सहायक पोलीस आयुक्त श्री अविनाश धर्माधिकारी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मघरी, गावी भगुर येथे सुहृदांची भेट आयोजित केली होती. या भेटीचा वृत्तान्त कथन करीत आहेत, लेखिका, कवियत्री, प्रकशिका लता गुठे. ही भेट आयोजित केल्याबद्दल श्री अविनाश धर्माधिकारी यांचे मनःपुर्वक अभिनंदन.
– संपादक
आम्हाला एम ए ला अभ्यासक्रमात सावरकरांचे ‘माझी जन्मठेप‘ हे आत्मचरित्र असल्यामुळे ते अनेक वेळा वाचले होते. त्यामुळे सावरकरांविषयी मनात नितांत श्रद्धा होती. अशा अलौकिक व्यक्तीचा वाडा पाहण्याचा योग नुकताच जुळून आला आणि मी लगेच हो म्हणाले. मीच नाही तर अनेक मित्र मैत्रिणींना या सहलीशी जोडलं आणि त्यांनाही भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानी जाऊन सावरकरांचा वाडा पाहता आला.
या सहलीचे आयोजन एसीपी अविनाश धर्माधिकारी यांच्या EduCultSports Foundation च्या वतीने करण्यात आले होते.
या सहलीसाठी आम्ही 55 सावरकर प्रेमी २५ .३.२०२३ रोजी सकाळी सात वाजता विलेपार्ले पूर्व येथून एका आलिशान एसी बसमध्ये भगूरला जाण्यासाठी निघालो.
नाशिक पासून २० किलोमीटर अंतरावर भगूर या गावी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वाड्याला भेट द्यायला गेलो. अतिशय सुरेख नाष्टा, भोजन, सर्वच आयोजन, नियोजन उत्तम होते. अनेक कलाकार मंडळी समवेत प्रवास सुरू झाला.
आम्ही दुपारी १ वाजता त्या अद्भुत, वैशिष्ट्यपूर्ण वाड्यासमोर पोहोचलो. वाड्याच्या समोरच युनिफॉर्ममध्ये एसीपी धर्माधिकारी साहेब आमच्या स्वागतासाठी उभे होते. वाड्याच्या समोरून घोषणा देत एका हॉलमध्ये जात असतानाच वाड्याच्या भिंतीला लागूनच देशी दारूच्या दुकानाची पाटी वाचून मात्र फार वाईट वाटले. असो….
वाड्यात प्रत्येक भिंतीला स्वातंत्र्यवीरांचे छायाचित्र लावलेल्या एका छान हॉलमध्ये आमची बसण्याची व्यवस्था केली होती. तिथे उपस्थित असलेले खास औरंगाबादहून आलेले पार्थ बावस्कर यांची ओळख अविनाश सरांनी करून दिली.
पार्थ यांच्या खणखणीत आवाजात सावरकरांवरील निरूपण सुरू झाले. ते अतिशय प्रेरणादायी होते. त्यांचा शब्द न शब्द मनात घर करत होता आणि विचार करायलाही प्रवृत्त करत होता. त्यांच्या मनात असलेली राष्ट्रभक्ती आणि सावरकरांविषयीची नितांत श्रद्धा जाणवत होती. त्यांनी वाड्यांची माहिती आणि महत्त्वाच्या अनेक घटनांच्या साखळ्या जोडत सावरकरांच्या आयुष्याचा प्रभावी पट आमच्यासमोर शब्दांच्या माध्यमातून उभा केला. त्यांचं बोलणं ऐकून आम्ही भारावून गेलो आणि त्याच अवस्थेत सावरकरांचा वाडा पाहिला.
बाहेरून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे दर्शन झाले आणि संपूर्ण वाड्यावरून एक नजर फिरवून घेतली. तेव्हा कल्पनाही आली नाही की आत इतका मोठा वाडा असेल ! तीन मजली लाकडी जुन्या पद्धतीचा तो वाडा आजही दिमाखात उभा आहे. समोर आणि पाठीमागे प्रशस्त अंगण. दिवाणखाना, माजघर, घरामध्ये विशिष्ट प्रकारच्या देवळी, धान्याची कोठारं, भुयारी मार्ग, लाकडी जिने आणि अष्टभुजा देवीचं छोटसं देवघर. भिंतीवर लावलेले सावरकरांचे जुने कॉलेज पासूनचे फोटो तसेच फॅमिली फोटो पाहताना मन भरून आले.
सावरकर केंद्राचे पदाधिकारी माहिती देत होते… याच वाड्यामध्ये सावरकरांचे बालपण गेले. आई-वडिलांच्या थोर संस्कारातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार घडले ते ह्याच वाड्यात. चाफेकर बंधूंच्या फाशीनंतर सावरकरांनी देश कार्यासाठी स्वतः ला समर्पित केले त्याची सुरुवात याच वास्तूपासून झाली. अष्टभुजा देवीच्या प्रेरणेने आणि तिच्या आशीर्वादाने त्यांनी शपथ घेऊन क्रांती लढ्यात उडी घेण्याचा निश्चय केला तो ह्याच पावन वास्तूमध्ये. त्या वेळेला सावरकर जेमतेम १४ वर्षांचे होते.
सावरकरांनी लिहिलेली आणि म्हटलेली कविता याच भिंतीने प्रथम ऐकली. असा हा प्रेरणादायी वाडा. त्या वास्तुत फिरताना सावरकरांच्या माझी जन्मठेपमधील वाचलेली वाक्येंन वाक्ये आठवत होती. म्हणून वाडा केवळ वास्तू म्हणून न पाहता एक तीर्थक्षेत्र आहे, असेच वाटत होते. याच वास्तूने सावरकरांचे विचार घडवले. त्यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली ही वास्तू पाहताना स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या सावरकरांनी अतोनात कष्ट सहन केले, संसाराची होळी करून मातृभूमीची सेवा करण्यासाठी अतोनात यातना सहन केल्या, काळ्यापाण्याची शिक्षा भोगली, हाल अपेष्टा सहन करून जे काही शक्य आहे ते केले, असे सर्व आठवत होते.
सावरकरांचा वाडा पुनरुज्जीवित करून पुरातत्त्व खात्याने तो सुस्थितीत जतन केला आहे. बालपणीच्या अनेक सुखदुःखाच्या आठवणींची साक्ष देणारा हा वाडा सर्व सावरकर प्रेमींनी आवर्जून बघावा असा आहे. सावरकरांनी लहान वयातच लिखाणाला सुरुवात केली होती .छंदबद्ध कविता, पोवाडे, फटके याच वाड्यात लिहिले. त्यांच्या आई वडिलांनी सावरकरांवर संस्कार ह्याच वाड्यात केले, या सर्व आठवणींना ह्या वाड्याने जपले आहे.
आईचे निधन झाले तेव्हा सावरकर जेमतेम दहा वर्षांचे होते. सावरकरांच्या सृजनशील मनामध्ये संसाराचे बीजारोपण आई-वडिलांनी याच वाड्यांमध्ये केले आणि ते कायम सावरकरांच्या मनात रुजले. अशा या वाड्याच्या आठवणी पार्थ बावस्कर यांनी सांगितल्या. ज्या कधीही कुठेही वाचायला मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे या गोष्टींचे मला जास्त अप्रूप वाटत होते.
वाड्याच्या भिंतीवर लावलेले सावरकरांचे जुने फोटो, सावरकरांचा पुतळा सर्व काही नजरेत साठवून घेतलं. आणि तृप्त मनाने तेथून निघालो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता उपेंद्र प्रभू, तसेच माननीय अविनाश धर्माधिकारी साहेब आणि त्यांच्या अर्धांगिनी यांच्या समवेत मित्र मैत्रिणी यांच्याशी गप्पा गोष्टी करत विचारांची देवाणघेवाण करत भारावलेल्या अवस्थेतच रात्री साडेअकराला घरी पोहोचलो.
या सहलीमध्ये सोबत अनेक नाटककर्मी लेखक, कवियत्री, कलाकार, गायक व गुणी बालकलाकार या सर्वांमुळे हा दिवस आनंदाची पर्वणीच ठरला.
ज्यांच्यामुळे हा दिवस खूप आनंद देऊन गेला त्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते.

– लेखन : लता गुठे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800