Saturday, March 15, 2025
Homeबातम्यावृत्तपत्रांनी विश्वासार्हता जपावी : न्या.अंबादास जोशी

वृत्तपत्रांनी विश्वासार्हता जपावी : न्या.अंबादास जोशी

गोव्यातील पत्रकारितेतही नवनवीन प्रवाह येत आहे. मुद्रित माध्यमांबरोबर इतर प्रसारमाध्यमे प्रचलित होत आहे. कालच्या बातमीत आज बदल होतात. कालची घटना इलेक्ट्रानिक्स माध्यमे देत असतात. त्यात भडकपणा अधिक असतो. मुद्रित माध्यमे साधकबाधक विचार करून बातम्या देत असतात. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांपेक्षा मुद्रित माध्यमांची विश्वासार्हता जास्त असते. ती विश्वासार्हता जपली पाहिजे, असे प्रतिपादन गोव्याचे लोकायुक्त न्या.अंबादास जोशी यांनी केले.

पणजी येथील इन्स्टिट्युट मिनेझिस ब्रागांझा या राज्य सरकारच्या संस्थेतर्फे पत्रकार- साहित्यिक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर, विजय डिसोझा आणि भांगरभूंयचे संपादक महेश दिवेकर यांचा शाल, श्रीफळ, झाडसमई व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला या वेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दशरथ परब, कार्यक्रमाचे समन्वयक दै. तरुण भारतच्या गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर व ब्रागांझा संस्थेचे सदस्यसचिव मिलिंद घाटे हेही व्यासपीठावर होते.

प्रारंभी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी गुलाबपाकळ्या अर्पण केल्या. सोशल मीडियामुळे वृत्तपत्रांचा लेखकवर्ग कमी होत आहे. परंतु न डगमगता तरुण पत्रकरांना वृत्तपत्रांकडे आकर्षित करायला हवे. अभ्यासेन प्रकटावे हे सूत्र अंमलात आणले पाहिजे. लोकांना शिकवण्याची गरज आहे. विश्वासू आणि वास्तविकता जपावी. बातमी देताना सकारात्मकता जपून सत्य तेच प्रतिपादन केले पाहिजे, असेही जोशी यांनी सांगितले.

लोकमान्यांनी सडेतोड आणि व्यासंगपूर्ण वक्तव्याने देश जागवून सोडला असे दशरथ परब म्हणाले. टिळक महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे ते नेते होते. ब्रिटिशांना त्यांनी सळो की पळो करून सोडले ते कृतीने असेही परब यांनी सांगितले.

आपले व्यक्तिमत्त्व प्रारंभी सोलापूर तरुण भारत (रा. स्व. संघाचा), नंतर तुळजापूरचा सिद्धेश्वर समाचार, पुणे लोकसत्ता आणि १९९३ पासून दै. गोमन्तक मध्ये संपादकीय खात्यात काम केले. चंद्रकांत घोरपडे, जयंत संभाजी यांच्या हाताखाली तसेच शरद कारखानीस व संजय ढवळीकर यांच्यासह अनेक संपादकांनी पत्रकारिता शिकवली. सुरेश नाईक यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. न्यायालयातील वार्तांकनाची जबाबदारी दिली. आजवरची पत्रकारितेतील अनेक स्थित्यंतरे पाहायला मिळाली अनुभवायला मिळाली असे सन्मानाच्या उत्तरात प्रकाश क्षीरसागर यांनी सांगितले.

कोणत्याच भाषेतील तरुण वृत्तपत्रात काम करण्यास उत्सुक नसतात. अभ्यासाची तयारी नसलेले नवखे तरुण वृत्तपत्रांना तयार करावे लागतात ते नंतर इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांकडे आकर्षित होतात असे प्रतिपादन भांगरभूंयचे संपादक महेश दिवेकर यांनी केले. तरुणांना वाचनासाठी प्रवृत्त करायला हवे, अभ्यासू संपादक तयार व्हावेत असेही त्यांनी सांगितले.

विजय डिसोझा यांनीही आता डिजिटल मीडिया मुद्रित माध्यमांना भारी पडत असल्याचे मत व्यक्त केले. तरी देखील मुद्रित माध्यमे टिकून राहतील, असा आशावाद व्यक्त केला.

स्वागत मिलिंद माटे यांनी केले. आभार सागर जावडेकर यांनी मानले. प्रदीप नाईक यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाला आशा गेहलोत, महेश वेंगुर्लेकर व कालिका बापट, सौ. चित्रा क्षीरसागर लेखक प्रमोद कारापूरकर, पौर्णिमा केरकर, पत्रकार सुनीता प्रभुगावकर उपस्थित होत्या.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. वृत्तपत्रे ही लोकशाहीत लोकांचा आवाज व्यक्त करणारे ,त्यांच्या प्रश्नाला तोंड फोडणारे सशक्त माध्यम आहे.हे इथे जाणवते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments