आज 29 जुलै, आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. वाघ अन्नसाखळीचा अविभाज्य घटक असुन वाघाचे संवर्धन आणि संरक्षणाच्या जनजागृतीचा आजचा दिवस. त्यानिमित्ताने विशेष लेख…
वाघ हा निसर्गातील महत्वाचा घटक आहे. तो जगला तर निसर्गाची अन्न साखळी सुरळीत राहू शकेल.
म्हणजे आपल्या वनांची आन, बान आणि शान. त्यामुळे समृध्द निसर्गासाठी व मानवाच्या सुदृढ जीवनासाठी वाघांचे संरक्षण करण्याचा संकल्प आज करू या.
चंद्रपुर येथील अंधारी व्याग्र प्रकल्पातील बब्बर आणी माया या वाघ वाघिणीचे काही वर्षांपूर्वी मला छायाचित्रण करता आले याचा मला अभिमान आहे.
भारतीय पट्टेरी वाघ जगातील वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांपैकी एक मानला जातो. परंतु, अनिर्बंध शिकार आणि अधिवासावरील अतिक्रमणांमुळे त्यांची संख्या अत्यंत रोडावली आहे. ती वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत. गेल्या शतकात माणसाने वाघांची अनिर्बंध शिकार केलीच शिवाय जंगलतोड आणि अतिक्रमण करून वाघांच्या अधिवासाचे क्षेत्रही कमी केले; परिणामी, अन्नासाठी जवळच्या वस्त्यांवर वाघ हल्ले करू लागले आणि माणूस – वाघ संबंध आणखीच बिघडले.
नामशेष होण्याच्या जवळपास पोहचलेल्या वाघांचे जतन संवर्धन करण्याची आणि त्यांचे अधिवास क्षेत्र वाढविणे, त्यांचे संरक्षण आणि याच बरोबर वाघांच्या मृत्युचे वाढत असलेले प्रमाण थांबविण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी होत आहे.
वाघाची शिकार व अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी लक्ष केन्द्रीत करून ठोस उपाय योजनेची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यासाठी आता राज्य आणि केंद्र शासनही जबाबदारीने पुढाकार घेत आहे. आपल्या देशाच हे वैभव “एक था टायगर” आणि “टायगर अभि जिंदा है” या पलीकडे जावुन जपलंच पाहीजे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे…
– लेखन व छायाचित्रे : विजय होकर्णे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.