“कुटुंब रंगलंय काव्यात”चे सर्वेसर्वा प्रा. विसुभाऊ बापट आणि सौ. उमा विसुभाऊ बापट आयोजित ‘कोसल्येचा राम’ या सांगितिक रामकथेच्या कार्यक्रमाचे दादरच्या शिवाजी मंदिरात हर्षोल्हासाच्या वातावरणात नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उत्तर प्रदेश चे माजी राज्यपाल राम नाईक यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतांना अयोध्येतील फैजाबाद चे नामांतर आपण राज्यपाल असतांना घडवून आणले असल्याचा दावा केला.

२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत प्रभू रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साही वातावरणात झाली. परंतु या अयोध्या नगरीचे नाव फैजाबाद होते. ते नांव तसेच राहिले असते तर फैजाबादेत राममंदिर असे विचित्र दिसले असते म्हणून मी उत्तर प्रदेशचा राज्यपाल असतांना फैजाबाद चे अयोध्या नामांतर केले. अलाहाबाद चे प्रयागराज केले, बॉम्बे, बंबईचे मुंबई केले अशा शब्दांत पद्मभूषण पुरस्कार सन्मानित राम नाईक यांनी आपल्या कारकीर्दितील कामांना उजाळा दिला.
सौ. उमा विसुभाऊ बापट यांनी वाल्मिकी रामायणात उल्लेखिलेल्या प्रभू रामचंद्रांच्या वयाच्या सोळा वर्षापासूनच्या विविध घटना सुंदर पद्धतीने कथन करीत प्रा. विसुभाऊ बापट, सौ. मेघा प्रभूदेसाई, रोहित प्रभूदेसाई, सौ. अर्चना दिनेश यांनी राम आणि सीतामाई यांच्या कथांमधील गीतांचे सुमधुर आवाजात गायन केले.

सौ. उमा बापट यांनी श्रवणीय निरुपण केले. डॉ. किशोर खुशाले यांनी तालवाद्य तर रोहित प्रभूदेसाई यांनी तबल्यावर उत्तम साथ दिली. नितीन सावंत आणि विजय सूर्यवंशी हे या कार्यक्रमाचे सूत्रधार असून प्रा. विसुभाऊ आणि उमा बापट दांपत्याने अवघे शिवाजी मंदिर राममय केले तसेच प्रभू रामनामाचा गजरात अवघे सभागृह न्हाऊन निघाले.

कुटुंब रंगलंय काव्यात या कार्यक्रमाला ४३ वर्षे पूर्ण झाली असून ३१११ प्रयोग झाले असल्याची माहिती प्रा. विसुभाऊ बापट यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिली.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800