
मुख्य मंडपात हे कार्यक्रम चालू असतांना दुपारी कविवर्य सुरेश भट गझल कट्ट्याचे उद्घाटन डॉ.गिरीश गांधी यांच्या हस्ते झाले. श्रेष्ठ गझलकार आशा पांडे ह्या प्रमुख पाहुण्या होत्या.
पहिल्याच मुशाहर्यात माझे डोंबिवलीतील स्नेही मा. जयंतराव कुलकर्णी व बदलापूरचे श्री विनायक लळीत यांचे गझल वाचन होते. आलेल्या ५०० गझलांमधून २४० च्या वर गझलांची निवड करण्यात आली होती.
आशा पांडे यांनी गझलकारांना उत्तम मार्गदर्शन केले. प्रत्येक मुशाहरा हा सरसच होता. गावोगावचे प्रसिद्ध गझलकार मुशाहर्यांचे अध्यक्ष व सूत्रसंचालक होते. त्यामुळे हा मंडप कायम भरलेला होता.
येथेच महाराष्ट्रातील अनेक कवींची भेट झाली. डोंबिवलीतील काव्य रसिक मंडळाची मंडळी, गझलकार प्रशांत वैद्य, मित्र सुधीर चित्ते वगैरे. सर्वांना दुसऱ्या दिवशीच्या माझ्या काव्य संग्रह प्रकाशनाचे व काव्य वाचन कार्यक्रमाचे आमंत्रण दिले.
गझल कट्ट्याच्या बाजूला ३ तारखेला एक खुला मंच चालविला गेला ज्यांना संमेलनात कुठेच स्थान मिळाले नाही अशांना या मंचावर आपली कला सादर करता आली. अनेकांनी आपल्या कविता, गाणी, भारूडे, एकपात्री प्रयोग या मंचावर सादर केली. एका वासुदेवानेही आपली पारंपरिक गाणी सादर केली. सर्वांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रा. देविदास सोटे, कविकट्टाही तुफान गर्दीत सुरू होता. अखिल भारतातून मराठी कवी आपली कविता सादर करायला संमेलनात आले होते.
त्याच्या बाजूच्या कै. मनोहर म्हैसाळकर सभामंडपात ३ तारखेला दुपारी मा. एकनाथ आव्हाड, डॉ. सुनंदा गोरे, मा. अर्जुन व्हटकर,मा विलास सिंदगीकर, मा.अशोक मानकर, मा. प्रिया जोशी व मा गजानन देसाई यांचे कथाकथन झाले.
नंतर अध्यक्षीय भाषणावर चर्चा झाली त्यात प्रतिभा विश्वास यांनी आपले विचार मांडले संमेलनाध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
संध्याकाळी विदर्भातील बोलीभाषांवर एक परिसंवाद झाला. त्यात डॉ. सतीश तराळ, डॉ. मनोहर नरांजे, डॉ. श्याम मोहरकर, डॉ. पुरुषोत्तम माळोदे, व मा. प्रकाश एदलाबादकर यांनी भाग घेतला.
वरील कार्यक्रमाला तुरळक गर्दी असली तरी रात्रीच्या “मृद्गंध वैदर्भीय काव्य प्रतिभेचा” या कार्यक्रमाला वर्धेकर नागरिकांची चांगलीच उपस्थिती लाभली.
अशा तर्हेने पहिला दिवस आनंदात गेला. रात्री निवासात गेल्यावर कर्नाटकातील बसव कल्याण गावचे मा. पुरुषोत्तम पाटील, पंडीत पाटील, अमळनेरचे मा. रमेश पवार, नांदेडचे व्यंकटेश चौधरी सोबत होते.
ठाण्याच्या मा. निकिता भागवत व मा. वृंदा टिळक यांचीही व्यवस्था आमच्या समोरच्याच हॉल मध्ये होती.
क्रमशः

– लेखन : प्रवीण देशमुख. कल्याण
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800