Thursday, June 19, 2025
Homeलेखश्रावणाचे महत्व…

श्रावणाचे महत्व…

नमस्कार मंडळी.
आज पासून श्रावण महिना सुरू झाला आहे.
मराठी संस्कृतीत श्रावण महिन्याचे अनन्य साधारण महत्व आहे. हे महत्व का, कसे आहे ? हे सांगणारा हा विशेष लेख आपल्याला नक्कीच आवडेल,अशी आशा आहे.
श्रावण महिन्याच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा.
– संपादक

पावसाळा सुरू झाला की, अनेक जण विशेषतः महिला या श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. मराठी श्रावण महिना म्हटलं की, सर्व सणांचा राजा मानला जातो. श्रावण महिन्याचे महत्व आपल्याकडे अधिक आहे. श्रावण महिना हा कोणत्या ऋतूत येतो हे वेगळं सांगायची गरज नाही. पावसाळा ऋतूमध्ये येणारा हा श्रावण सण प्रत्येकाला हवाहवासा असतो. श्रावण महिन्यात अनेक सण असतात. श्रावणातील पावसाचे वैशिष्ट्य म्हणजे क्षणात पाऊस आणि क्षणात ऊन दिसून येते.

श्रावण महिन्याचे महत्व नक्की काय आहे ?
असा प्रश्न जर तुम्हाला असेल तर श्रावण सुरू होतो तेव्हापासून सुरू होणाऱ्या व्रतवैकल्यांना महत्व आहे. भगवान शंकराला हा महिना खूपच प्रिय आहे असा समज आपल्याकडे आहे आणि या महिन्यात करण्यात येणाऱ्या व्रतांमुळे वातावरण पवित्र होते आणि आपल्याला आपल्या पापांपासून मुक्तता मिळते असाही समज आहे. त्यामुळे या काळात महादेवाची पूजा ही फलदायी ठरते असे समजण्यात येते. महादेवाची इत्यंभूत पूजाअर्चा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असंही म्हटलं जातं. तसंच श्रावणातील या सणांमुळे आपापसातील संबंध दृढ होतात असाही समज आहे. सर्वत्र आनंद, उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जाणारा हा श्रावण महिना आहे आणि म्हणूनच याला अनन्यसाधारण असे महत्व आहे.

स्वच्छ आणि स्वात्विक मनाचेच प्रतिबिंब श्रावण महिन्यात पडते. श्रावणी सोमवार, प्रदोष हे सर्व पर्वकाल ह्याच काळात येतात. सर्व देवदेवतांमध्ये श्रेष्ठ असणारा भगवान शिव त्याला प्रसन्न करण्यासाठीच जणू हा महिना आहे असे वाटते म्हणूनच प्रत्येक श्रावणी सोमवारी शंकराला शिवामूठ वाहण्याचा प्रघात आहे.

पौराणिक तथ्य :
श्रावण महिन्याची काही पौराणिक तथ्यही सांगितली जातात. त्यापैकी काही तथ्य खालीलप्रमाणे आहेत –

१) मरकंडू ऋषीचे पुत्र मार्कंडेय याच्या दीर्घायुष्यासाठी श्रावण महिन्यात त्यांनी शिवशंकराची घोर उपासना केली होती, ज्यामुळे त्यांना जी शक्ती प्राप्त झाली त्यापुढे यमराजही नतमस्तक झाले होते असा समज आहे.
२) भगवान शंकर श्रावणात आपल्या सासरी येतात आणि तिथे त्यांचा अभिषेक होतो असाही समज आहे
पुराणात उल्लेख असल्याप्रमाणे श्रावण महिन्यात समुद्र मंथन झाले होते. त्याचवेळी समुद्रातून निघालेले विष पिऊन शंकराने सृष्टीची रक्षा केली होती. त्यामुळेच शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्याचे महत्त्व अधिक आहे.

३) शिवपुराणातील उल्लेखाप्रमाणे भगवान शिव हे स्वयं जल असून शिवलिंगावर जलाभिषेक केल्यास श्रावण महिन्यात फळाची प्राप्ती मिळते.

४) शास्त्रात सांगण्यात आल्याप्रमाणे भगवान विष्णू हे श्रावण महिन्यात योगनिद्रेत निघून जातात. त्यामुळे संपूर्ण सृष्टीचे उत्तरदायित्व यावेळी भगवान शिव करतात. त्यामुळे श्रावणात शिवशंकराला अधिक प्राधान्य देण्यात येते.

५) याशिवाय पुराणात सांगण्यात आल्याप्रमाणे, देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रतवैकल्ये केली आणि उपवास – साधनेने शंकराला प्रसन्न करून घेतले होते. त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह केला होता. त्यामुळे धार्मिक दृष्टीनेही श्रावण महिन्याचे महत्त्व अधिक आहे.

उपवास -शास्त्रीय अर्थ :
याच काळात जास्तीत जास्त उपास असल्याचे कारण देवाच्या सा‍निध्यात वास करावयाला मिळावा हे आहेच. पण कमीतकमी आहाराने आपला जठराग्नी जो या काळात मंद झालेला असतो त्यालाही जास्त काम करावयास लागू नये हाही त्यामागील शास्त्रीय अर्थ आहे. पावसाळ्यात पचनाच्या तक्रारी वाढतात हवामानामुळे शरीरच्या हालचाली कमी होण्याने तसेच जाठराग्नी प्रदिप्त नसल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण, पावसाचे गढूळ पाणी यामुळे या काळात पोटाचे विकार वाढतात. त्यावर लंघ‍न किंवा अल्प सात्विक आहार हे अत्यंत प्रभावी औषध आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने का होईना, तोंडाचे खाण्याचे काम कमी होऊन ते हरीनामाकडे त्याचा जप करण्याचे काम करू लागते हे काय कमी आहे?

श्रावणातील सण :
श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांची एक यादीच करता येईल. मराठी महिना असणाऱ्या श्रावणात अनेक हिंदू सण साजरे करण्यात येतात.

श्रावणी सोमवार :
या महिन्याच्या सणाची सुरूवात होते ती म्हणजे श्रावणी सोमवार अर्थात शिवामूठीने. दर श्रावणी सोमवारी तीळ, तांदूळ, मूग, जव आणि सातू अशा क्रमाने शंकराच्या पिंडीवर अथवा शिवलिंगावर धान्य वाहण्यात येते. नवविवाहित महिला श्रावणी सोमवाराचे हे व्रत पहिले पाच वर्ष करतात आणि काही महिला तर आयुष्यभर हे व्रत करतात.

श्रावणी मंगळवार अर्थात मंगळागौर: त्यानंतर नवविवाहितांसाठी खास सण ठरतो तो म्हणजे मंगळवार. श्रावणातील मंगळवारी संसारातील सौख्य आणि प्रेम कायम राहण्यासाठी मंगळागौरीचे खास व्रत करण्यात येते. पहिल्या मंगळागौरीला आपल्या जवळच्या सवाष्णींना बोलावून हे व्रत पूजण्यात येते. पाच वर्षांनी हे व्रत पूर्ण करायचे असते. मंगळागौरीची पूजा, ओव्या, उखाणे, फुगडी, ओटी भरणे, रात्री जागरण करणे आणि पारंपरिक खेळ असे याचे मोठे स्वरूप असते. जेणेकरून सासर आणि माहेरच्या दोन्हीकडील प्रेम नवविवाहितेला मिळते.

जिभेचे चोचले पुरविण्याचे कमी झाल्यामुळे सा‍हजिकच त्या दिवशी घरच्या गृहिणीलाही थोडा विसावा मिळतो व तिही आपल्या मैत्रिणींसमवेत नटूनथटून देवाच्या पूजेला, मंगळागौरीची पत्री गोळा करायला जाऊ शकते. फुलाची आरास करून प्रसन्न अशा रांगोळ्यांनी वातावरण निर्मिती तर होतेच पण त्यातून तिलाही सृजनाच्या निर्मितीचा आनंद मिळतो व तीही प्रसन्न होते.

मंगळागौरीच्या निमित्ताने सगळ्या माहेरवाशिणी जमतात. यथासांग महादेवाची पूजा करतात व जसा उमेने भोळ्या सांबाला आपल्याशी लग्न करायला प्रवृत्त केले व त्याबरोबर सुखाने कैलासावर राज्य केले तशाच ह्या नवविवाहिता आपल्या पतीसमवेत सुखी संसाराच्या स्वप्नात मग्न होतात.

मोठेपणाचे जोखड काही वेळ बाजूला ठेवून मंगळागौर जागवायला सगळ्याजणी तयार असतात. त्या खेळतात, गाणी म्हणतात फेर धरतात व मनातल्या भावना गीतांतून व्यक्त करून मोकळ्या मनाने पुढच्या दिवसांना, संकटांना सामोर्‍या जायला सज्ज होतात. अगदी सगळ्या सासुरवाशिणी (वय वाढली तरी) ह्या श्रावणातील सणांची वाट बघत असतात ते गौर जागवणं ते नागपंचमीचे वडाच्या पांख्यांवर घेतलेले उंच उंच झोके, रात्री हाताला काढलेली मेंदी अन् त्या प्रत्येकाबरोबर लहानपणीच्या, तरुणपणीच्या सुखद आठवणी.

नागपंचमी :
यानंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. बिळातील उंदरांना नाग नष्ट करतो, त्यामुळे नागदेवतेची यादिवशी शेतकऱ्यांकडून मित्र म्हणून पूजा करण्यात येते. यादिवशी नागाला कोणतीही इजा होऊ नये म्हणून जमीन खणली वा नांगरली जात नाही. तसंच वारूळ असेल तिथे जाऊन पूजा करण्याचीही गावागावात पद्धत आहे.

नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन :
यानंतर येणारा सण म्हणजे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन. हे दोन्ही सण एकाच दिवशी येतात. कोळी समाजासाठी महत्त्वाचा ठरणारा नारळी पौर्णिमा सण जल्लोषात साजरा होतो. तर या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून नव्या हंगामासाठी होडी पुन्हा समुद्रात सोडली जाते आणि मासेमारीला सुरूवात होते. तर भावाबहिणीचा खास सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनाची माहिती आणि भावाबहिणीच्या नात्याची महती तर सर्वांनाच माहीत आहे. अगदी सामाजिक ऋणानुबंध जपण्याचा हा दिवस आहे.

कृष्ण जन्माष्टमी आणि दहिकाला :
या सणानंतर महत्त्वाचा सण येतो तो म्हणजे कृष्ण जन्माष्टमी. कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देत दुसऱ्या दिवशी गोपाळकालाही तितक्याच उत्साहात साजरा करण्यात येतो. दहिकाल्याला आता उत्सवाचे आणि अगदी व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले असले तरीही हा सण जगभरात अगदी दणक्यात साजरा करण्यात येतो.

पिठोरी अमावास्या : श्रावणाची सांगता करणारा सण म्हणजे पिठोरी अमावास्या. लहान मुलांची तर या दिवशी चंगळ असते. तर यादिवशीच साजरा केला जाणारा पोळा म्हणजे शेतकऱ्याचा जीवाभावाचा मित्र असणाऱ्या बेलाच्या जोडीला दिली जाणारी विश्रांती. गावागावांमध्ये हा सण खूपच जोमात साजरा करण्यात येतो.

अधिक श्रावण :
साधारण अनेक वर्षांच्या कालावधीनंतर अधिक श्रावण महिना येतो असे समजण्यात येते. मात्र शिवभक्तांसाठी हा अत्यंत मोठा उत्सव असतो. भक्तांसाठी शिवकृपा मिळविण्याचा आणि शिवभक्ती करण्याचा हा अधिक काळ असतो असं मानण्यात येते. 1985 मध्ये अधिक श्रावणमास होता त्यानंतर दहा वर्षाने अर्थात 2004 मध्ये आला तर त्यानंतर गेल्या 19 वर्षांपासून अधिक श्रावण महिना आलाच नाही, जो या वर्षी आला आहे. श्रावण अधिक मासामध्ये दानधर्म, पुण्य मिळवणे, रूद्र याग, अतिरूद्र याग अशा अनेक गोष्टींनाही महत्त्व प्राप्त होते. यावेळी अधिक व्रतवैकल्ये आणि पूजाअर्चा करण्यात येते.

सृष्टीला पडलेली श्रावणभूल :
श्रावणातील धात्रीवरही वेगवेगळी असंख्य प्रकारची फुलं, कोवळे अंकूर याच काळात तयार होतात. शिरीष, पारिजातक, सोनचाफा, बकुळी ही फुले तर या ऋतु भरपूर येतातच. पण ठिकठिकाणी सायली अन् गौरीची फुलेही दिसतात. सोनटक्याची पिवळट पांढरी झाक असणारी फुलेपण श्रावणातच दिसतात. ऋतुचक्र या पुस्तकात दुर्गाताईंनी याचे फार सुंदर वर्णन केले आहे. त्या म्हणतात. श्रावण म्हणजे हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन. कोवळ्या तृणांकुरांनी पृथ्वीचे विशाल अंग तर झाकून जातेच पण उघडे बोडके दगडही शेवाळाची मखमल पांघरुन बसतात. असा हा कुसुमाग्रजांनी वर्णिलेला ‘हासरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजरा श्रावण’. त्याच्या आगमनाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे अगदी तुम्हाला अन् धरतीलाही.

मनोज कुळकर्णी

— लेखन : मनोज कुलकर्णी. धर्माबाद, जिल्हा नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आपण जागे कधी होऊ ?
शितल अहेर on पुस्तक म्हणाले…
सौ. सुनीता फडणीस on पुस्तक म्हणाले…
श्रीकांत पेटकर on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…