Thursday, June 19, 2025
Homeलेखव्यसनाच्या विळख्यात तरुणाई

व्यसनाच्या विळख्यात तरुणाई

जगात आर्थिक उलाढालींची सर्वात मोठी तीन क्षेत्रे आज उदयास आली आहेत. ती म्हणजे अश्लील संकेतस्थळे- चित्रफिती, दुसरे नशिल्या पदार्थांचे उत्पादन- विक्री आणि तिसरे म्हणजे स्मार्टफोन. या तिन्ही क्षेत्रात प्रामुख्याने तरुण वर्ग ग्राहक असल्याने तरुणाईला आकृष्ट करण्यात किंबहुना त्याला या जाळ्यात ओढण्यात या क्षेत्रांनी यश मिळवले आहे. त्यातल्या त्यात व्यसनाधीनतेने युवा पिढीला अनिर्बंधपणे ग्रासले आहे याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.

आपल्याकडे अंमली पदार्थ किंवा दारू यांना भयंकर व्यसन म्हणून ज्या गांभीर्याने पाहिले जाते तितके तंबाखूच्या व्यसनाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. चारचौघात मैत्रीचे प्रतिक म्हणूनही तंबाखू खाल्ली जाते. किंबहुना भारतातील ग्रामीण, निमशहरी भागात तंबाखू व्यसन हे गंभीर व्यसन आहे हे त्यांच्या गावीही नसतं. स्थावर मालमत्ता जशी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला आपोआप मिळत असते तसे तंबाखू, मशेरी हे सुद्धा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला विनासायास मिळत असल्यासारखं, पिढ्यानपिढ्या हे सारं सुरू आहे.

तंबाखूतल्या घातक द्रव्यांची जाणीव जागृती मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे. त्यात निकोटीन हे नशा आणणारे रसायन तर आहेच पण हायड्रोजन सायनाइड, ऍसिटोन, कॅडमियम, आर्सेनिक, कार्बन मोनॉक्साईड, बुटेन इत्यादी अतिघातक विषारी रसायने असल्याने तोंडाचा वा अन्य प्रकारचा कॅन्सर होण्याचा दाट संभव असतो.

मानव विकास निर्देशांकात भारताचा जगात खूप खालचा म्हणजे 136 वा नंबर असला तरी तोंडाच्या कॅन्सर बाबत बाबतीत मात्र भारताने जगात पहिला नंबर मिळवला आहे, याला काय म्हणावे ?
भारतात दरवर्षी बारा 80 लाख लोक मृत्युमुखी पडतात .हे मृत्यू वाचवता येण्यासारखे असूनही त्याकडे मायबाप सरकारचे पुरेपूर लक्ष नाही. 15 वर्षावरील 20 टक्के महिला तंबाखू किंवा मशेरीचा वापर करतात. तसेच 14 टक्के युवक तंबाखूचा वापर करतात हे संशोधनावरून निष्पन्न झाले आहे.

कोणतेही रोगजंतू, विषाणू यापेक्षा धूम्रपान हे अधिक हे हानिकारक आहे. धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण 68% वाढते. एक विडी किंवा सिगारेट माणसाचं आयुष्य सहा मिनिटांनी कमी करतं. धुम्रपान करणाऱ्या महिलांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. धूम्रपानामुळे हार्मोन्स निर्मितीला इजा पोहोचत असल्याने गर्भधारण क्षमता क्षीण होते.

भारत सरकारने कोटपा (COTPA) कायदा अमलात आणला आहे. त्यामधील मुख्य तरतुदी पुढील प्रमाणे:
1. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी.
2. तंबाखूची जाहिरात प्रायोजकत्व व बढावा देण्यास बंदी.
3. शैक्षणिक संस्थांपासून 100 यार्ड परिसरात तंबाखू विक्रीस बंदी.
4. अठरा वर्षाखालील मुलांना तंबाखू विकण्यास बंदी.
5. तंबाखू उत्पादनाच्या वेष्टनावावर चित्रांकित सूचना तसेच टार व निकोटीनचे प्रमाण छापणे बंधनकारक.

आपल्या देशात तंबाखू सेवन करणाऱ्यांपैकी ७८ टक्के लोकांचा सकाळी उठल्यावर एक तासाच्या आत तंबाखूजन्य वस्तूकडे हात सरसावतो. तर ५९ टक्के लोकांना उठल्यावर अर्ध्या तासही त्याविना दम निघत नाही. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे भारतात १३ लाख लोक (अरुणाचल प्रदेशच्या लोकसंख्येएव्हढे) दरवर्षी मृत्यूला कवटाळतात. ५५०० तरुण मुले-मुली नव्याने तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सुरु करतात.

प्रतिवर्षी ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू सेवनविरोधी दिन म्हणून जगभर मानला जातो. जागतिक आरोग्य संघटना (WHO) या दिनासाठी एक
घोषवाक्य जाहीर करते. “तंबाखू- पर्यावरणास धोका” हे यावर्षीचं ( 2022) घोषवाक्य तुलनेनं आक्रमक असल्याचं जाणवतं.

गेल्या अनेक दशकापासून तरुणांना तंबाखू व निकोटिनची चटक लागावी म्हणून तरुणांना लुभावण्यासाठी पद्धतशीरपणे योजलेल्या क्लुप्त्यांचा अवलंब सराईतपणे सुरु आहे. सिगारेट, इ-सगरेट, हुक्का -पेन इ. अनेक उत्पादनांच्या डिझाईनपासून ते विक्री मोहिमेपर्यंत युवापिढीला विशेषतः कुमारवयीनांना कसे आकर्षित करता येईल, त्याकरिता सखोल असे संशोधन कसे करतात हे या उद्योगांची अंतर्गत धोरणं पाहिले की लक्षात येते. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे जे वर्षाकाठी जगभरात लाखो  (७० ते ८० लाख) लोक जीव गमावतात त्यांची जागा नव्याने तरुण वर्ग कसा घेईल हे या उद्योगांचे ‘लक्ष्य’ असते.

तरुणांना आकृष्ट करणाऱ्या क्लुप्त्या :-

1. सहज लक्षात येणार नाहीत अशी युएसबी किंवा कँडीच्या आकाराची सिगरेट उत्पादने.

2. तंबाखूत चेरी, बबलगम, कॉटन कँडी यासारखे स्वाद वापरणे.

3. वलयांकित व्यक्तींतर्फे प्रचार.

4. मिठाई, चॉकलेट्स, शीतपेये इ. च्या समीप तंबाखू उत्पादने ठेवण्याची अटकळ.

5. चित्रपट, मालिका, ऑनलाईन कार्यक्रमातून अप्रत्यक्ष प्रचार.

6. तरुणाईचा जिथे वावर जास्त तिथे तंबाखू उत्पादनाचं विक्री यंत्र (Vending Machine) ठेवणे.

7. शाळेच्या आवारातच जाहिरात लावून कायद्यांची भीती कमी करणे.

तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या लोकांचं वैयक्तिक स्वातंत्र्याचा वरकरणी पुरस्कार करत चिरंतन नफेखोरीची शाश्वती मिळवायची आहे- अशाप्रकारे तंबाखू उद्योगांच्या आक्रमक, छद्मी प्रचार यंत्रणेविरुद्ध लढण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने कृती कार्यक्रम हाती घेतला आहे ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे.

प्रा डॉ अजित मगदूम

– लेखन : प्रा डॉ अजित मगदूम.
संचालक, अन्वय व्यसनमुक्ती केंद्र, नवी मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. श्री सासवडे सर ,अमोल आणि कुटुंबीय,
    आपल्या अर्थपूर्ण मत- सूचनेशी मी सहमत आहे
    Comment बद्दल आभार.

  2. श्रीकृष्णकांत सासवडे सर , श्री अमोल सासवडे आणि परिवार श्रीकृष्णकांत सासवडे सर , श्री अमोल सासवडे आणि परिवार

    प्रा.डॉ. अजित मगदूम सर
    नमस्कार.
    तंबाखू मध्ये किती अपायकारक द्रव्ये असतात .तंबाखू सेवन करणे किती घातक आहे याचे आपण सविस्तर वर्णन विशद केले.

    “तरुणांनी ह्या लेखातून बोध घेणे गरजेचे आहे.”

    पालकांनी लहान पणीच आपल्या पाल्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.जेणे करुन त्यांना कोणतेही व्यसन लागणार नाही.

    जागतिक आरोग्य संघटनेने कृतीशील कार्यक्रम हाती घेतला आहे ही बाब स्वागतार्ह आहेच परंतु तरुणांनी आणि पालकांनी यातून जाणीवपूर्वक बोध घेणे आवश्यक आहे.

    “Health is wealth” हे विसरून चालणार नाही.

    आदरणीय देवेंद्र जी भुजबळ साहेब यांचेही मी विशेष आभार मानतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आपण जागे कधी होऊ ?
शितल अहेर on पुस्तक म्हणाले…
सौ. सुनीता फडणीस on पुस्तक म्हणाले…
श्रीकांत पेटकर on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…